Friday 16 September 2022

हरीमुखे म्हणा...

पुण्याची गणना कोण करी?


"हरी मुखे म्हणा हरी मुखे...पुण्याची गणना कोण करी" मुखात हरीचे नाव आल्यावर जे पुण्य लाभते त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. ऐकायला किती साधे वाटते. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. काया, वाचा, मन आणि इंद्रियांच्या संयोगाने आपण ईतर जीवांना जो त्रास किंवा पीडा देतो ते म्हणजे पाप. एका क्षुद्र जीवाला त्रास दिल्याने पाप लागण्याचे काय कारण असावे बरे? कारण "हृदयेषु सन्निविष्टो". तुम्ही त्या जीवाला नाही तर त्याच्या हृदयात वास करणार्या प्रत्यक्ष भगवंताला त्रास देत असता. तुम्ही म्हणाल "कोण भगवंत?" तेच भगवंत "अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते" हे अर्जुनाला सांगणारे. सर्व गोष्टींचा मालक मी आहे आणि माझ्यापासुनच सर्वकाही येते. जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ते ते सर्व (सर्वस्य). हि पृथ्वी माझी, हा चंद्र माझा, हा सुर्य माझा, हे समुद्र माझे, ग्रह तारे माझे, एवढेच काय तु जो श्वास घेत आहेस तो वाराही माझाच आहे. ढगांतुन बरसणारा पाऊसही माझाच आहे. सर्वकाही भगवंतांचेच आहे. म्हणुन तुम्ही जेव्हा एखाद्या जीवाला पीडा देता तेव्हा तो अपराध मानला जाऊन त्याचे पाप लागते. आता पुण्य काय आहे ते पाहु.

परोपकार म्हणजे पुण्य. एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न दिले, तहानलेल्याला पाणी दिले तर यापासुन मिळणारे पुण्य अपरीमित परंतु मोजता येण्याजोगे आहे. कारण प्रत्यक्षात तुम्ही त्या जीवाच्या हृदयात वास करणार्या भगवंतांची सेवा केलेली असते. तो जीव भले तुमच्याशी चांगले वागेल अथवा न वागेल पण तुम्हाला तुमच्या परोपकाराचे पुण्य हे मिळणारच. या कर्माचे एवढे पुण्य आणि त्या कर्माचे तेवढे पुण्य या सर्वांचे परीमाण ठरलेले आहे. मोजण्याची पद्धत ठरलेली असल्यामुळे ते मोजता येते. आणि हे मोजण्याचे काम करणारा सुद्धा नेमलेला आहे आणि तो म्हणजे यमराजाचा सचिव चित्रगुप्त. आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची तो नोंद करून ठेवतो. यात कोणतीही चूक होत नाही. 

आपण सध्या अत्याधुनिक मोजमापाची साधने वापरत आहोत. कालगणना, वेग, ऊंची, वजन, आकारमान, खोली, जाडी ई. अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण मोजु शकत नाही. सोन्याची घनता मोजणे आर्किमिडीजमुळे शक्य झाले. मानवाने प्रगतीचा आलेख उंचावत प्रकाशाचा वेग मोजणेसुद्धा शक्य करून दाखवले. हल्ली तर सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅपच्या लॉजीकमध्ये गरजेप्रमाणे मोजमापाचे एकक वापरून वाट्टेल ते मोजता येते. आजकाल मी दोरीच्या उडया सुद्धा मोजतो. व्यायामाचे अनेक प्रकार मोजणे शक्य झालेले आहे. प्रकाशाचा वेग, सुर्यापासुन प्रत्येक ग्रहाचे अंतर, पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग तसेच अवकाशातुन निखळलेल्या तार्याचा वेग मोजणेसुद्धा शक्य झालेले आहे. वाहनाची गती, हृदयाचे ठोके, एका मिनिटातील अमुक तमुक, हे एवढे ते तेवढे... काही काही म्हणुन शिल्लक ठेवलेले नाही. मोजण्यातील अचूकता मिळवण्यासाठी आपण सेकंदाचे मिलीसेकंद आणि मिलीमीटरचे मायक्रॉन करुन ठेवले आहेत. 

