Friday 30 December 2016

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-१


      पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर मी अघाशासारखा सर्वांच्या पुढे गेलो नाही. "ब्रेवे जब ६०० की हो... तो तेज सायकल चलाने का कोई मतलब नहीं होता..." सहज आणि सुलभपणे जो वेग मिळेल त्या वेगात मी सायकल चालवत होतो. मला सुरुवातीपासुनच शरीरावर ताण घेण्याची आणि हृदयाची धडधड वाढवण्याची बिल्कुल ईच्छा नव्हती. तर भेटणारा प्रत्येकजण म्हणायचा "आज काय झाले? एवढा हळू का चाललाय?" आणि जोरात गेलो असतो तर हेच म्हणाले असते ८७ नंबर जोरात सुटलाय वगैरे. प्रत्येक ब्रेवेमध्ये मी जो आराखडा बनवतो त्याचेच कटाक्षाने पालन करतो. कोण काय म्हणेल याचा मी कधीही विचार करत नाही आणि करुही नये. आणि ईतर रायडर्स जे बोलतात ती त्यांची सहज प्रतिक्रीया असते, त्यात कोणाचाही ईतर काहीही उद्देश नसतो. पाषाणवरुन चांदणी चौकाकडे जाताना काही रनर्स उलट्या दिशेने धावत येत होते आणि त्यातल्या एकानेही रीफ्लेक्टीव घातलेले नवह्ते. खाली बघत सायकल चालवत जात असताना मी तर एकाला उडवलाच असता पण नशीब मी समोर पाहीले म्हणुन अनर्थ टळला नाहीतर माझी ६०० ची ब्रेवे ईथेच संपली असती. हे रनर्स उलट्या दिशेने का पळत येतात कोणास ठाऊक? यांना आपल्या सुरक्षेची काळजी नसते का? ब्रेवेमध्ये मी सहसा कोणत्याही टिममध्ये सहभागी होत नाही, स्वबळावर मी एकटाच सायकल चालवतो. पण जर कोणी माझ्याबरोबर येऊ ईच्छीत असेल आणि मला कोणताही अडथळा होणार नसेल तर माझी काहीही हरकत नसते आणि नसेलही. यावेळेस माझ्याबरोबर वाघमारे सर आणि विशी उपाध्याय होते. ते माझ्या वेगात सायकल चालवत होते त्यामुळे मला काहीच प्रोब्लेम नव्हता. 

     ६०० च्या ब्रेवेमध्ये उपासमार होऊ नये म्हणून मी बरीचशी रसद सोबत घेतली होती. विशेषकरुन ही रसद रात्रीच्या वेळी कामी येणार होती जेव्हा हॉटेल्स आणि दुकाने बंद असतात. त्यामुळे मला कसलीही चिंता वाटत नव्हती. आज कापुरहोळजवळ एकही अपघात झालेला नव्हता हे विशेष नाहीतर दरवेळेस त्या चौकात एकतरी अपघात झालेलाच असतो. कापूरहोळच्या पुढे गेल्यावर शुभेच्छा देण्यासाठी राहुल कोंढाळकरचा फोन आला. सायकल थांबवुन त्याच्याबरोबर बोललो. त्याने दिलेल्या माहीतीनुसार धनंजय कोंढाळकर आणि युवराज सोनार यांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम सुरु झाली होती. त्यानंतर खंबाटकीच्या पायथ्याला जोशींच्या हॉटेलमध्ये चहा घेतला आणि खंबाटकीवर चढाई सुरु केली. आज बर्याच चारचाकी गाड्या बंद पडल्यामुळे घाटातील वाहतुक तुंबलेली दिसत होती. आम्ही सायकलवाले महागड्या कार्सना मागे टाकत घाटातुन न थांबता पुढे पुढे जात असताना त्या कार्सवाल्यांच्या पराभुत नजरा आमच्यावर रोखल्या जात होत्या. हतबल होऊन त्या तुंबलेल्या गर्दीत अडकुन पडले होते बिचारे. खंबाटकीच्या माथ्यावर थोडी विश्रांती घेऊन हृदयाची धडधड शांत केली. पाण्याचे घोट घशाखाली उतरवले आणि सातार्याकडे सुसाट निघालो. भुइंजच्या पुढे कृष्णा नदी ओलांडुन पाचवड मागे टाकले आणि वेण्णा नदी ओलांडुन सातार्यात प्रवेश केला. सातार्याकडे जाताना सातार्याचे दोन सायकलपटु भेटले. धनंजय जगताप हा  तर आयसीसी ग्रुप मेंबर निघाला. त्यामुळे त्याच्याबरोबर गप्पांचा ओघ वाढला. निरोप घेताना त्याने मला पतंजलीचा एनर्जी बार भेट म्हणुन दिला. सातार्यातील मुख्य पुलाचे काम अजुनही रेंगाळत चाललेले आहे मागच्या वर्षीसुद्धा हीच बोंब होती. सातार्यानंतरच्या खिंडीचा उतार सुरु होण्याअगोदर एक पाण्याची बाटली विकत घेतली. ईथुन आता डायरेक्ट चेकपॉईंट गाठायचा असे ठरवुन मी आणि विशी सुसाट निघालो. उतार संपल्यानंतर उजव्या हाताला प्रियांका शू मॉलची जाहीरात वाचली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे चपलांचे दूकान (मॉल) असा जाहिरातीचा फलक पाहीला. तेव्हाच ते पाहण्याची इच्छा झाली होती पण ब्रेवे मध्ये वेळ वाया घालवायचा नव्हता. जेव्हा कधी कारने या मार्गावर येइल तेव्हा नक्की भेट द्यायची असे ठरवुन मी पुढे निघालो. सातारा ते उम्ब्रज हे अंतर पार करताना नेहमीप्रमाणे ते गावागावात भुजंगासन करून थांबलेले फ्लायओव्हर्स म्हणजे एक डोकेदुखीच ठरते. त्यांच्यावर चढायचे आणि उतरायचे जीवावर येते. तरीसुद्धा या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी वेग वाढवला होता कारण खंबाटकीपर्यंत आम्ही म्हणावा असा वेग घेतलेला नव्हता. 

