Monday 21 December 2020

माझे एवरेस्टींग

 माझे एवरेस्टींग 

माऊंट एवरेस्टची समुद्रसपाटीपासुनची ऊंची जवळजवळ 8848(+1) मीटर आहे. कोणत्याही ठिकाणी सायकल चालवुन एवरेस्ट एवढी उंची गाठणे म्हणजेच एवरेस्टींग होय. एवरेस्टींग म्हणजे एवरेस्टवर जाणे नव्हे. कोणताही एखादा चढ निवडावा, छोटा असो वा मोठा, तो बर्याच वेळा वर-खाली केल्यानंतर एवरेस्ट एवढी उंची आली कि एवरेस्टींग झाले असे समजावे. या उंचीला एवरेस्टींगचा दर्जा मिळण्यासाठी या राईडची लिंक (फक्त स्ट्रावा) एवरेस्टींग टिमला पाठवावी लागते. त्यांची संमती मिळाली कि आपले नाव एवरेस्टींगच्या वेबसाईटवर "हॉल ऑफ फेम" मध्ये कायमस्वरूपी नोंदवले जाते. एवरेस्टींग हाफ (4424मी) आणि फूल (8848मी) असे दोन प्रकारे करता येते. एवरेस्टींगचे वैशिष्टय म्हणजे यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नसते (सध्यातरी). कसलीही प्रवेश फि नाही, विमानप्रवास नाही, ना कसला हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च त्यामुळे यासाठी पैशाची आवश्यकता नसून फक्त कतृत्वाची गरज आहे. ज्या सायकलपटूंना आर्थिक परीस्थिती अभावी आपले कर्तब दाखवता येत नाही त्यांच्यासाठी एवरेस्टींग हि सुवर्णसंधी आहे. नेहमी प्रवेश फि आणि ईतर खर्चाबद्दल तक्रारी करणा-यांनी हे एवरेस्टींग अवश्य करावे. एवरेस्टींगचे नियम एकदम साधेसोपे आहेत ते म्हणजे एकदा सुरू केले कि एवरेस्टींग पूर्ण होईपर्यंत झोपायचे नाही आणि चढावर सायकल घेऊन चालत जायचे नाही. तुमच्यावर पाळत ठेवायला कोणीही नसते त्यामुळे खिलाडुवृत्ती आणि विश्वास या दोन गोष्टींवरच एवरेस्टींग अवलंबून आहे.


साधारण ऑक्टोबर महीन्यात मला हे एवरेस्टींगचे खुळ माहीत झाले. माझी चढावर सायकल चालवण्याची आवड बघता याविषयी ऐकल्या ऐकल्या मी याला स्पष्ट नकार दर्शवला आणि लांबूनच नमस्कार केला. कारण सायकल चालवताना येणारा चढ हा काही माझा आवडीचा विषय नाही. चढ हा मला नेहमीच नकोसा वाटत आलेला आहे. चढाचे आणि माझे कधीही जमले नाही. पण यामध्ये एक आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे "हाफ एवरेस्टींग". यामध्ये फक्त 4424 मीटर उंची होईपर्यंत सायकल चालवावी लागणार होती. "कर के देखते है ना यार" म्हणून मी हाफ एवरेस्टींगचा विचार करायला लागलो. परंतू या विचाराने सुद्धा माझ्या मांडया थरथरायला लागल्या होत्या. पण म्हटले .."होऊ दे खर्च..." एकदा करावयाचे ठरवल्यावर "हाचि नेम आता...ना फिरे माघारी". आता माघारी फिरायचे नाही. मग मी माझा एवरेस्टींगचा अभ्यास करायला सुरूवात केली. काय करता येईल? कसे करता येईल? कुठे करता येईल? याचा अभ्यास करून मी हळुहळू माझी रणनीती बनवु लागलो. बरेचजण अर्धवट माहीतीच्या आधारे एवरेस्टींगची माहीती देत होते. आणि त्यात ज्यांनी एवरेस्टींग केलेले नाही असे लोकच जास्त सल्ले देत होते. मी सर्वांचे ऐकुन घेत होतो. "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" शेवटी मी माझ्या मनाप्रमाणेच केले. सर्वप्रथम मी एवरेस्टींगच्या वेबसाईटवर  जाऊन एवरेस्टींगबद्दल सखोल माहीती घेतली आणि मगच माझ्या एवरेस्टींगचे नियोजन करायला सुरूवात केली. मला भेडसावणारी एकच गोष्ट त्यात होती ती म्हणजे एकदा एवरेस्टींगला सुरूवात केली कि ते पूर्ण होईपर्यंत झोपायचे नाही आणि सुखदायक बाब ही होती कि पूर्ण करायला कितीही वेळ लागला तरीही चालणार होते. 


संतोष झेंडेने (सासवडचे सुभेदार) तयारी दर्शवल्यावर आम्ही एवरेस्टींगसाठी किल्ले पुरंदरची निवड केली. पुरंदर किल्ला हा स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. एवरेस्टींगसाठी याहून श्रेष्ठ काय असू शकते. छ्त्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेचा परीणाम असा झाला कि दिवाळीच्या अगोदर मी, संतोष आणि शंतनु फक्त सरावासाठी पुरंदरवर गेलो होतो पण सराव करता करताच आम्ही थेट हाफ एवरेस्टींग पूर्ण केले. ब्रिटीशांनी मराठयांची प्रेरणास्थाने नेस्तनाबूत का केली असावीत याचे कारण मला कळाले. ईथे गवतालाही भाले फुटतात. हाफ एवरेस्टींगचे पुढचे सोपस्कार पूर्ण केले आणि लगेच हाफ एवरेस्टींगच्या हॉल ऑफ फेममध्ये आमची नावे झळकली सुद्धा. हॉल ऑफ फेममध्ये नावे झळकल्यावर माझा हुरूप वाढला. यानंतर एवरेस्टींगचा खरा सराव करायला सुरूवात केली. आता फक्त आणि फक्त चढावर सायकल चालवायला सुरूवात केली. आम्ही पुरंदरवरच फुल एवरेस्टींग करणार होतो. परंतू सरावासाठी मी मरीआई घाट निवडला. पुरंदरच्या चढासाठी मरीआआई घाटाचा सराव म्हणजे ससा मारण्यासाठी एके-47 चा वापर करण्यासारखे होते. "अपना ऐसाच रहता है.." काही दिवस मुक्काम पोस्ट मरीआई घाटच होता. याच कालावधीत पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे अशी 875 किमीची सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. एवरेस्टींगचा सराव म्हणून या मोहीमेच्या शेवटच्या दिवशी न झोपता सलग २८ तास सायकल चालवली. एकदा मध्यरात्री कामावरून सूटल्यावर न झोपता तसाच राईडला गेलो आणि आंबेनळी घाट करून आलो (पुणे पोलादपुर पुणे). सह्याद्रीतील सर्वात लांब अंतराचा (32किमी) म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाट भर ऊन्हात सायकलवर चढणे हि प्रयत्नांची पराकाष्ठा होती. असा सर्व प्रकारचा एवरेस्टींगला अनुकूल असा सराव झाल्यानंतर लवकरात लवकर एवरेस्टींग करून घेणे मला आवश्यक वाटत होते. ते म्हणतात ना, "लोहा गरम है, मार दो हाथोडा". 