ईथे पृथ्वीवर आपण जे जे तंत्रज्ञान पाहतो ते कुठुन आलेले आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, "ऊर्ध्वमुलम अध:शाखं" (ईथे तुला जे जे दिसत आहे त्या सर्वांचे मूळ माझ्यापाशी आहे) ईथे जे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे त्या सर्व गोष्टींचे मुळ उच्चतर लोकांमध्ये स्थित आहे. ईथले तंत्रज्ञान हे खेळण्यातल्या वस्तुंसारखे प्रतिकात्मक आहे. सांगायचे झाले तर जसा एखादा आघाडीचा ड्रायव्हर आपल्या लाडक्या मुलाला खेळण्यातली छोटी कार घेऊन देतो आणि ती घेऊन तो छोटा मुलगा वडीलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते पाहुन त्याच्या वडीलांना हसु येते आणि एक आनंदही मिळतो अगदी तसेच आपले तंत्रज्ञान हे भगवंतापासुन आलेले आहे. हे तंत्रज्ञान जर प्रतिकात्मक असुनही एवढे प्रगत वाटत असेल तर देवाचे तंत्रज्ञान काय दर्जाचे असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

पापपुण्य मोजण्याचे काम चित्रगुप्त यांच्याकडे आहे. गरूड पुराणात दिलेल्या माहीतीनुसार जीवाच्या प्रत्येक कृतीचे बारा साक्षीदार असतात. पुण्याचे फळ घेताना जीव आनंदाने स्विकारतो परंतु पापाच्या वेळी "मी हे केलेले नाही" असे म्हणुन तो निरपराध असल्याचा आव आणतो. त्यावेळेस हे बारा साक्षीदार समोर येऊन ग्वाही देतात. आपल्या ईथे जसे "लाव रे तो व्हिडीओ" म्हणतात अगदी तसेच. "भुमीरापोनलो वायु खं" भुमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनलो अग्नि, वायु आणि खं म्हणजे आकाश हे पाच तसेच सूर्य, चंद्र, राशी, महीना, तिथी, वार आणि सर्वात शेवटी "हृदयेषु सन्निविष्टो" म्हणजे आपल्या हृदयात परमात्मा बनुन राहणारे परम पुरुषोत्तम भगवंत. आत्मा आणि परमात्मा ऐकले असेल त्यातले परमात्मा हेच ते. हृदयात आपल्या सोबत राहुन आपण केलेली कर्मे तर लक्षात ठेवतातच पण त्याचबरोबर आपल्या मनात आलेल्या विचारांची सुद्धा नोंद करुन ठेवतात. त्यांना केलेल्या प्रार्थनांविषयी तर काय बोलावे? भगवंत एखाद्या गुप्तहेराप्रमाणे आपल्यासोबत सतत आहेत आणि याचा आपल्याला मागमुसही नाही. त्यामुळे कधीही पंगा घेण्याचा प्रयत्न करू नका. पापपुण्य मोजण्यासाठी एवढे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपली कोणतीही कृती हि एकतर पाप असते किंवा पुण्य असते आणि त्याची अचूक नोंद ठेवली जाते आणि आपण जेव्हा या शरीरातुन बाहेर पडतो तेव्हा त्याचा हिशोब केला जातो. 

चित्रगुप्त या नोंदी ठेवत असताना जेव्हा सर्वप्रथम एका व्यक्तीने आपल्या मुखातुन हरी शब्द उच्चारला तेव्हा त्याला या कृतीचे वर्गीकरण करता आले नाही. याचे किती पुण्य द्यायचे याचे लॉजिक न सापडल्यामुळे तो आपल्या सिनियरकडे म्हणजे धर्मराज यमाकडे गेला. धर्मराज यमाला जे सॉफ्टवेअर दिलेले आहे त्यातसुद्धा हे लॉजीक टाकलेले नाही. आता काय करायचे? म्हणुन ते दोघे त्यांच्या बॉसकडे जातात. त्यांचे बॉस म्हणजे महाकाल भगवान शंकर. ते त्यांना सांगतात कि ते आपल्या विभागाचे काम नाही. अजामिळाने मृत्युसमयी जेव्हा "नारायण...नारायण" हे भगवंतांचे नाम उच्चारले होते तेव्हा त्या विभागाचे चार कर्मचारी (विष्णुदुत) यमदुतांना दिसले होते. ते यमदुतांपेक्षा महाबलशाली होते. भगवंतांची भक्ती आणि नामस्मरण याची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे जो आपल्याला अवगत नाही. म्हणुन येथे म्हटलेले आहे "पुण्याची गणना कोण करी?" मुखाने हरीचे नाव घेतले असता मिळणारे पुण्य चित्रगुप्ताला सुद्धा मोजता येत नाही. म्हणजे ते पुण्य किती असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

म्हणुन देवाच्या द्वारी क्षणभर का होईना उभे रहा आणि मुखाने हरीनाम घ्या. यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही हयगय न करता मुखाने हरीचे नाम घेत रहा...
"रामकृष्णहरी"
- वि. सु. वसवे 


 