     पुढे या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स आणि त्यांना जोडलेल्या ट्रॉलीची गर्दी वाढायला लागली. हे ट्रॅक्टर्स सायकल चालवणार्यांना चांगलाच अडथळा निर्माण करतात त्याचे कारण म्हणजे यांचा संथ वेग. सायकलच्या वेगाशी साधर्म्य असल्यामुळे त्यांना ओव्हरटेक करुन पुढे जाताना इतर वाहनांचा खुप त्रास होतो आणि खुप काळजी घ्यावी लागते. पाठीमागुन कोणते वाहन येत आहे का यावर बारीक लक्ष ठेऊनच ओव्हरटेक केलेली बरी. उरमोडी आणि तरळी नदी ओलांडल्यानंतर आम्ही उम्ब्रजमध्ये आलो. तासवडे तोलनाक्याचा पहीला चेकपॉइंट आता फक्त ५ किमी राहीला होता. नक्की वेळ आठवत नाही पण साधारण सव्वाच्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो. ओमकार आणि योगेश रॅंदोनियर्सची वाट पाहत थांबलेले होते. आम्ही सही शिक्का घेऊन पाणी आणि केळींचा आस्वाद घेतला. ३०० ची ब्रेवेट करणारा अजुन कोणीही पोचला नाही असे योगेश म्हणाला. तेवढ्यात परीतोषसुद्धा पोचला. एक-दोन कार्सवाल्यांनी चेकपॉइंटवर थांबुन उंब्रजजवळ एका सायकलवाल्याला गंभीर अपघात झाल्याचे सांगितले. आमच्या सायकल्सकडे पाहुन तो आमच्यातलाच असावा असे समजुन सर्वजण आम्हाला त्या अपघाताची वार्ता देऊ लागले. एकामागोमाग एक असे बरेचजण आमच्याजवळ थांबुन अपघाताची माहीती सांगु लागले. परीस्थितीचे गांभीर्य ओळखुन ओंकारने कार काढली आणि त्वरीत अपघातस्थळी रवाना झाला. काय झाले? कोणाचा अपघात झाला? पुढे काय झाले? हे आम्हाला काहीही कळु शकले नाही.

     कराड जवळ यायला लागल्यावर आमच्या पोटात कावळे कोकलायला लागले होते. ठरल्याप्रमाणे आम्ही कराडमध्येच लंच करणार होतो. कराडकडे जातानासुद्धा पाठीमागुन येणारे बरेच कार्सवाले आम्हाला अपघाताची माहीती देतच होते. त्यांना आम्ही सांगायचो की आमचा माणुस कार घेऊन तिकडे गेला आहे. कराडमध्ये जाताना कोयना नदी ओलांडली. कराडमध्ये पोचल्यावर विशीने संगम हॉटेल निवडले पण तेथील गर्दी पाहुन मी काढता पाय घेतला आणि माझ्या नेहमीच्या गंधर्व पॅलेस हॉटेलमध्ये आलो. कराडमधला दुसरा फ्लायओव्हर संपला की लगेच डाव्या हाताला हे हॉटेल आहे. ईथे फ्रेश होण्याची सर्व व्यवस्था आहे. ताजातवाना झाल्यानंतर मी टोमॅटो सुप, व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंच्युरीयन मागवले. तेवढ्यात आशुतोष वाघमारे सरांचा फोन आला की कुठे आहात म्हणुन? मग त्यानाही आम्ही त्या हॉटेलमध्येच बोलावले. प्रत्येकाने आपापल्या आवडीचे पदार्थ मागवले. विशी, मी आणि वाघमारे सर एकत्र जेवलो आणि कोल्हापुरकडे निघालो. 

    कोल्हापुरकडे जाताना आम्हाला अक्षय आणि मनिश भेटले. मग आम्ही सायकल्सची ट्रेन तयार केली आणि  आमची सायकल एक्सप्रेस कोल्हापुरकडे सुसाट धावायला लागली. साधारण ३० किमी नंतर आमची ट्रेन विस्कटली. मी आणि विशी कोल्हापुरच्या दिशेने जाताना आम्हाला कमल भेटला. मग आम्ही कमलच्या मागोमाग निघालो. वारणा आणि पंचगंगा नदी ओलांडुन कोल्हापूरजवळ आलो तेव्हा सूर्यास्त व्हायला लागला होता. कागल एमआयडीसी आली तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली आणि आम्ही थंडीचा सामना करायला सज्ज झालो. अंधारातच कर्नाटकच्या सीमेमध्ये प्रवेश केला. सायकलवर मी पहील्यांदाच महाराष्ट्र राज्याची सीमा ओलांडत होतो. अंधारामुळे उतार कुठे आणि चढ कुठे तेच कळत नव्हते. पण सायकलला चांगला वेग मिळत होता. निप्पाणी मागे टाकल्यानंतर संकेश्वरचे वेध लागले. तवंदी घाटाची धास्ती होतीच मनामध्ये. पण तवंदी केव्हा सुरु झाला ते कळलेच नाही. थोडा चढ लागल्यावर जाणवले की हा तवंदी असावा. बराच वेळ सायकलवर बसल्यामुळे पायांच्या स्नायुंवर आलेला ताण कमी करण्यासाठी मी १०० मी अंतरापर्यंत सायकल हातात धरुन चालत चालत गेलो. चालल्यामुळे पायांच्या शिरा मोकळ्या झाल्यासारखे वाटायला लागले. घाट संपल्यावर उजव्या हाताला कावेरी हॉटेल दिसले. कर्नाटकातील संकेश्वर २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर राहीले असावे. आतापर्यंत साधारण २९० किमी अंतर पुर्ण झालेले होते. तवंदी घाट मागे टाकल्यानंतर त्यापुढच्या उताराचा रस्ता भन्नाट आहे. त्यावरुन मी सुसाट सायकल सोडली. तेवढ्यात माझा फोन वाजला आणि विशेष म्हणजे मी तो उचलला. विशीचा फोन होता..पंक्चर झाली म्हणाला. उतारामुळे मी जोरात पुढे आलो होतो. आमच्यामध्ये १ ते १.५ किमी चे अंतर पडले होते. उलट्या मार्गाने विशीकडे जायला निघालो तर उतारावरुन सर्व वाहने तुफान वेगात येत होती. ते पाहुन मी रॉंग साईडने (चूकीच्या बाजुने) जाण्याचे टाळले आणि तिथेच एका चौकात दिव्याखाली विशीची वाट पाहत थांबलो. उगीच अपघाताला आमंत्रण नको.