१२ डिसेंबरला (शनिवार) पुरंदरवर एवरेस्टींग करण्यासाठी कोणीही तयार झाले नाही तसेच आर्मीची परवानगी घेणे हा क्लिष्टदायक प्रकार करावा लागणार होता. अमावस्येच्या अंधारात पुरंदरवर एकटयाने सायकल चालवणे सुरक्षित वाटत नव्हते कारण तिथे बिबटया आहे. त्यामुळे पुरंदरवर एवरेस्टींग करण्याचा बेत मी पुढे ढकलला. काहीही झाले तरी या आठवडयाच्या शेवटी एवरेस्टींगचा प्रयत्न करायचाच असे मी ठरवले. मी एक-दोनदा धायरीगावातील डिएसके विश्वच्या चढावर सराव करण्यासाठी गेलो होतो. एवरेस्टींग करण्यासाठी कोणताही चढ चालतो मग डिएसके विश्व काय वाईट आहे? सर्व बाबींचा विचार करून झाल्यावर डिएसके विश्वच्या चढावर एवरेस्टींग करण्याचे ठरवले. शनिवारी पहाटे साडेचारला ऊठुन सकाळच्या शिफ्टमध्ये कामाला गेलो. दिवसभर काम करून साडेचारला घरी आलो. ताजेतवाने वाटण्यासाठी मस्त खडे मीठ घालून गरम पाण्याने आंघोळ केली. असे केल्याने थकवा कमी होण्यास मदत होते तसेच त्यानंतर स्नायूंना वात येत नाही अशी नविन माहीती मला मिळालेली आहे. त्यामुळे आता ईथुन पुढे कोणत्याही रेसच्या अगोदर मीठाच्या (खडे मीठ किंवा सैंधव) पाण्याने आंघोळ करण्यात येईल. 


धायरी गावातील डिएसके विश्व या ठिकाणी जेमतेम अर्धा किमी अंतराचा चढ आहे आणि त्यामध्ये 40 मीटर इलेवेशन मिळते. याठिकाणी एवरेस्टींग करावयाचे झाल्यास तब्बल 221 फेरे मारावे लागणार होते. जे मला फार कंटाळवाणे वाटले होते. परंतू इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामूळे मी या आव्हानास सामोरे जाण्याचे ठरवले. सौ. बरोबर चर्चा करून माझी योजना तिला सांगितली कारण तिच्या सहकार्याविना हे शिवधनुष्य पेलणे शक्यच नव्हते. एवरेस्टींगची तयारी करण्यामध्ये सौ. चे मोलाचे सहकार्य लाभले. मी जे जे सांगितले होते ते ते तिने सर्व तयार करून ठेवले होते. एवरेस्टींगला जाताना सायकलला लागणारे सर्व साहीत्य, भरपूर पाण्याच्या बाटल्या, रसद (खाण्याचे पदार्थ) आणि स्टेडफास्ट न्युट्रीशन (पीनट बटर, पॉवर प्रोटीन, सेनर्जी, कार्बोरन्स ई.) कारमध्ये भरले आणि डिएसके विश्वला पोचलो. माझी कार सेगमेंटच्या जवळ वाहतूकीला अडथळा होणार नाही आणि पोलिस उचलून नेणार नाहीत अशा ठिकाणी लावली. डोळे मिटून एकदा पांडूरंगाचे स्मरण केले. माझ्या हृदयाची धडधड वादळापूर्वीची शांतता अनुभवत होती. मी दिर्घ श्वासोच्छवास करू लागलो.  


डिएसके विश्वचा चढ जरी छोटा असला तरी याठिकाणी असलेल्या सोईसुविधा एवरेस्टींग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे माझ्या अभ्यासू नजरेने हेरले होते. दूतर्फा झाडे जी दिवसा सावली देऊ शकतील, रस्त्यावरील दिवे जे रात्रीच्या वेळी अतिशय उपयुक्त आहेत, संपूर्ण रस्त्यावर रस्तादूभाजक आहेत ज्यांच्यामुळे उतारावरून जोरात येणा-या वाहनांचा कसलाही त्रास नाही, सेगमेंटच्या सुरूवातीला सुरक्षारक्षक आणि सेगमेंटच्या शेवटीही सुरक्षारक्षक...बस्स अजून काय हवंय आपल्याला?. ईथे कोणी दमदाटी करण्याची किंवा लूटालुट होण्याची शक्यता फारच कमी वाटली. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामूळे ईथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नव्हती.