Monday 12 September 2022

आशिया कप अंतिम सामना २०२२

अशिया कप अंतिम सामना २०२२!
 अपेक्षित होते कि आपला भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळेल परंतु अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात हेही तेवढेच खरे आहे. क्रिकेटमुळे भारतीय बोर्डाकडे अमाप संपत्ती आली पण त्या श्रीमंतीला यशाने बर्याचदा हुलकावणीच दिलेली आहे. नाही म्हणायला आपला एक पंच अंतिम सामन्यात दिसत होता हेही नसे थोडके आणि रवि शास्त्रीचे समालोचन ऐकायला मिळणार होते. रविच्या समालोचनाविषयी काय बोलावे. खरं सांगायचे तर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकाची भुमिका निभावत असताना मला त्याच्या समालोचनाची खुप आठवण येत असे. रविवारच्या दिवशी व्हिस्की सोबत तंदुरी चिकन मिळाल्यावर जी मजा येते तीच मजा एखाद्या रंगतदार सामन्यात रवी शास्त्रीचे समालोचन ऐकताना येते. सध्या हिंदी समालोचन सुद्धा बहरत चाललेले आहे पण मला ते कमी कपडे घालुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करणार्या एखाद्या नुतन अभिनेत्रीसारखे वाटते म्हणुन मी त्याच्या वाटेला जात नाही. हिंदी समालोचन मला झेपत नाही. विशेष म्हणजे काल कोणतीही तिथी आडवी न आल्यामुळे व्हिस्कीचा एकेक थेंब घशाखाली उतरवत अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद घेता आला. अर्थातच मी श्रीलंकेच्या बाजुने होतो. "कमॉन लंका..." म्हणत मी सोफ्यावर विराजमान झालो.
 सामना सुरु होण्याअगोदरच निराशेचे सावट पसरले. आतापर्यंत "टॉस का बॉस" असणारी दुबई अंतिम सामन्यातही जो नाणेफेक जिंकेल त्यालाच विजयी करणार असे माझे ठाम मत झालेले होते. नाणेफेकीचा कौल लंकेच्या बाजुने लागावा अशी तीव्र ईच्छा मनात निर्माण झाली होती. परंतु नाणेफेकीचा कौल पाकडयांच्या बाजुने गेल्यामुळे मी लंका संपली असे गृहीत धरूनच सामना पाहत होतो. त्यात पहील्याच षटकात एका अप्रतिम आत येणार्या चेंडुने कुसल मेंडीसचा असा काही त्रिफळा उडवला कि ते पाहुन या पाकडयांच्या गोलंदाजीपुढे लंकेचा निभाव लागणे आता कठीण आहे असे वाटले. समालोचन करणार्या वासिम अक्रमला आनंदाच्या उकळ्या फुटून तो चेकाळु लागला. "What a cracker to start asia cup final" असे म्हणत रवीने सुरुवात केली. पाकडयांचे गोलंदाज लंकेच्या फलंदाजांना डोके वर काढु देत नव्हते. त्यांचा एकेक फलंदाज धारातीर्थी पडु लागला. रसेल अर्नॉल्ड स्वत:ला सावरत जपुन जपुन शब्दप्रयोग करत होता. सलामीवीर धनंजय डिसिल्वाची एकाकी झुंज चालु होती तो एका बाजुने अप्रतिम फटके मारत होता तेही कवर्समधुन. कवर्समध्ये मारलेले फटके पाहताना खुप मजा येते मग मारणारा कोणीही असो. पाकडयांच्या गोलंदाजांचे एवढे कौतुक सुरु होते कि एक फिरंगी समालोचक सोडला तर बिचार्या धनंजयसाठी स्तुतिसुमने वाहणारे कोणी नव्हते. तिसरा गडी बाद झाल्यावर भानुका राजपक्ष मैदानात उतरला. आता "आपला माणुस आला" असे म्हणत मी सोफ्यावर सावरून बसलो. तो अफाट गुणवत्ता असलेला फलंदाज आहे. तो जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तेव्हा मी त्याची फलंदाजी आवर्जुन पाहतो. लंकेचा एकेक मोहरा तंबुत परतत होता. त्यांची गळती थांबता थांबेना. कर्णधार दासुन शनाकाने आडवा खराटा मारण्याच्या प्रयत्नात आत्महत्या केली आणि लंकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. नवव्या षटकात पाच बाद अठ्ठावन्न वरून आता डोंबल्याची लंका जिंकणार असे मी पुटपुटत होतो. 