    यावेळात मी घरच्यांशी फोनवर बोलुन घेतले आणि व्हाटसअपवर काय काय आले ते पाहत होतो. तेवढ्यात एक ग्रामीण गृहस्थ (पेहरावावरुन) मोपेडवर (टिव्हीएस वगैरे) आला आणि माझ्या बाजुला थांबुन कन्नडमध्ये काहीतरी बडबडला. मला त्याची भाषा कळेना आणि त्याच्याबरोबर काय बोलावे तेही मला सुचेना.. मी फक्त त्याच्याकडे पाहत राहीलो. मी बोलत नाही पाहुन त्याने तोच प्रश्न दुसर्यांदा विचारला. यावेळेस त्याचा आवाज जरा वाढला होता. त्याने देशी घेतलेली होती. तिसर्यांदा तो दरडावलाच माझ्यावर. मी जर माझी दातखिळ उघडली नसती तर त्याने मला झोडपायला सुद्धा मागेपुढे पाहीले नसते. एवढा जोश आला होता त्याला. त्याच्या जोशमधला होश मी दुर केला असता तो भाग वेगळा. पण परमुलुखात पंगा नको म्हणून मी आपले मराठीत सांगुन टाकले, "मला कन्नड येत नाही..." मराठी भाषा ऐकुन ही पिडा टळेल असे मला वाटले होते. मी काय बोलतोय ते त्याला कळणार नाही आणि तो काय बोलतोय ते मला कळणार नाही. तु तुझ्या वाटेने मी माझ्या वाटेने. तर काय आश्चर्य तो म्हणाला, "कुठुन आलाय?" आईच्या गावात अन बाराच्या भावात..... त्याच्या मघाच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मी जास्त दचकलो. एवढ्या पटकन तर गुगल ट्रान्सलेटपण प्रतिसाद देत नाही. मग मी त्याला मराठीतच उत्तर दिले, "पूण्यावरुन सायकलवर आलोय..." आणि हे ऐकल्यावर तो उडाला. निम्मी उतरली त्याची. आलटुन पालटुन माझ्याकडे आणि माझ्या सायकलकडे पाहु लागला. कुठे चाललाय? कशासाठी करताय? बक्षिस आहे का? हे सामान्य प्रश्न विचारुन त्याने मला खुप बोअर केले. त्याला कटवण्यासाठी काय करावे सुचत नव्हते. शेवटी कसाबसा त्याला कटवला आणि सुटकेचा निश्वास टाकला.

    विशी आणि कमल आले आणि उतारावरुन सुसाट गेले. जाता जाता मला चलो चलो म्हणुन हात दाखवुन पुढे निघुन गेले. मी त्यांची वाट पाहत थांबलो होतो का दुसर्या कोणाची मला तेच कळाले नाही. त्यांच्या मागुन मीही निघालो. संकेश्वर आता जवळ येत चालले होते. रस्त्यात भेटेल त्या व्यक्तीला मी संकेश्वर कुठे आहे? असे आवर्जुन विचारत होतो. येथील लोकांना मराठी समजते हे मला चांगलेच कळुन चुकले होते त्यामुळे मी सरळ मराठीतच विचारत होतो. एक डावीकडे जाणार छोटा रस्ता दिसला पण तो संकेश्वरकडे जाणारा नव्हता. पुढे गेल्यावर संकेश्वरची पाटी आणि डावीकडे जाणारा बाण दर्शवलेला होता. पण तो रोड हायवेला समांतरच होता. पाटीवर विश्वास ठेऊन त्या सर्व्हीस रोडवर सायकल घातली. पुढे गेल्यावर संकेश्वरचा फ्लायओव्हर आणि डावीकडे संकेश्वरमध्ये जाणारा रस्ता दिसला त्यावरुन हा रस्ता संकेश्वरचाच आहे याची खात्री पटली. रस्त्यात भेटणार्या प्रत्येकाला आता मी हॉटेल राजधानी कुठे आहे ते विचारत होतो. हॉटेल राजधानी म्हणजे आमचा चेकपॉइंट होता. काही लोक उत्सुकतेपोटी कन्नडमध्ये प्रश्न विचारत होते, मी कन्नड येत नाही म्हटल्यावर लगेच मराठीत प्रश्न यायचा. त्या दमलेल्या अवस्थेतही मी यथाशक्ती त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होतो. सायकलवर जाता जाता संकेश्वरमध्ये अमिर खानच्या दंगल सिनेमाचे पोस्टर पाहीले. ही ब्रेवे संपल्यावर मीसुद्धा आमिरचा दंगल बघणार आहे. हॉटेलचा पत्ता विचारण्यासाठी सारखे थांबावे लागत असल्यामुळे मला थोडा उशिरच झाला. ९ वाजुन २५ मिनिटांनी मी हॉटेल राजधानीवर पोचलो. कमल माझ्या मागोमागच आला. योगेश शिंदे तिथेच होते. मी ब्रेवेट कार्डवर सही शिक्का घेतला आणि लगेच हॉटेल राजधानीच्या सेवकाला रात्रीच्या भोजनाची ऑर्डर दिली. पुन्हा तोच मेनु टोमॅटो सुप आणि व्हेज फ्राईड राईस. अशा रितीने ३०० किमीचा निम्मा प्रवास मी विशीबरोबर पुर्ण केला. या प्रवासाला जवळजवळ १५ तास १५ मिनिटे लागली.   
क्रमश:
भाग २ साठी क्लिक करा

या ब्रेवेची स्ट्रावावरील अ‍ॅक्टिव्हीटीसाठी क्लिक करा..



ब्रेवेमध्ये टोमॅटो सुपनेसुद्धा नशा येते

STRAVA ACTIVITY



टोमॅटो सुप आणि व्हेज मंच्युरीयन



आशिश जोशीबरोबर साई इंटरनॅशनल पहाटे ३ वाजुन ५० मिनिटे

हॉटेल राजधानीमध्ये कमलने काढलेला फोटो


फिनिशला पोचल्यावर सौ. शी बोलताना

राहुल कोंढाळकर आणि राहुल गाढवे यांनी फिनिशला केलेले स्वागत

राहुल कोंढाळकर आणि राहुल गाढवे यांनी फिनिशला केलेले स्वागत
सोबत ओमकार आणि अमित भरते

कमल

परीतोश


Finishers


proud finisher

Finisher using MTB

Drop bags

proud finishers

Finisher


Aashutosh Waghmare & other finishers

Yogesh Bhat


Before Kolhapur from left Vijay Vasve, Kamala and Vishi



proud finisher

RIP Dr. Shekhar Bendre


Hotel Gandharv palace Karad


माझ्या बंधुने ब्रेवे चालु असताना पाठवलेली बातमी आणि काळजीचा मेसेज...


