पंढरपुर सायकलवारी वर्ष दुसरे
या टुर दि वारी सायकल प्रवासाचे वर्णन बऱ्याच जणांनी केलेलेच आहे मी वेगळे काय ते सांगणार म्हणून मी हा विषय थोडा अध्यात्माकडे घेऊन जात आहे. पांडुरंग, विठ्ठल, पंढरी, हरीनाम, गीता, ज्ञानेश्वरी आणि सायकल म्हटल्यावर जोडीला अध्यात्मही हवेच नाही का? ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि पांडुरंग यांच्यात तुम्हाला रूची असेल तरच पुढे वाचायला तुम्हाला आवडेल नाहीतर हा विषय तुमच्या मेंदुच्या दहा किमी वरून जाऊ शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, "आंधळीया हाती दिले जैसे मोती वाया जाय" आंधळ्याच्या हातात दगड, मोती, हिरे जरी दिले तरी त्याला त्यांचे मुल्य ओळखता येत नाही. त्याच्या लेखी सर्व एकसमान असतात. या मनुष्य जन्माचे मुल्य ज्याला कळले नाही तो आंधळाच होय. मनुष्य जन्माला येऊन जो पांडुरंगाचे नाम घेत नाही पंढरपुरास जात नाही तो शिंगे आणि शेपूट नसलेला पशूच होय. आयुष्य जसेजसे पुढे पुढे सरकत चालले आहे तसातसा त्याच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलत चाललेला आहे. चाळीशी ओलांडुन आता पन्नाशीकडे धाव घेतलेले आयुष्य म्हणजे एखाद्य...