 वानिंदु हसरंगा आणि भानुका राजपक्ष हि डावी उजवी जोडी मैदानावर एकत्र आली. भानुका एकदम शांत डोक्याने कसलाही धोका न पत्करता दुहेरी, एकेरी आणि प्रसंगी चौकाराच्या रुपाने धावा जमवत होता आणि दुसरीकडे हसरंगा "मारेल नाहीतर मरेल" या वृत्तीने पाकडयांवर तुटुन पडला होता. असेही हारणार आणि तसेही हारणारच आहोत तर मग लढुन हारू असे म्हणत त्यांनी जिद्दीने खेळायला सुरुवात केली. हसरंगा कसलेल्या फलंदाजासारखा कवर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून लिलया फटके मारत होता. त्याच्या फटकेबाजीमुळे धावगती सरस होत चालली होती. दरम्यान क्षेत्ररक्षण करताना पाकडयांनी जाम करमणुक केली. आतापर्यंत आपण फुटबॉल खेळताना डोक्याने चेंडु मारतात हे पाहीलेले आहे परंतु शादाबखानने क्रिकेटच्या चेंडुला "हेडर" मारला. ते पाहुन माझी हसता हसता पुरेवाट झाली. पाकडयांच्या लौकीकास साजेसे म्हणजे त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण सुरु होते. प्रत्येकजण एक दुसर्याला सुचना देण्याचा प्रयत्न करत होता पण कोणीच कोणाचे ऐकत नव्हते. सामना आपण जिंकलेला आहे या धुंदीतच ते खेळत होते. कर्णधाराने बळी मिळवण्याच्या नादात मुख्य गोलंदाजांची षटके जवळजवळ संपवलेली होती. याचा पुरेपुर फायदा हसरंगाने उचलला. भानुकाने फ्लिकवर एक नेत्रदिपक षटकार मारला जो मला एकदम युवराजने २००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या षटकारासारखा वाटला. या दोघांनी अभेद्य वाटणार्या पाक गोलंदाजीला भगदाड पाडले. हि जोडी फोडण्यासाठी पंधराव्या षटकात कर्णधार बाबर आझमने हरीसला गोलंदाजीला आणले आणि त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत एकवीस चेंडुत छत्तीस धावा करणार्या हसरंगाला तंबुचा रस्ता दाखवला. आता पुढची पाच षटके भानुका अवश्य काहीतरी कमाल करणार असे मला वाटत होते. 
 आज भानुकाचे दैव फळफळलेले होते. तो फलंदाजीला येताना कर्णाची कवचकुंडले घालुन आलाय असे वाटत होते. लंकेला त्याने सरणावरून जीवदान दिले होते. शेवटच्या षटकातील घमासान पहायला मजा येत होती. हे सर्व रवी शास्त्री भन्नाटपणे वर्णन करत होता. रसेल अर्नॉल्डला आता वाचा फुटली होती. संजय मांजरेकर स्वयंघोषित तज्ञ असल्यासारखा तोंडाचा पट्टा चालवत होता आणि वासिम अक्रम तर पाकीस्तानने आशिया कप जिंकल्याच्या अविर्भावातच बोलत होता. दरम्यान पाकडे करमणुक करण्यात कुठेही कमी पडत नव्हते. भानुकाचा उडालेला झेल घेण्यासाठी दोन खेळाडु एकाचवेळी धावले आणि एकमेकांना धडकले, तो झेल घेण्याऐवजी त्यांनी तो चेंडु सीमारेषेबाहेर उडवुन लावला. अशी चमत्कारीक गोष्ट घडली कि ती एखाद्याने ठरवुन करावयाची म्हटली तरी होणे शक्य नाही. हे पाकडेच करो जाणे. जीवदानासहीत आयतामायता षटकार मिळालेल्या भानुकाने नंतर मागे वळुन पाहीलेच नाही. पाक गोलंदाजीची त्याने लक्तरे लोंबवली. पाकडयांचा धुव्वा उडवत लंकेने तब्बल १७० धावा उभ्या केल्या. एवढी समाधानकारक धावसंख्या उभी केल्यामुळे लंकेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. पण या स्पर्धेत हि धावसंख्या कैक वेळा लिलया पार झालेली असल्यामुळे ती विजय मिळवुन देईल असे वाटत नव्हते. पाकडे या धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग करणार याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. नंतर मला सामना बघता बघता केव्हा झोप लागुन गेली हे कळलेच नाही.
 मी सकाळी झोपेतुन ऊठल्यावर औत्सुक्य म्हणुन निकाल पाहीला. तो पाहुन मी टणकन उडालो. झोपेतुन उठल्या उठल्या एवढी गोड बातमी दिल्याबद्दल लंकेचे खुप खुप धन्यवाद आणि आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन!
- वि. सु. वसवे
#cricket #AsiaCup2022Final #AsiaCup #marathi #blogger

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...