Tuesday 27 December 2016

माझी पहीली हाफ मॅरेथॉन

माझी पहीली हाफ मॅरेथॉन

       ब्रेवे (बीआरएम) करताना मी कधीही पळ काढलेला नाही पण ब्रेवे करता करता मला पळण्याची सवय अवश्य लागली. ब्रेवे करणारे बरेचसे मित्र धावण्यातही अग्रेसर आहेत. त्यांच्याच संगतीचा परीणाम दुसरे काय. सायकलिंगसाठी लागणाऱ्या पायाच्या स्नायुंना थोडा वेगळा व्यायाम मिळावा म्हणून मी कधीतरी ५ किमी धावण्याचा सराव करतो आणि तेही ६०० सारखी मोठी ब्रेवेट जवळपास आलेली असेल तर.  यावर्षी तर मी कहरच केला ५ किमी धावता धावता १० किमी दोन वेळा पळालो. पहील्यांदा धावलो तेव्हा ३ दिवस पाय खुप दुखत होते. दुस-यांदा १० किमी धावलो तेव्हा मात्र काहीच त्रास जाणवला नाही.  आणि इथेच सगळा घोळ झाला तो असा की या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे मला २१ किमी धावण्याची दुर्बुद्धी सुचली. हो दुर्बुद्धीच. त्यात भर म्हणजे टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना रोटरी क्लबच्या रनॅथॉनमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रवेश फीसुद्धा भरण्याची गरज नव्हती. टाटा मोटर्सही या स्पर्धेचे एक प्रायोजक आहेत. फुकट ते चांगलेच. मग काय मागचा पुढचा विचार न करता अर्ध्या मॅरेथॉनला (रनॅथॉन) नाव नोंदणी केली. नाव दिले की काम झाले. रनॅथॉनचा टि-शर्ट, टाईमचिप आणि बिब नंबर (१५६४) आदल्या दिवशीच मिळाले होते. आता फक्त प्राधिकरणात जाऊन धावाधाव करण्याचे काम बाकी होते. माझी पहीलीच हाफ मॅरेथॉन असल्यामुळे मी अनुभवी मित्रांशी सल्लामसलत करुन माझ्या शंका-कुशंका दुर करुन घेतल्या आणि २१ किमी धावण्यासाठी सज्ज झालो.

आदल्या दिवशी बिब नंबर आणि टि-शर्ट मिळाला.
        मॅरेथॉनच्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे साडेचारला ऊठावे लागले. सर्वकाही आटोपुन बायपास मार्गाने साधारण ६ वाजता प्राधिकरणातील शिवाजी चौकात पोचलो. एक छानसा आडोसा शोधुन गाडी पार्क केली जेणेकरुन जॅमर लागला जाणार नाही आणि रनॅथॉनच्या स्टार्ट पॉइंटला पोचलो. तिथली जय्यत तयारी पाहुन तर माझे डोळेच दिपले. अनोळखी ठिकाणी अनोळख्या स्पर्धेत जर ओळखीचे कोणी भेटले तर खुप दिलासा मिळतो. तिथे मला आयसीसी सायकल ग्रुपमधील मित्र भेटले. ते या स्पर्धेसाठी वोलंटीयर म्हणून काम पाहणार होते. अजित पाटील, गजु, विशी, मंदार आणि इतर बरेचजण होते. त्यांनी मला खुप शुभेच्छा दिल्या. स्पर्धेची सगळी व्यवस्था चोख होती. त्या मोकळ्या मेयर बंगलो प्लॉटमध्ये डीजेचा आवाज मस्त घुमत होता. तीन ते चार ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावलेल्या होत्या. त्या स्क्रीनवर स्पर्धेच्या इतर सुचनांबरोबर रनॅथॉनचा नकाशासुद्धा दाखवला. मला तेच हवे होते. त्यानंतर थोड्याचवेळात रिता जाधव यांचा झुंबा नाच चालु झाला. त्या झुंबाच्या तालावर मी थोडे आळोखे पिळोखे देऊन अंग मोकळे करुन घेतले. त्यानंतर पायांची थोडी ताणाताण सुद्धा करुन घेतली. २१ किमी धावण्याचे आव्हान मला पेलेल की नाही याबाबत मी जरा साशंक होतो. पण आदल्यादिवशीच फेसबुकवर बिब नंबरचा फोटो वगैरे टाकुन ढिंढोरा पिटलेला होता की २१ किमी धावायला चाललोय म्हणून. आता एवढी पोस्ट टाकलीच आहे तर करु या पुर्ण रनॅथॉन. उगीच हाराकीरी नको. जिवाभावाच्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा वाया तरी कशा जाऊ द्यायच्या. हे फेसबुक ना मला कधी कधी एक अदृश्य किंवा एक आभासी प्रेरणा देऊन जाते. जे मला वाटते माझ्यासाठी चांगले आहे. जे जे चांगले ते ते घ्यावेच. 

स्पर्धा सुरु होण्याअगोदर


       ६:३० वाजत आले तरीही स्पर्धा सुरु झालेली नव्हती. काही स्पर्धक उभे राहुन राहुन कंटाळले होते त्यामुळे त्यांनी "लवकर चालु करा...लवकर चालु करा" अशा मोठमोठ्याने आरोळ्या दिल्यानंतर आम्हाला एकदाचे रांगेत ऊभे राहायला सांगण्यात आले. टाईमचिप हा प्रकार मी पहील्यांदाच पाहत होतो आणि तो घेऊन धावणार होतो. मी माझा भरोसेमंद साथी स्ट्रावा चालु केला आणि मोबाईल खिशात ठेऊन दिला. मला स्ट्रावाशिवाय करमत नाही. सायकल चालवायची असो वा पळण्याचा व्यायाम असो मी पहीले स्ट्रावा चालु करतो आणि मगच शुभारंभ करतो. मला स्ट्रावाफोबिया झालाय की काय कोणास ठाऊक? 