सूर्यास्त होऊन गेलेला होता. सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी पेडल मारायला सुरूवात केली. दर एक तासाला ब्रेक घेऊन पाणी, चहा, इलेक्ट्रोलाईटस, केळी, खजूर, चिक्की जे हाताला लागेल ते पोटात ढकलुन लगेच पेडल मारायला सुरूवात करत होतो. माझ्या सोबतीला फक्त माझी कार होती. सायकल यायच्या अगोदर तिच्याच साथीने मी फिरायला जायचो. आज तीच माझी क्रू मेंबर होती. सोबतीला कोणी नसल्यामूळे स्टेडफास्ट्ची ड्रिंक्स मला स्वत:लाच बनवुन घ्यावी लागत होती आणि कारमध्ये कुठे काय ठेवलंय हे अस्ताव्यस्त पसारा करून ठेवल्यामुळे नेमकी वस्तू शोधण्यात वेळ वाया जात होता, जर कोणी अनुभवी मेंबर सोबतीला असता तर यामध्ये वाया जाणारा वेळ नक्कीच वाचला असता. पूढच्या वेळी यामध्ये कायझेन सुधारणा करण्यात येईल. सेगमेंटचे अंतर कमी असल्यामूळे सायकलला कोणतेही साहीत्य लावले नाही. सायकलला जेवढी हलकी ठेवता येईल तेवढी हलकी ठेवण्याचा प्रयत्न केला. सिपर बाटलीसुद्धा अर्धीच भरून घेतली होती. पंक्चर किट, मिनी पंप, बॅग, ट्युब्स इ. सर्व साहीत्य काढुन कारमध्ये ठेवलेले होते. मोठा पंपही सोबत होताच त्यामुळे सायकल पंक्चर झाली तर हवा भरताना होणारी दमछाक होणार नव्हती. सायकलला मागचा दिवा, पूढचा दिवा आणि अर्धी भरलेली सिपर बाटली एवढेच साहीत्य लावलेले होते. सायकलच्या कमी वजनाचा फायदा चढ चढताना होणार होता. पहील्या दोन तासात मी तीस फेरे मारले आणि थोडी विश्रांती घेतली. तीन तास झाल्यावर मी थोडा नाष्टा केला. 


रात्री साडेनऊनंतर रस्त्यावरील वर्दळ अतिशय कमी होऊ लागली. या सेगमेंटमध्ये एक हेअरपिन वळण आहे तिथे थोडासा ब्रेक दाबावा लागत असे. नंतर उतारावरील लुडबूड कमी झाल्यावर उतारावरून सुसाट जायला लागलो. आता एलेवेशनचे आकडे पटापट वाढत चालले होते. रात्रीच्या वेळी खूप थंडी वाजेल अशी अपेक्षा होती परंतू वातावरण नेमके उलट होते. उकाडा जाणवत होता आणि थंडी वाजण्याऐवजी सायकल चालवुन मला घाम यायला लागला होता. घामाने कपडे ओले झाले होते. उतारावरून वेगात गेल्याने सुद्धा म्हणावी अशी थंडी वाजत नव्हती. घामाने भिजल्यामुळे ऐन मध्यरात्री मला जर्सी बदलावी लागली. सिक्युरीटी गेटजवळील एक कुत्रा सुरूवातीला माझ्यावर भूंकला परंतू मी एवढया वेळा वर-खाली करत होतो कि नंतर त्याला माझ्यावर भूंकण्याचा कंटाळा आला. तोच नंतर माझा मित्र झाला आणि माझ्यावर भूंकणा-या दूस-या कुत्र्यावर भूंकला. एवढीच काय ती रात्रभर मिळालेली सोबत. त्याला एक सॅंडविच खायला दिले पण त्याने काही ते खाल्ले नाही. रात्री ऊशिरा फक्त एका कारवाल्याने मला विचारण्याची तसदी घेतली. त्याला एवढेच सांगितले कि सराव चालू आहे, एवरेस्टींग चालू आहे असे जर बोललो असतो तर माझ्याच डोक्याला ताप झाला असता कारण त्याने एकतर घेतलेली होती आणि व्यवस्थित समजावुन घेतल्याशिवाय तो काही गेला नसता. आजकाल सायकल चालवण्यापेक्षा अशा फालतू चौकशांना उत्तरे देणे मला फार तापदायक वाटते. रात्री दोन वाजता आणि पहाटे चार वाजता असे दोन-दोन तासानंतर मी ब्रेक घेतले. दर दोन तासांनी जे जे खायचे ठरवलेले होते ते ते मी खात पीत होतो (भूक लागो अथवा न लागो). 


सूर्योदय पहावयास मिळाला नाही कारण ढग आणि धूके दोन्हीही आलेले होते. ते पाहुन पाऊस येईल असे वाटायला लागले होते. सूर्याची कोवळी किरणे न पहावयास मिळाली न पृथ्वीस त्यांचा स्पर्श झाला. बारा तास होऊन गेले तरीही माझे हाफ एवरेस्टींग झालेले नव्हते. हाफ एवरेस्टींग पूर्ण व्हायला 14 तास लागले त्यावरून मला कळले कि काहीतरी गडबड आहे. 40 मीटर सेगमेंटचे 110 फेरे झाल्यावर हाफ एवरेस्टींग होणे अपेक्षीत होते परंतू ते तसे झाले नाही. ढगाळ वातावरणामूळे दिवसा ऊन्हाचा त्रास जाणवला नाही. सौ. ने चहा, नाष्टा व जेवण सर्व अगदी वेळेत पाठवले. सर्व रसद घरून येत असल्यामूळे मला काहीही विकत घ्यावे लागले नाही आणि कसलीही प्रवेश फि नसल्यामूळे या एवरेस्टींगसाठी आलेला खर्च हा शून्य म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. 


दूपारनंतर माझा वेग थोडा मंदावला. सायकल पळवणे जड जाऊ लागले. चाकातील हवा कमी झाली असेल असे समजून नेहमीप्रमाणे दोन्ही चाकात पून्हा हवा भरून घेतली. चाकातील हवा कमी झालेली नव्हतीच पण तेवढीच मनाची समजूत काढून घेतली. खरंतर माझ्या मांडयांमधील हवा कमी होत चाललेली होती. मला हळूहळू थकवा यायला लागलेला होता. माझे इंधन संपत आलेले होते. मग मी सोबत जे जे आणले होते ते सर्व प्रकारचे इंधन पोटात भरले. थोडी विश्रांती घेतली आणि पून्हा जोमाने सुरूवात केली. विश्रांती घेण्याचा फायदा झाला. मंदावलेला वेग पून्हा वाढला. इलेवेशनचे आकडे आता चांगलेच वाढलेले होते परंतू चोवीस तास होत आले तरीही एवरेस्टींग संपण्याचे नाव घेईना. खरंतर एव्हाना संपायले हवे होते. 24 तासांचा कालावधी खूप आहे. संध्याकाळच्या वेळेस माझा मित्र गणेश मला भेटायला आला. येताना त्याने मस्त बिर्याणी आणली होती. आम्ही दोघांनी मस्त आनंद लूटला. गणेशने जे काही माझे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले तेवढेच फोटो आणि व्हिडीओ या एवरेस्टींग दरम्यान काढले गेलेले आहेत. यावेळेस मी फोटो आणि व्हिडीओ काढण्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवला नाही तसेच एवरेस्टींग दरम्यान सोशल मिडीयापासूनही लांब राहीलो.  