      फ्लॅग ऑफ झाल्यानंतर सगळे सुसाट पळत सुटले. त्या पिवळ्या टी-शर्टच्या गर्दीतुन कशीबशी वाट शोधत मीही गती घेण्याचा प्रयत्न करु लागलो. कोणालाही धक्का दिला नाही आणि कोणाचाही धक्का खाल्ला नाही. केवढा हा सुसंस्कृतपणा म्हणायचा! त्या पिवळ्या टि-शर्ट्मध्ये सगळे "यलो यलो डर्टी फेलो दिसत होते". त्या गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी मी थोडा वेग वाढवला आणि गर्दीतुन बाहेर पडलो. मग थोडे मोकळे मोकळे वाटु लागले. सकाळचे थंड वातावरण धावण्यासाठी पोषक वाटत होते. एकच किमी धावलो नाही तोच लगेच घशात कोरड पडायला सुरुवात झाली. घशाला चांगलाच दम भरला आणि किरकिर करू नकोस अशी विनंतीही केली. २१ किमी पळायचे आपल्याला आणि तु एवढ्या लवकर किरकीर करायला सुरूवात केली. थोडा शांत झाला बिचारा. एवढ्या पहाटे मी कधीही धावायचा सराव केलेला नव्हता. मी नेहमी संध्याकाळच्या वेळेस धावतो.  पहीलीच अर्धी मॅरेथॉन आणि पहील्यांदाच एवढ्या सकाळी सकाळी पळत होतो. त्यामुळे घशाला कोरड पडली असावी असे मला वाटले. काही धावपटु हातात कसलातरी फलक घेऊन धावत होते. बारकाईने वाचल्यावर त्यावरील मजकुर कळला. २१ किमी २ तासांमध्ये. २१ किमी अडीच तासांमध्ये आणि सव्वादोन तासांमध्ये वगैरे. म्हणजे हे लोक पेसर्स होते बहुतेक. अर्धी मॅरेथॉन २ तासांमध्ये पुर्ण करायची असेल तर २ तासांचा फलक घेऊन धावणाऱ्या लोकांबरोबर धावावे एवढे मला कळले. काही अंतर सरळ मार्गाने धावल्यानंतर डावीकडे वळालो. जिथे वळण होते त्या ठिकाणी रस्त्यावर पांढरे बाण काढलेले होते त्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. आयसीसी ग्रुपचे मेंबर्स सायकलवरुन पहारा देत होते. "कमॉन विजय" म्हणत ते माझा पळण्याचा उत्साह वाढवत होते. पुढे गेल्यावर युटर्न घेतला. तिथे पाण्याच्या बाटल्या देत होते. मी पळता पळताच तिथल्या माणसाने हातात धरलेली पाण्याची बाटली हिसकावुन घेतली आणि तिचे झाकण गर्रकन फिरवले. पाण्याचे काही घोट घशाखाली गेल्यावर त्याची किरकिर थांबली. २०० मिली पाणी प्यायलो आणि ती बाटली पळता पळताच कचरा पेटीकडे भिरकावली. माझा नेम चुकला आणि ती बाटली कच-याच्या बॉक्समध्ये न पडता रस्त्यावर पडली. अरेरे स्वच्छ भारत अभियानाची मी वाट लावली होती. पण माझ्याकडे पर्याय तरी कुठे होता. पळता पळता ५ किमी कसे पुर्ण झाले ते कळले देखील नाही. एका क्षणाचीही उसंत न घेता मी शक्य होईल त्या वेगाने अंतर कमी कमी करत होतो. 

      रेल्वेपुलाखालुन जाणारा रस्ता आणि भोंडवे चौक मागे टाकत रावेतच्या संत तुकाराम पुलावर चढलो. रावेतमध्ये संत तुकाराम पुल कोठुन आला हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्याला आपण रावेतचा बास्केट ब्रीज म्हणतो त्याचे नाव संत तुकाराम पुल आहे. कळलं? पुलाच्या दुतर्फा ट्रॅफिक पोलिस आणि बरेचसे स्वयंसेवक आमच्या मार्गातील वाहनांना बाजुला करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पुल ओलांडल्यावर पुन्हा पाण्याची बाटली मिळाली. घाम पुसण्यासाठी छोटासा रुमालसुद्धा मिळाला. एनर्जल, संत्र्याच्या फोडी आणि लेमनच्या गोळ्या एका मोठ्या थाळीमध्ये पळणा-यांच्या समोर धरल्या जात होत्या. ज्याला जे आवडेल तो ते उचलत होता. या पट्ट्यामध्ये दोन लॅप करायच्या होत्या. पहीली लॅप पुर्ण केल्यावर माझ्या डाव्या हातावर भिंतीला रंग देण्याच्या ब्रशने बादलीतील शाईचा एक फटकारा ओढला गेला. आयसीसी क्लबच्या मित्रांनी पुन्हा माझा उत्साह वाढवला. अजितने मी पळत असताना माझ्याबरोबर सायकलसह सेल्फी काढली. 

अजितने काढलेला सेल्फी फोटो
     दुस-या लॅपसाठी त्याच मार्गावरुन पुन्हा धावण्याचा खुपच कंटाळा आला होता. आता अधुन-मधुन मी खिशातला मोबाईल काढुन स्ट्रावाचा आढावा घेत होतो. अजुन किती राहीलंय? एवढा एकच प्रश्न सारखा मनात यायचा. सुरुवातीला जोरात पळालेले काही धावपटु आता दमलेले दिसत होते. अधुन-मधुन ते पळण्याऐवजी चालत चालत प्रवास करत होते. मी त्यांना मागे टाकत पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. दुसरी लॅप पुर्ण करुन पुन्हा त्या पुलावर आल्यावर खुप दिलासा मिळाला. एक मानसिक समाधान की आता थोडेच अंतर राहीले आहे. भोंडवे चौकातुन रेल्वे मार्गाखालुन निगडी चौकाकडे निघालो. तिकडे जाताना थोडा थोडा चढ जाणवायला लागला. बर्याचशा थकलेल्यांना मी मागे टाकत होतो. त्या चढावरुन पळताना पाय दुखायला लागले होते. मग मी तिरके पळायला सुरुवात केली. ऊंटाची चाल. तिरक्या चालीमुळे पायांवरील ताण कमी व्हायला लागला. शेवटचे २ किमी अंतर बाकी असताना पायाला मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. पण जशी जशी फिनिश लाईन जवळ यायला लागली तसा तसा माझा उत्साह वाढायला लागला होता. मी जरी ईतरांना मागे टाकत पुढे आलो असलो तरी मला एका महीलेने मागे टाकले. मी आश्चर्यचकीत झालो पण कौतुकही वाटले. 

     फिनिशलाईनच्या जवळ आलो तेव्हा तिथे लहान मुलांची शर्यत चालु होती. फिनिशलाईनजवळ शक्य  होईल तेवढ्या जोरात पळालो आणि आणि माझी पहीली अर्धी मॅरेथॉन मार्गी लावली. आयुष्यात मी पहील्यांदाच २१ किमीची धावाधाव केली. थोडा मोकळा श्वास घेतला आणि खिशातला मोबाईल काढला. स्ट्रावाच्या आकड्यांवर नजर टाकली तेव्हा २ तास १३ मिनिटे झालेली होती. तिथेच एका मुलाकडुन माझा फोटो काढुन घेतला आणि मेडलसाठी शोधाशोध करु लागलो. मेडल्स संपली होती. एवढी धावाधाव करुन मेडल नाही म्हटल्यावर मी खुप दुखी झालो. रोटरी क्लबकडे मेडल वाटण्याची काहीच व्यवस्था नव्हती. ५, १० किमी पळणारे गळ्यात मेडल अडकवुन फिरत होते आणि मी २१ किमी पळूनही माझ्याकडे मेडल नव्हते. शेवटी पुन्हा आयसीसीचे मित्र भेटले आणि त्यांना माझी व्यथा सांगितली. गजुने लगेच शोधाशोध करुन माझ्या मेडलची व्यवस्था केली. खुप खुप धन्यवाद रे गजु!! 

     पळुन झाल्यावर बर्याच जणांनी डिजेच्या तालावर नाचण्याची हौस पुर्ण करुन घेतली. वरातीमध्ये नाचतात तसा डान्स पहायला मिळाला. नाचगाणे आटोपल्यानंतर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले आणि बक्षिस समारंभ सुरू झाला. पहीला आला तो कोल्हापुरचा पाटील. त्याने १ तास ७ मिनिटांत ही अर्धी मॅरेथॉन पुर्ण केली. एकेक मिनिटाच्या अंतराने दुसरा आणि तिसरा नंबर आला. बक्षिस समारंभ आटोपुन मी तिथुन निघालो. 

अशा रीतीने माझी पहीली अर्धी मॅरेथॉन पुर्ण झाली. टाटा मोटर्सचे खुप खुप धन्यवाद!!

*या स्पर्धेचे सर्व निकाल आणि धावपटुंच्या वेळा ऑनलाईन उपलब्ध आहेत*
येथे क्लिक करा!
 Search for BIB no.1564 (My Photos and Videos are there)

FINISH LINE

DOWN and DUSTED 21 KMs



बचेंगे तो और भी लढेंगे









With winner in the center Sachin B Patil 








 




Thanks & Regards
Vijay Vasve (विजय वसवे)
9850904526                                                                                                                   

Thursday 8 December 2016

महापौर चषक सायकल स्पर्धा, ठाणे

रोडबाईक्सचा रणसंग्राम

दादोजी कोंडदेव स्टेडीयम, ठाणे

महापौर चषक सायकल स्पर्धा, ठाणे

(कला-क्रिडा महोत्सव ठाणे महानगरपालिका)

     ठाणे महापौर सायकल स्पर्धेची मला जेव्हा माहीती मिळाली तेव्हा ४० वर्षावरील पुरूषांची ही सायकल स्पर्धा हायब्रीड सायकलवर घेतली जाईल असे वेबसाईटवर दिसत होते. माझ्याकडे ट्रेकची हायब्रीड सायकल असल्यामुळे मी या रेसमध्ये भाग घ्यायचे ठरवले. परंतु जेव्हा स्पर्धा जवळ आली तेव्हा आयोजकांनी हायब्रीड श्रेणी रद्द करून कोणतीही सायकल वापरता येईल असे सांगितले. कोणतीही सायकल म्हणजे त्यात रोडबाईक आलीच. रोडबाईकच्या वेगाशी हायब्रीडचा वेग स्पर्धा करू शकत नाही याची मला पूर्ण कल्पना असुनही मी माघार घ्यायची नाही असे ठरवले. मला सायकल रेसमध्ये सायकल चालवण्याचा अनुभव घ्यायचा होता. आणि यातील सहभागामुळे मला व्यवसायिक सायकलपटुंचे सायकल चालवणे आणि त्यांच्या सायकल्स पहायला मिळणार होत्या. दुसरे म्हणजे सहभागी होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नव्हती आणि बाहेरगावावरून येणाऱ्या खेळाडुंसाठी जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. अजुन काय हवंय मग? मला फक्त पेट्रोलचा खर्च येणार होता आणि तोही माझ्या मारूती ८०० ला इतर वाहनांपेक्षा कमी येतो. तर मग चला "टुर द ठाणे" करूच असे ठरवले.

ड्युक्स नोज
     सर्व तयारी करून शनिवारी दुपारीच घर सोडले आणि NH4 वरून लोणावळ्याकडे निघालो. ट्रेक ७.२ ला कारमध्ये मागच्या बाजुला झोपवले होते त्यासाठी मागचे सीट आडवे केलेले होते आणि दोन्ही चाके काढलेली असल्यामुळे सायकल सामावण्यास कोणतीही अडचण आली नाही. आजपासुन तोलनाक्यावर पैसे घ्यायला सुरूवात झालेली होती. सरकारी योजनांचा आणि माझा छत्तिसचा अाकडा आहे. कधीच कसल्या सवलतींचा फायदा मिळाला नाही आणि मिळेल असेही वाटत नाही. ईथे तर साध्या तोलमाफीचाही फायदा मिळाला नाही. त्यामुळे सोमाटणे टोलनाक्यावर १०१ रुपये  ची पावती घेतली थेट ठाण्यापर्यंत. ठाण्याला जाईपर्यंत आता कोणताही तोल भरावा लागणार नव्हता. खंडाळ्यानंतर ड्युक्स नोजचा फोटो घ्यायला थांबलो. त्यानंतर कुठेही न थांबता प्रवास सुरू ठेवला. वाशीफाट्यापासुनच हळूहळू ट्रॅफिक वाढायला सुरूवात झाली होती. ऐरोलीच्या अलीकडे जे बंपर टु बंपर ट्रॅफिक चालु झाले ते कळवा ब्रीज संपेपर्यंत काही संपले नाही. मला तर असे वाटायचे की फक्त पुण्यातच वाहतूक व्यवस्थेची बोंब आहे पण ठाण्यात तर पुण्यापेक्षाही आनंद आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम गुगल मॅपवर लॉक केलेले होते आणि मी मॅप डोळ्यासमोर धरूनच गाडी चालवत होतो. गुगल मॅपमुळे मोबाईलची बॅटरी पटपट उतरत होती. दुपारी २ वाजता सुरू केलेला प्रवास ७ वाजत आले तरीही संपण्याचे नाव घेत नव्हता. आज ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करून माझी वाट लागली होती. कळवा ब्रीज पार करेपर्यंत कळा आल्या होत्या. हेच अंतर सायकलवर पार करायला मला ६ तास लागले असते. तो कळवा ब्रीज ओलांडल्यानंतर दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पोचायला फारसा वेळ लागला नाही. पार्कींगची जागा मिळायला त्रास होणे अपेक्षित होते पण स्टेडीयमच्या फाटकाबाहेरच व्यवस्थित जागा मिळाली.


    स्टेडीयमच्या आजुबाजुला ठाणे सायकल स्पर्धेचे फ्लेक्स सगळीकडे झळकत होते. स्पर्धकांचे प्रवेशअर्ज भरून घेण्यासाठी सर्व स्टाफ सज्ज होता. सर्व व्यवस्था चोख होती. प्रवेश अर्ज आणि वैद्यकीय तपासणी अर्जावर नाव, पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, मोबाईल नंबर लिहुन सही केली. १६८ सेंमी ऊंची, ६८ किलो वजन, ९१ शुगर आणि १३०/८० बीपी. माझ्यासाठी हिमोग्लोबीनचे रिडींग महत्वाचे होते पण ते काही मिळाले नाही. मी ज्यांच्याबरोबर फोनवर बोललो होतो ते विजय अहिरे भेटले. मला बिब नंबर ३४ चे दोन स्टिकर मिळाले.