शेवटचे 1000 मीटर शिल्लक असताना पाऊस यायला सुरूवात झाली. पावसात सायकल चालवायला मिळणार म्हणून मी आनंदी झालो होतो पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. दिवसभर घामाने भिजलेली जर्सीसुद्धा पावसाने धुऊन निघाली नाही. पाऊस आला आणि फक्त रस्ता ओला करून निघुन गेला. रस्त्यावर चिकचिक करुन गेला. यामुळे उतारावरून खाली येताना चाक घसरून सायकल पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामूळे उतारावरून येताना ब्रेक दाबत दाबत खाली यावे लागत होते. चढावर सायकल चालवण्यापेक्षा उतारावरून खाली यायला जास्त कसरत करावी लागत होती. त्यात माझ्या सायकलचा ब्रेक हार्ड असल्यामूळे बोटांचे तुकडे व्हायचेच बाकी राहीले होते. या परीस्थितीमुळे एका फेरीसाठी लागणारा वेळ खूप वाढला. रात्रीचे अकरा वाजत आले तरी एवरेस्टींग काही संपण्याचे नाव घेईना. एवरेस्टींग संपल्यावर आम्ही पार्टी करणार होतो. पण आता एवढा उशिर झालेला आणि पाऊस आलेला पाहुन मी गणेशला घरी जावयास सांगितले. काही वेळ पाऊस थांबला होता. शेवटचे 200 मीटर इलेवेशन राहीले असताना पून्हा पाऊस आला तो काही थांबलाच नाही. रात्री 12 वाजून 02 मिनिटांनी गारमिनमध्ये 8848 मीटर इलेवेशन दाखवले आणि एवरेस्टींगची उंची गाठल्याचा आनंद माझ्या चेह-यावर झळकू लागला. ईच्छित ध्येय गाठण्याचा आनंद काही औरच असतो. एकदम काठोकाठ 8848 मीटर इलेवेशन ठेवायला नको म्हणून मी सायकलिंग तसेच चालू ठेवले. गारमिनमध्ये 8904 मीटर इलेवेशन आल्यावर ब्रेक दाबला आणि एवरेस्टींग संपवले. कसलेही लफडे नको आणि किरकिर नको म्हणून 8900+ मीटर इलेवेशन केले. माझ्या एकूण 270 फे-या झालेल्या होत्या, एका फेरीला 40 मीटर याप्रमाणे 10,800 मीटर इलेवेशन यायला हवे होते. परंतू गारमिन दर फेरीला वेगवेगळे रिडींग दाखवत होते. या गारमिनमूळे एवरेस्टींग करता करता माझे 10K इवरेस्टींग कधी झाले मलाच कळले नाही. हे ही नसे थोडके. शेवटी शेवटी शरीरापेक्षा माझे मन जास्त थकल्यासारखे वाटत होते. मी अजून सायकल चालवू शकलो असतो. पण सोबतीला कोणीही नव्हते त्यामूळे खूप एकटे एकटे वाटत होते. आणि एवरेस्टींगचे लक्ष्य गाठल्यावर त्यापुढे सायकल चालवायला मजा येईना. मन घराकडे धाव घ्यायला लागले होते. मग मीही घराकडे वळालो. डिएसके विश्व ते घरापर्यंतचा प्रवास अंगावर पाऊस झेलत आणि सायकल चालवतच केला. एकदाचा मी घरी पोचलो. दार उघडताच सौ. ने माझे जंगी स्वागत केले आणि माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या काही क्षणांमध्येच मी मागच्या तीस तासात अनुभवलेले कष्ट आणि सर्व क्षीण विसरून गेलो. 


मागील एक ते सव्वा महीन्यापासुन पाहीलेले हे एवरेस्टींगचे स्वप्न मी अथक परीश्रम घेऊन साकार केले. गारमिनच्या कृपेमुळे (खरंतर राग आला होता) 10K एवरेस्टींगही झाले. एका बाणात दोन शिकार झालेल्या आहेत. अजून काय हवंय आपल्याला. या एवरेस्टींगमध्ये इतर कोणाचीही मदत घ्यावी लागली नाही, मी पुर्णपणे आत्मनिर्भर होतो (सौ. ने केलेली मदत वगळता) आणि विशेष म्हणजे यासाठी मला कसलाही खर्च आला नाही. ना प्रवेश फि भरावी लागली ना बाहेरून काही विकत घ्यावे लागले. मी ब-याचदा लोकांच्या तोंडुन ऐकतो, जर माझ्याकडे तेवढे पैसे असते तर मी अमुक तमूक करून दाखवले असते. असे म्हणणा-या लोकांना एवरेस्टींग करून आपले कतृत्व सिद्ध करण्याची नामी संधी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसाच असायला हवा असे काही नाही. परमेश्वराने सर्व गोष्टींसाठी पर्याय दिलेले असतात फक्त आपल्याला ते शोधता आले पाहीजेत.


स्टेडफास्ट न्युट्रीशनचे खूप खूप धन्यवाद. स्टेडफास्ट न्युट्रीशनच्या सहकार्याविना एवरेस्टींग शक्यच नव्हते. त्यांनी दिलेले पॉवर प्रोटीन, पीनट बटर, सेनर्जी आणि कार्बोरन्स यांनी एवरेस्टींग करताना माझा ऊत्साह कायम वाढत ठेवला. 10K एवरेस्टींगमध्ये स्टेडफास्ट न्युट्रीशनचे मोलाचे सहकार्य लाभले.