BIB No. 34 Vijay Vasve
     संयोजकांसाठी टीशर्ट, झेंडे, बिल्ले आणि इतर साहीत्य येऊन पडलेले होते. मी राहण्याच्या व्यवस्थेविषयी विचारले तेव्हा मला थांबण्यास सांगण्यात आले. स्टेडियमपासुन रूमवर जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली होती. माझ्याकडे कार असल्यामुळे मी मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता विचारला, तर सुनिल धुरी माझ्याबरोबर यायला तयार झाले. "दोस्ती इंपिरीया" मानपाडा, घोडबंदर रोडला आम्ही निघालो आणि धुरींच्या मार्गदर्शनाखाली मी गाडी चालवल्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. धुरींबरोबर सायकल स्पर्धा आयोजनाविषयी चांगली चर्चा झाली. 
रात्रीचे जेवण


मंडप व्यवस्था

दोस्ती इंपिरीया, मानपाडा

          तळमजल्यावर मांडव टाकुन स्वयंपाक आणि जेवण एकत्र चालु होते. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. जेवण उरकल्यावर मी रूमची काय व्यवस्था किंवा अवस्था आहे? रूम्स कशा आहेत? पाणी वगैरे आहे का? हे सर्व पाहण्यासाठी गेलो. मला १३२२ नंबरच्या रूममध्ये टाकले होते. म्हणजे १३ वा मजला आणि २२ नंबरची रूम आणि कोल्हापुराहुन आलेले डॉ. भांगे हे चावी घेऊन गेले आहेत अशी माहीती मिळाली. मी लिफ्टने १३व्या मजल्यावर पोचलो आणि पाहीले तर २२ नंबरच्या रूमला कुलुप होते. डॉ. भांगे कुठे गायब होते कोणास ठाऊक? झोपायची वेळ होत आली तरीही भांगे येइनात म्हणून आम्ही रूम बदलुन देण्याची विनंती केली. रूम नंबर २८ मध्ये झोपण्याची तयारी केल्यानंतर डॉ भांगे प्रकटले मग पुन्हा २८ नंबरमधला बिछाना २२ नंबरमध्ये आणला. कुठे गेला होता विचारल्यावर डॉक्टरने सांगितले की मित्राकडे दुध प्यायला गेलो होतो. डॉक्टरसुदधा ४० वर्षावरील शर्यतीत सायकल पळवणार होते. मग एखाद्या व्यवसायिक सायकलपटुप्रमाणे कोणी आहे का ४० च्या गटात म्हणून चौकशीही केली त्यांनी. रूममध्ये आम्ही चौघेजण होतो. दुसरा एकजण म्हणाला ४०च्या गटात १ किंवा २ च जण भारीतलेे रेसर आहेत, तुम्हाला एवढी स्पर्धा नाही. ते ऐकुन डॉक्टर खुष झालं. त्यात मीही सांगुन टाकलं की माझ्याकडे रोडबाईक नाहीये. डॉक्टरकडे मेरीडा रीयाक्टो५००० रोडबाईक होती. बिब नंबर जर्सीला लावण्यासाठी डॉक्टरने मला दोन सेफ्टी पिन्स दिल्या.

Merida Reacto5000
     दुसरा रूमपार्टनर म्हणाला की या सायकलला टाईमट्रायल म्हणतात आणि त्याने बॉक्समधील त्याची रोडबाईक जोडायला घेतली. माझे सायकलिंगचे सर्व साहीत्य कारमध्येच होते, फक्त पांघरून घेऊन मी रूममध्ये आलो होतो. पडल्या पडल्या मला झोप लागण्याचे सुख मिळाले नाही कारण रूम पार्टनर फार बडबड करणारे होते. डॉक्टर तर दर तासाला ऊठुन काहीतरी खुडबुड आवाज करत होते. मला १ वाजता जाग आली, २ वाजता जाग आली आणि ३ वाजता जाग आली, जेव्हा जेव्हा जाग आली तेव्हा तेव्हा डॉक्टरचा काहीतरी खटाटोप चाललेला असायचा. मी ३ः३० ला रूम सोडली आणि कारकडे निघालो.



    कारमधून सायकल बाहेर काढली आणि दोन्ही चाके जोडुन एक चक्कर मारून पाहीली. काहीही समस्या जाणवली नाही. नंतर पोटात थोडी भर टाकली आणि मी तीन हात नाक्याकडे निघालो. गुगल मॅप जिंदाबाद! कोणत्याही अनोळखी ठिकाणी रस्ते शोधण्यासाठी हा एक आपला हमसफरच. तीन हात नाक्यावर पोचलो तेव्हा तिथे तयारी चालु होती. फिनिशचा बोर्ड लावलेला होता. त्याच्या विरूद्ध बाजुला रेस सुरू होणार होती. म्हणून मी पलीकडे जाऊन थांबलो. हजेरीपत्रकावर BIB नंबर समोर नाव लिहुन सही केली. 

रेस सुरु होण्याची वाट पाहणारे स्पर्धक

पहीला फ्लॅग ऑफ

मिर्झा बेग बिब नं १
     खुप वेळ वाट पहावी लागल्यानंतर ४०च्या वरील पुरूषांना लाईनअप करायला सांगण्यात आले. मी स्ट्रावा चालु करून मोबाईल खिशात ठेवुन दिला आणि रस्त्याच्या पलीकडे निघालो.

            ५...४...३...२...१...०... सर्व सायकलपटु सरसावले आणि सुसाट निघाले. लाईनअपमध्ये मी मागेच होतो. त्यामुळे मी सपासप अंतर कापत पुढे निघण्याचा प्रयत्न करत होतो. लगेचच एका प्लायओव्हरचा चढ सुरू झाला. एका लॅपमध्ये असे ७ फ्लायओव्हर वरखाली करावे लागणार होते. मी ऑफसाईडने जोरात पॅडल मारत सर्वांच्या पुढे निघालो. अजुन तरी कोणी म्हणावा असा अॅटॅक केलेला नव्हता. रोडबाईक्सवाले एकमेकांचा अंदाज घेत आक्रमण करू की नको अशा मूडमध्ये दिसत होते. माझी हायब्रीड सायकल घेऊन मी १ मिनिट सर्व रोडबाईक्सच्या पुढे रेस लिड केली. तोपर्यंत मला ही रेस फार सोपी वाटत होती. त्यानंतर एकाने डाव्या बाजुने जोरदार अॅटॅक करायला सुरूवात केली. रोडबाईकवर जोरात मारलेल्या दोनच पॅडल्समुळे मी मागे फेकलो गेलो. आणि माझ्या शेजारून जाताना मला त्या बाईकची हवाही लागली. एवढा प्रचंड अॅटॅक होता तो. एका रोडबाईकने आक्रमण केल्यावर त्यामागोमाग सर्व रोडबाईक्सने जोरदार आक्रमण करून प्रचंड वेग वाढवला आणि क्षणार्धात त्या १०-१५ रोडबाईक्स माझ्या नजरेसमोरून क्षणार्धात नाहीशा झाल्या.

    मी हळू नव्हतोच, आतापर्यंत कधीही न घेतलेला वेग मी घेतलेला होता. किंबहुना माझ्या सायकलने एवढा वेग कधीही पाहीलेला नव्हता. रोडबाईक्स उधळल्यानंतर आम्ही एकसारख्या वेगाने जाणारे ३-४ जण एकत्र सायकल चालवु लागलो. त्यात एक एमटीबी आणि एक सिंगल स्पीड रोडबाईक होती. मी ठरवलं की कमीत कमी यांना तरी हारवायचंच....काहीही होवोत. एमटीबी चालवणारा बिब नंबर १ होता आणि त्याने गोप्रो कॅमेरा हेल्मेटला लावलेला होता. "कोई चिटींग करेगा तो कॅमेरामें आनेवाला है..." सायकल चालवता चालवता तो म्हणत असे. पण खुप चिकाटीने सायकल चालवत होता. कधी कधी तो माझ्या पुढेही जात असे. सिंगल स्पीड रोडबाईक आमच्या खुप पुढे गेली होती. आम्ही जेव्हा पहीली लॅप पुर्ण करून यू टर्न घेऊन निघालो तेव्हा खुल्या गटातील रोडबाईक्स वाऱ्याच्या वेगाने आम्हाला मागे टाकत क्षणार्धात नाहीशा झाल्या. त्यावेळी मिर्झाच्या सायकलचा वारा मला जाणवला. माझ्या शेजारुनच गेला तो. दुसऱ्या लॅपमध्ये युटर्न कुठे आहे ते मला लवकर कळलेच नाही. दोनदा चुकीच्या ठिकाणी थांबलो.

   दुस-या लॅपमध्ये शेवटचा यूटर्न घेतल्यावर मी माझा वेग वाढवला. ते दोघेही माझ्या पुढे होते. थोड्या अंतरावर एमटीबीला ओव्हरटेक केली पण तो फारच चिवट होता. माझ्या मागेच येत होता. अजुन थोडी वेगात सायकल घेतल्यावर पुढचा रोडबाईकवाला दिसला. त्याला गाठता गाठता शेवटचा फ्लायओव्हर आला. तसाच वेग कायम ठेवत शेवटच्या फ्लायओव्हरच्या चढावर मी सिंगल स्पीड रोडबाईकला ओव्हरटेक केली. तोही फार चिवट होता. लगेच माझ्या चाकामागे चाक घेऊन आला. फिनिशला खुप झुंज द्यावी लागणार हे उघड दिसत होते. फ्लायओव्हरचा छोटासा उतार सुरू झाल्यावर मी टॉप गियरमध्ये गेलो आणि जेवढ्या वेगात पँडलवर पाय फिरवता येतील तेवढ्या वेगात फिरवू लागलो. आयुष्यातील पहीली रेस पुर्ण करताना 'जो जिता वोही सिकंदर' मधील रेसचे दृश्य डोळ्यांसमोर तरळले होते. फिनिशच्याजवळ मी खुप जोरात सायकल चालवल्यामुळे आमच्यामध्ये अपेक्षित असलेली अटीतटीची लढत झाली नाही.

   आमच्या वयोगटातील रेस केव्हाच संपली होती. ४२ किमी अंतर १ तासामध्ये पुर्ण करण्यात आले होते. माझ्याकडे रोडबाईक असती तरी फार काही फरक पडला असता असे मला वाटत नाही कारण रोडबाईकवर माझा सरासरी वेग ३४ ते ३५ च्या वर गेला नसता एवढे नक्की आणि हा वेग या स्पर्धेसाठी किरकोळ स्वरूपाचा होता. अभेद्य वेग असणाराच या स्पर्धेत जिंकु शकतो असे माझे वैयक्तीक मत बनले. अभेद्य वेग म्हणजे कोणीही आणि कितीही आक्रमण करून मागे टाकता येऊ न शकणारा. जमेची बाजु म्हणजे पुण्याच्या दोन महीलांना विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळाले.

   बक्षिस समारंभ पार पाडुन मी लगेच पुण्याच्या दिशेने निघालो.

निकाल:
खुल्या ७० किमी स्पर्धेत,
१) दिपककुमार राय (नगर) ७०,०००
२) मच्छिंद्र पवार (सांगली) ५०,०००
३) मिर्झा बेग (मुंबई) ३०,०००
४) धीरेन बोयरा (मुंबई) १५,०००
५) प्रतिक पाटील (कोल्हापुर) १०,०००
६) यश थोरात (नवी मुंबई) ७,०००
७) निकेत पाटील (रायगड) ५,०००
८) ईराणी मेहेरजाद (ठाणे) ५,०००
९) मिहीर जाधव (बदलापुर) ५,०००
१०) प्रकाश ओवलेकर (सांगली) ५,०००

४० वर्षावरील पुरुष ४५किमी,
१) राजेंद्र सोनी (नवी मुंबई) २०,०००
२) राम जाधव (सांगली) १५,०००
३) आस्ताद पालखीवाला (मुंबई) १०,०००
४) निंजेल डेव्हीड स्मिथ (मुंबई) ७,०००
५)शेरविन नरोना (मुंबई) ५,०००

४० वर्षावरील महीला २२ किमी,
१) अंजली भालिंगे (पुणे) २०,०००
२) दिपाली जोशी (पुणे) १५,०००
३) फरोग मुकादम (ठाणे) १०,०००
४) कौल (ठाणे) ७,०००
५) नमिता (ठाणे) ५,०००



स्ट्रावावरील माझे रेकॉर्डींग
Click for Strava Activity

रेस संपल्यानंतर, पाठीमागे डॉ. भांगे

पहील्या दहामध्ये आलेले विजेते
  
आयुष्यात सर्वात जोरात सायकल चालवली

स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावणा-या मिर्झा बेगबरोबर

बक्षिस समारंभ
 
जुडवा पार्कींग


फेसबुकमित्र आबा कापसे आवर्जुन वेळ काढुन भेटायला आले.
 
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेली बातमी
 Thanks & Regards
Vijay Vasve
9850904526
Pune

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...