अशा रितीने आणि अशा प्रकारे मी 10K एवरेस्टींग फिनिशर झालो. एवरेस्टींगचा आनंद साजरा करण्यासाठी प्रिय मित्र अभि याने मला जंगी पार्टी दिली. आपल्या आनंदात आनंद साजरा करणारा जिवलग मित्र एवरेस्टपेक्षा नक्कीच कमी नाही. 



STRAVA ACTIVITY LINK







Saturday 12 December 2020

पुणे गोवा पुणे सायकल मोहीम


 पुणे गोवा पुणे सायकल मोहीम



पुणे गोवा पुणे सायकल मोहीम

यावर्षी दिवाळी झाली की गोवा सायकल मोहीम करायचीच असे मनोमन ठरवलेले होते. कोरोना महामारीच्या कचाटयातुन कशीबशी हळूहळू सूटका होत चाललेली होती. त्यामुळे प्रवासासाठी सूट मिळालेली होती, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित सुरु झालेली होती. माझ्यासाठी एवढे पुरेसे होते. सायकल चालवताना रस्त्यात तहान लागल्यावर पाणी आणि भूक लागल्यावर अन्न मिळाले कि सायकलचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा गोव्याला जाणार होतो आणि तेही सायकलवर. आणि परतीचा प्रवास सुद्धा सायकलवरच करणार होतो. तेवढंच थोडं जगावेगळं. मला जगावेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि सगळं जग जे करते त्यापासुन मी लांब राहतो. कदाचित याच कारणामुळे मी एवढे दिवस गोव्याला गेलेलो नाही. कधीतरी व्हिस्की पितो पण बीचवरील दृश्य बघण्यात मला कसलाही रस नाही. वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास करण्याची मला अ‍ॅलर्जी आहे. एसी लावलेल्या कारमध्ये प्रवास केला कि मी आजारी पडलोच म्हणून समजा, असे ब-याचदा झालेले आहे. सायकल चालवताना मिळणारी स्वच्छ, मोकळी आणि ऑक्सीजनने परीपूर्ण असलेली हवा मला फार आवडते. बरेचजण गोव्याला सायकलवर जातात पण परत येताना मात्र सायकल बसमध्ये टाकुन आणतात. कोणाकडे वेळ नसतो तर कोणाकडे दम. गोवा सायकल मोहीमेसाठी मी एक आठवडा खास राखुन ठेवलेला होता आणि माझा दम मला किती साथ देतो ते मला पहायचे होते. मागच्या दिवाळीमध्ये मलेशिया येथील लंगकावीमध्ये मी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्या स्पर्धेत मी  ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे हे सलग १५ तास १४ मिनिटांत पुर्ण केलेले आहे. हे सर्व करण्यासाठी १७ तास वेळेची मर्यादा होती. आजतागायत टाटा मोटर्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये "आयर्नमॅन" हा किताब मिळवणारा मी टाटा मोटर्स समूहातील प्रथम कर्मचारी आहे आणि याचा मला खुप अभिमान वाटतो. यावर्षी कोरोना महामारीमुळे सरावामध्ये खंड पडलेला होता. तरीही गोव्याला सायकलवर जाण्याची मजबूत ईच्छा मनात तयार झालेली होती.

दिवस - १ 
पुणे ते कोल्हापूर २२५ किमी

कोणी सोबतीला आले नाही तर मी एकटयाने सुद्धा गोव्याला जाण्याची तयारी ठेवलेली होती. माझा एक वर्गमित्र म्हणाला जर कोणीच सोबतीला आले नाही तर मी तुझ्यासोबत दुचाकी चालवत येऊ शकतो. पण सायकल चालवणारा सोबतीला असेल तर आणखी मजा येते. मी गोवा सायकल मोहीमेबाबत जवळच्या मित्रमैत्रिणींना माहीती दिली. "सांगायचं ना राव, आलो असतो की.." अशी बोंब मारणा-या मित्रांची आपल्याकडे कमतरता नाही आहे. बरेचजण जाऊ म्हणाले. काहींना येण्याची ईच्छा असुनही येता आले नाही, मी येणार म्हणणारे आदल्या दिवशी गायब झाले आणि असे करता करता आम्ही दोघेच राहीलो. मी आणि को-रायडर. दोघांचाही निश्चय पक्का असल्यामुळे ईतर सभासद मागे हटले तरी आम्ही मागे हटलो नाही, ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी सकाळी आम्ही सायकलवर गोव्याला प्रस्थान केले.
माझा आणि को-रायडरचा दोघांचाही सायकल चालवण्याचा वेग चांगला आणि एकसारखा असल्यामुळे पुणे ते कोल्हापूर हे अंतर आम्ही बारा तासात पूर्ण केले (चहा-नाष्टा, जेवण व विश्रांतीच्या वेळा धरून). घरून निघताना आम्ही भल्या पहाटे ऊठण्याचा त्रासही घेतला नाही (स्मार्ट थिंकींग). आम्ही सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सिंहगड रोडवरील हायवे पूलापासुन राईडला सुरूवात केली. पुणे ते कोल्हापूर रस्ता सायकल चालवण्यासाठी भन्नाट आहे. यामध्ये कात्रजचा नविन घाट आणि खंबाटकी हे दोन मध्यम श्रेणीतील घाट लागतात. हे दोन घाट पार करताना जर तूम्ही संयम राखला तर तुम्ही आरामात कोल्हापूरला पोचणार एवढे मात्र नक्की. शिरवळ, सातारा, उंब्रज, कराड इ. गावे रस्त्यात लागतात. नसरापूर ओलांडल्यावर गूळाचा चहा, खंबाटकी सुरू होण्याअगोदर कांदा-पोहे, सातारामध्ये चहा-बिस्कीट आणि कराडमध्ये मसाला डोसा आणि उथप्पा असा विवीध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत घेत आम्ही कोल्हापूरला पोचलो. पाण्याच्या बाटलीत स्टेडफास्टचे सेनर्जी आणि मागच्या खिशातील पिनट बटर ठेवलेले होते जे मी अधुन-मधुन खात होतो. अशा प्रकारे खाण्यापिण्यावर व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे पूर्ण दिवसभर सायकल चालवण्याचा ऊत्साह जरासुद्धा कमी झाला नाही. लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये हेच सर्वात महत्वाचे असते. सूर्यास्त झाल्यावर आम्ही कोल्हापूरात पोचलो जिथे आम्ही पहील्या दिवसाचा मुक्काम करणार होतो. सायकलला सहा किलो वजन लावलेले असताना देखील २२५ किमी अंतर १२ तासात पार केले आणि संध्याकाळी हॉटेलवर विश्रांती घेतली. रात्री कोल्हापूरात तांबडा-पांढरा जेवणाचा आस्वाद घेतला. गोवा सायकल मोहीमेतील एक टप्पा पार झालेला होता. 











दिवस - २ 
कोल्हापूर ते म्हापसा १८५ किमी

कोल्हापूरातुन पहाटे लवकर राईडला सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाकडुन महामार्गावर पोचलो. महामार्गावरील मोकळया वातावरणात कर्नाटक राज्याच्या हद्दीत सूर्योदयाचे नयनमनोहर दृश्य पहावयास मिळाले. अशा मोकळ्या वातावरणात सूर्योदय पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सकाळच्या रम्य वातावरणात आम्ही तवंदी (तौंदी) घाटाच्या माथ्यावर (गोवाफाटा) पोचलो. सायकल चालवुन फार भूक लागते त्यामुळे हॉटेल कावेरीमध्ये मनसोक्त नाष्टा केला. जे समोर येईल ते घशाखाली ढकलणे, तिथे आवड-निवड करायला वेळ नसतो. सायकल बाहेर लावुन हॉटेलात बसलो कि बाहेर लावलेल्या सायकलमध्ये जीव अडकलेला असतो. सायकलवर सतत लक्ष ठेवावे लागते. सायकल चोरीला जाण्याची भिती दूसरे काय. माझ्या सायकलिंगच्या वेशभूषेकडे हॉटेलमध्ये बसलेले आणि गोव्याकडे निघालेले लोक असे बघत होते जसे काही एखादा परग्रहावरील प्राणी पाहत आहेत. पण मला आता याची सवय झालेली आहे. नाष्टा झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता आम्ही सायकल चालवायला सुरूवात केली. आजरा-निपाणी लिंक रस्ता, आंबोली-आजरा रस्ता तसेच बेळगाव-सावंतवाडी रस्त्याने सायकल चालवत आम्ही आंबोली घाटातून कोकणात उतरलो. रस्ता म्हणावा असा उत्कृष्ट नाही, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. कोकणात येईपर्यंत दूपार होऊन गेलेली होती. आंबोली घाटातील धबधबा अजूनही वाहत होता. दिवाळीनंतरही धबधब्यातून वाहणारे पाणी पाहुन मला आश्चर्य वाटले. घाटमाथ्यावरून कोकणात नजर टाकल्यानंतर दिसणारे सौंदर्य नजरेत सामावून घेता येत नव्हते. आंबोली घाटातून कोकणात नजर टाकल्यानंतर जी काही दृश्य दिसत होती ती सर्वच्या सर्व विलोभनीय होती. आंबोली घाटाच्या उतारावरून सायकल चालवताना एखाद्या घनदाट अरण्यातून चाललो आहे असा भास होत होता. घाट उतरल्यावर सरळ सावंतवाडीकडे न जाता चेकपोस्टवरून आम्ही डावीकडे वळालो. को-रायडरला हा रस्ता माहीत असल्यामुळे मी फक्त को-रायडरच्या सूचनांचे पालन करत होतो. बावळाट मार्गे (रस्ता भयानक अवस्थेत होता)  तेरेखोल नदीच्या बाजूने जाता जाता आम्हाला वाफोली धरण लागले. वाफोली धरणापासुन ते मुंबई-गोवा महामार्गापर्यंतच्या रस्त्याची स्थिती ऊत्तम होती त्यामुळे ते अंतर लवकर पार झाले. गोव्यात जाताना भालेकर भोजनालय लागले पण ती वेळ जेवण करण्याची नव्हती. भालेकर भोजन कार्यक्रम पुढच्या वर्षी नक्की करण्यात येईल जर पुन्हा गोव्याला गेलो तर. संध्याकाळच्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्हा पार करून आम्ही गोवा राज्यामध्ये मध्ये प्रविष्ट झालो. मुंबई-पणजी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. गोव्यामध्ये सपाट नावाचा रस्ता औषधाला सुद्धा नाही. चढ आला की उतार अन उतार संपला कि पुन्हा चढ. एक चढ चढायचा तो उतरायचा कि लगेच दूसरा चढ. गोवा म्हणजे न संपणारा चढांचा खेळ जो पायांना नकोसा वाटतो विशेषकरून जेव्हा तुम्ही शंभरहून अधिक किमी खराब रस्त्यावरून सायकल चालवत आलेला असता. त्यावेळेस हा चढांचा खेळ म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा वाटत होता. त्यात हॉटेलचा पत्ता शोधताना रस्ता चूकलो. मग तर विचारूच नका. शेवटी कसेबसे को-रायडरने गोव्यात बुक केलेले हॉटेल शोधले आणि एकदाचा सायकल चालवण्याच्या श्रमातून त्यादिवशी मुक्त झालो.


































दिवस - ३
गोवामध्ये भटकंती

माझ्या को-रायडरला गोव्याची ईत्यंभुत माहीती असल्यामुळे मला कसलीही शोधाशोध करावी लागली नाही. गोव्यातील उत्तम बीचवर जाऊन समुद्राचा आनंद घेता आला आणि उत्तमातील उत्तम हॉटेलात जाऊन गोव्यातील खाद्यपदार्थ तसेच व्हिस्कीचा आस्वाद घेतला. गोव्यामध्ये जाऊन जे करायला हवे ते सर्व केले. थोडक्यात जीवाचा गोवा केला. अशा रीतीने माझी पहीली गोवा भेट अविस्मरणीय ठरली.  


















दिवस - ४
म्हापसा ते कणकवली

लगेच परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळही झाली. परतीचा प्रवास आम्ही तळकोकणातून करणार होतो. गोव्यातील सूर्योदय पाहून सायकल चालवायला सुरूवात केली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला, कुडाळ मार्गे कणकवली मध्ये मुक्काम करावयाचे ठरवलेले होते. परतीचा सायकलचा प्रवास एवढा उत्कंठावर्धक होईल याची मी कल्पनाही केलेली नव्हती. रस्त्याच्या बाजूने पसरलेल्या निळ्याशार समुद्राच्या पाण्याकडे पाहत सायकल चालवणे हा एक स्वर्गीय आनंद होता. समुद्र, गोवा आणि सायकल यामध्ये मी एवढा हरवुन गेलो होतो कि मला तारीख व वाराचे भान राहीलेले नव्हते. एका ठिकाणी एक महाशय डोलत-डुलत कथ्थक नृत्य करत आमच्याशी  इंग्रजीमध्ये बोलले त्यावरून मी ओळखले कि आज रविवार आहे. यशवंतगडाचा रस्ता शोधत असताना आम्ही चूकुन सिद्धेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यशवंतगडाच्या जवळच समुद्रकिना-याला लागुनच असलेले सिद्धेश्वराचे मंदिर सुंदर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजुचा निसर्ग त्याच्या सौंदर्यात प्रचंड भर घालतो. नैसर्गिक सौंदर्य काय असते ते येथे अनुभवयास मिळाले. सौंदर्य पाहुन तृप्त झालेले डोळे आणि प्रसन्न झालेले मन यामुळे याठिकाणी आत्मिक शांती मिळाली. यशवंतगड हा कोकणातील जांभा तसेच चिरा या लाल दगडांपासुन बनवलेला आहे. लाल दगडांमध्ये केलेले बुरूजांचे आणि दरवाजाचे बांधकाम पाहताक्षणी लक्ष वेधून घेते. निळ्या समुद्राच्या कडेला नारळांच्या झाडांच्या सोबतीने स्थित असलेला हा लाल रंगाचा किल्ला अतिशय ऊठून दिसतो. यशवंतगडाचे मनमोहक आणि विलोभनीय सौंदर्य डोळ्यात साठवल्यानंतर आम्ही वेंगुर्ल्याकडे निघालो. वेंगुर्ला खूप छान आहे. येथील नैसर्गीक सौंदर्य अजूनही अबाधित आहे. शहरी मनुष्यांची वर्दळ ईकडे कमी आहे. त्यामुळे ईकडची बीच स्वच्छ, कमी गर्दीची आणि नैसर्गीक सौंदर्याने नटलेली आहेत. मुंबई-पुण्यापासुन लांब अंतरावर असल्यामूळे वेंगुर्ला वाचला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्हैचिआड्जवळ एक अतिशय सुंदर तळे आहे. त्यामध्ये शेकडो सुंदर श्वेतकमळे सर्वदूर बहरलेली होती. एखाद्या परीकथेत शोभतील अशी. एखाद्या श्वेतकमळाला हात लावला तर समोर एखादा यक्ष प्रकट होऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लावेल असेच क्षणभर वाटले. ती श्वेतकमळे अतिशय सूंदर होती. 
वेंगुर्ल्यामध्ये अस्सल कोकणी वातावरण अनुभवयास मिळत होते. वेशभूषा, बोलीभाषा, मच्छीबाजार, सभोवताली डोलणारी नारळाची झाडे तसेच सुक्या मासळीचा गंध यामधुन कोकण ओतप्रोत ओसंडुन वाहत होते. को-रायडरने दूपारच्या भोजनासाठी वेंगुर्ल्यातील रेडकर भोजनालय निवडले. अतिशय माफक दर आणि चविष्ट जेवण. त्यात भात आणि कढी अमर्यादीत. मला आणि माझ्या को-रायडरला हे हॉटेल अतिशय स्वस्त वाटले. सायकल चालवुन भूक लागलेली असल्यामूळे मी दम लागेपर्यंत रस्सा आणि भात खात राहीलो तसेच सुरमई, कोळंबी, सोलकढी आणि पूरणपोळी या पदार्थांवर सुद्धा आडवा हात मारला. थोडक्यात मी अजगर झालो होतो.  खाल्लेल्या पदार्थांच्या मानाने आलेले बिल हे फारच नगण्य होते. आता आम्हाला कुडाळकडे प्रस्थान करावयाचे होते. जेवण उरकल्यावर आम्ही लगेच कुडाळच्या दिशेने सायकल वळवल्या. वेंगुर्ला ते कुडाळ या प्रवासात पुन्हा चढ-उतार यायला लागले होते. भरपेट जेवणामुळे सायकल चालवणे जड जात होते परंतू आम्ही कुठेही न थांबता आणि वेळ न दवडता थेट कुडाळ गाठले. कुडाळमध्ये लिंबू-सरबत प्यायला थांबलो. सायकल महामार्गावर  आल्यावर वेगाने पळायला लागल्या. त्यामुळे आम्ही कणकवलीच्या दिशेने सूसाट गेलो. कुडाळ ते कणकवली आम्ही एवढे सूसाट गेलो कि या सेगमेंटमध्ये मला KOM (King of Mountain) आणि को-रायडरला QOM (Queen of mountain) मिळाला. कणकवलीमध्ये राहण्यासाठी उत्तम हॉटेल मिळाले. आम्ही हॉटेल रिलॅक्समध्ये मुक्काम केला.

































































दिवस ५
कणकवली ते कोल्हापूर

या मार्गाने जाण्याच्या माझ्या आणि को-रायडरच्या योजना वेगवेगळ्या असल्यामूळे को-रायडर आणि मी स्वतंत्रपणे राईड करत कोल्हापूरला जाणार होतो. कणकवली ते तळेरे महामार्गाने आणि तळेरेपासुन उजवीकडे  वळून वैभववाडी कडे असा पल्ला गाठावयाचा होता. कसलीही घाई नसल्यामुळे मी राईडला निवांत सुरूवात केली. महामार्गाने येताना सूर्योदय पहावयास मिळाला. एके ठिकाणी चहा-बिस्कीट खायला थांबलो. वैभववाडी रेल्वेफाटकाजवळ आल्यावर माझ्या सायकलची चेन तुटली. आजतागायत माझ्या सायकलची चेन कधीही तुटलेली नव्हती त्यामुळे हि समस्या माझ्याकडुन सुटेल असे मला वाटले नव्हते. लांबच्या प्रवासात अशा प्रकारच्या समस्या सोडवता येणे अतिशय महत्वाचे असते. मी सायकलचे दूकान शोधत होतो. पण तेवढयात मला पंक्चरवाला दिसला. त्याच्याकडे गेलो पक्कड आणि स्क्रु-ड्रायवर घेतले आणि सर्व कौशल्य पणाला लावून  चेन पून्हा जोडली. पांडूरंगाचे आभार, संकटे देणारा तोच आणि त्यातून बाहेर काढणाराही तोच. वेळ वाया जाण्याव्यतिरीक्त चेन तुटण्याच्या संकटाने दूसरे काहीही केले नाही. खर्चही शून्य आला. वैभववाडीत एक चहा घेऊन करुळ घाटाशी सामना करायला निघालो. करूळ घाट सुरू होताना पोलिस चेकपोस्ट आहे. त्यांनी माझी बॅग तपासण्याची तसदी घेतली नाही. माझ्यापुढे चाललेल्या कारला थांबवुन डीक्की वगैरे सर्व उघडुन, गोव्यावरून जाताना दारूच्या बाटल्या तर घेऊन चालले नाहीत ना? याची खात्री केल्यावरच त्यांना सोडले. 
घाट सुरू होताच सह्याद्रीचा पहारेकरी गगनगड समोर दिसला. सभोवतालच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला गगनगड तेवढाच कणखर आणि दणकट भासत होता. घाटातील सौंदर्य जागोजागी टिपत मी करूळ घाटातून वरवर येत होतो. रस्ता कसा आहे? या समस्त सायकल जमातीला भेडसावणा-या प्रश्नाचे उत्तर तर द्यावेच लागेल. करूळ घाटातील रस्त्याचे काम सुरू आहे. निम्म्या अंतरापर्यंत काम झालेले आहे (सुपर फिनिश आहे) आणि निम्म्या अंतराचा रस्ता दगडाच्या खाणीसारखा आहे (किमान सायकल साठी तरी). त्यामूळे निम्मा घाट लवकर पार करूनही राहीलेले निम्मे अंतर पार करायला नाकी नऊ आले त्यात ऊन्हाचा तडाखा बसला.  मग तर विचारूच नका. घाटमाथ्यावरून दिसणारे कोकणचे सौंदर्य पाहतच रहावे असे आहे. सह्याद्रीचे नयनमनोहर रूप डोळ्यात साठवत करूळ घाट पार केला आणि गगनबावडा आला. गगनबावडा आला तरी मोबाईलला रेंज आलेली नव्हती आणि ती कोल्हापूर येईपर्यंत काही आली नाही. गगनबावडा ते कोल्हापूर हा रस्ता अतिशय उत्तम आहे. रस्त्याच्या आजूबाजूला झाडी आहे त्यामुळे ऊष्णता जाणवली नाही. या रस्त्यात कुठेही चढाचा अडथळा आला नाही. रस्त्याच्या दूतर्फा गावे आहेत. दूपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी मला रंकाळा दिसला. कोल्हापूरात एक साधेसे हॉटेल शोधले जिथे जेवताना सायकलसुद्धा समोर दिसेल असे. जेवण करुन थोडी विश्रांती घेतली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.   
































































दिवस ५
कोल्हापूर ते पुणे

खरंतर कणकवली ते पुणे या सायकलप्रवासाने प्रचंड क्षीण आलेला होता. कोल्हापुरात मुक्काम करून दूस-या दिवशी सकाळी पुण्याच्या दिशेने जाणे सूज्ञपणाचे ठरले असते. परंतू माझ्यातील आयर्नमॅनने हा शुद्ध भेकडपणा समजून कोल्हापूरात मूक्काम करण्याचा विचार धुडकावुन लावला. कोल्हापूर ते पुणे हा सायकलप्रवास कैकवेळा केलेला आहे आणि त्यात रात्रीच्या वेळी तर खुपदा केलेला आहे. रस्ता पायाखालचा असल्यामुळे मीही प्रवास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. थकवा आलेला असल्यामूळे अतिशय निवांतपणे सायकल चालवत रात्री नऊ वाजता कराड गाठले. कराडमध्ये भरपेट जेवण केले आणि रात्री २ वाजता सातारा गाठला. जिथे चहाची टपरी दिसेल तिथे पाणी आणि चहा-बिस्कीट घेत राहीलो. रात्रीच्या प्रवासात स्टेडफास्ट न्युट्रिशनच्या पिनट बटरने भरपूर ऊर्जा दिली. खंबाटकी बोगदा येईपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. तिथे मी भरपूर विश्रांती घेतली. रात्रीच्या वेळेस असंख्य लोक भेटले, सायकलवरून गोवा करून आलोय म्हटल्यावर त्यांनी खूप कौतुक केले, ब-याचजणांनी  सेल्फी काढल्या, मोबाईल नंबर पण घेतला. जे प्रेरणा घेतील ते घेतील आपण आपले काम करत राहणे. बस एवढंच. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत सूर्योदय पहावयास मिळाला. मजल-दरमजल करत कात्रजचा बोगदा गाठला आणि बोगदा आला म्हणजे घर आले. तिथुनच सौ. ला फोन केला बोगद्याजवळ आलो आहे, हे ऐकल्यावर तिलासुद्धा खुप आनंद झाला. अशा रीतीने सहाव्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी घरी पोचलो.
पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे असे एकूण ८७५ किमी अंतर सहाव्या दिवशी सकाळी पुर्ण झाले. पुणे ते गोवा बरेचजण करतात परंतू घरापासून गोवा आणि गोव्यापासुन घर (पुणे) हे अंतर सायकलवर पार करणारा मी एकमेव तर म्हणता येणार नाही परंतु दूर्मिळ नक्कीच आहे. असंच आपलं जगावेगळं काहीतरी माझ्या हातून घडत राहो.















कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...