Thursday, 12 March 2026

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

नाईट बीआरएम २०० किमी

कलिंगड आणि खीर बीआरएम

रायडर नं ८७ (८ तास १८ मिनिटे)



रायडर नंबर ८७ सक्रीय झाला...!

        यापुर्वी मी पुणे रँदोनियर्सकडून ब्रेवेमध्ये राईड करताना तब्बल तीन वेळा सुपर रँदोनियर झालेलो आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर या महामार्गावर अतोनात सायकल चालवलेली आहे. पण त्याला आता खूप वर्षे होऊन गेलेली आहेत. मार्च २०१७ मध्ये मी शेवटची बीआरएम २०० केलेली मला आठवते. त्यानंतर मला ट्रायथलॉनचे वेड लागले. त्या वेडातुन पुढे २०१९ मध्ये मलेशियात आयर्नमॅन (१५ तास १४ मिनिटे) झाल्यावरच माझ्या जीवाला शांती मिळाली. आयर्नमॅनमध्ये ४ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे या तिन्ही गोष्टी सलग कराव्या लागतात. आयर्नमॅन किताब मिळवल्यानंतर मला ट्रायथलॉन सुद्धा निरस वाटू लागली. व्हिडीओ गेममध्ये जसे सीपीयूला हारवायला लागल्यावर त्या गेममधील मजा निघून जाते किंवा एकच पदार्थ सतत खात राहील्यावर जशी त्याची शिसारी येते तशी माझी अवस्था होऊ लागली. मग हाफ आणि फुल मॅरेथॉनमध्ये टायमिंगचे वेड लागले जे सर्व रनर्स समाजाला लागलेले आहे. वेळेशी स्पर्धा करता करता सब-टू हाफ मॅरेथॉन लिलया करू लागलो. मग सब-फोर मॅरेथॉन(फुल) पळण्याचे खूळ डोक्यात गेले. या वेडातुनच अनेकांना मोहात टाकणारी टाटा मुंबई मॅरेथॉन पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही प्रयत्नात सब-फोर पळालो आणि हे कमी आव्हानात्मक वाटले म्हणून की काय लोणावळ्यात होणारी टाटा अल्ट्रा मॅरेथॉन (५०किमी) सुद्धा चक्क सब-फाईव मध्ये पळालो. त्यानंतर आता बस्स झाले असे मला वाटु लागले. फिटनेस प्रवास सुरु करून जवळजवळ १२ वर्षांचा काळ लोटला होता. या कालावधीत रनिंग आणि सायकलिंगवर भरपूर पैसा उधळला पण या गोष्टीचा मला कधीही पश्चाताप झाला नाही कारण ते केल्यामुळे मला एक उत्तम, निरोगी आणि तंदुरूस्त शरीर मिळाले, "आरोग्यम धनसंपदा". नोकरी सांभाळून जे काही करता येणे शक्य आहे तेवढे सर्व करून झाले. आता दुसरे कुठले खूळ डोक्यात घेण्यापेक्षा म्हटले चला आता पुन्हा नव्याने बीआरएममध्ये भाग घेऊ. पुनश्च हरीओम! किंवा ज्याला आपण "देजा वु" सुद्धा म्हणतो.

        माझा ऑडॅक्स इंडिया रायडर नंबर दोन अंकी आहे याचे मला जाम कौतुक वाटते. रायडर नंबर ८७. ज्या दिवशी ऑडॅक्स इंडियामध्ये कायमस्वरुपी रायडर नंबर देण्याची पद्धत सुरु झाली अगदी त्याच दिवशी मी हा माझा रायडर नंबर मिळवलेला आहे आणि म्हणूनच तो दोन अंकी आहे. विशेष म्हणजे २०१५-१६ या ऑडॅक्स कॅलेंडर वर्षात मी ज्या मित्रासोबत (प्रशांत जोग) एसआर या श्रृंखलेतील माझ्या सर्व ब्रेवे पूर्ण केल्या सध्या तोच मित्र पुणे रॅंदोच्या सर्व राईडस (ब्रेवे) व्यवस्थितपणे आयोजित करतो. सध्या ब्रेवे (बीआरएम) चांगल्या पद्धतीने आयोजित केल्या जातात असे मी बऱ्याच जणांकडून ऐकले होते. माझ्या मेरीडा स्कुल्ट्रा३०० रोडबाईकला १०५ ग्रुपसेट बसवून मी नुकतीच अपग्रेड केलेली आहे. रोडबाईकवर खर्च केल्यामुळे अत्याधुनिक झालेली रोडबाईक चालवण्यासाठी ब्रेवे (बीआरएम) हा उत्तम पर्याय आहे असे मला वाटू लागले होते आणि म्हणूनच मी माझे ऑडॅक्स इंडीयाचे सभासदत्व पुनर्जिवित केले. रायडर नंबर ८७.

        एवढ्या वर्षांचा कालावधी जाऊनही माझा रायडर नंबर ८७ जसाचा तसा मला मिळाला. आतापर्यंतच्या माझ्या सर्व ब्रेवे (बीआरएम) राइड्स मी हायब्रीड सायकलवर केल्या होत्या. त्याकाळी तीव्र ईच्छा असूनही मला कधी रोडबाईक घेता आली नव्हती. रोडबाईकची गती मला मोहात पाडत असे. साधीसुधी का होईना पण एखादी रोडबाईक असावी असे मला मनापासून वाटायचे. तेव्हा रोडबाईक मिळाली असती तर मी खऱ्या अर्थाने बीआरएमचा आनंद लुटला असता असे मला आजही वाटते. "अगर सबकुछ मिल जाये जिंदगीमें तो तमन्ना किसकी करोगे" असे म्हणत मी आपली हायब्रीडच चालवायचो. तेव्हा कार्बनची चाके आणि कार्बनची फ्रेम माझ्या स्वप्नातही येत नसे.

पुणे रँदोनियर्सची नाईट बीआरएम करण्याचे मी ठरवले आणि लगेच नाव नोंदवले. २०० किमी सायकलिंगसाठी १३ तास ३० मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. वयाच्या पन्नाशीत पुन्हा सुपर रॅंदोनियर व्हावेसे वाटत आहे. बघू जमतंय का??

        प्रारंभ होण्याच्या ठिकाणी भरपूर रायडर्स जमलेले होते पण माझ्यासाठी सर्व अनोळखी (एक दोन सोडून). सिंहगड रोडने जाताना ब्रेवेला जाणारा एक रायडर भेटला पण आमच्यात कसलाही संवाद झाला नाही. तू तुझा जा, मी माझा जातो या प्रकारे आम्ही गेलो. प्रशांतने माझी बाईक चेक करून प्रारंभीचा शिक्का दिला. राष्ट्रगीत झाले आणि आठ वाजता राईडला सुरूवात झाली. संध्याकाळी आठची वेळ असल्याने वाहतूक कोंडीत अडकण्याची दाट शक्यता वाटत होती. मी सपासप पेडल मारत बऱ्याच रायडर्सना मागे टाकत वाट काढत काढत पुढे सटकलो. पाषाण सर्कल, बावधन आणि चांदणी चौकाचा चढ येईपर्यंत कुठेही वाहतूक कोंडी लागली नाही. चांदणी चौकाच्या चढावर गतिरोधक नसतानाही माझ्या गतीला ब्रेक लागला. बीआरएम मध्ये दुःख देणारी एकाच गोष्ट ती म्हणजे चढ. दुःखाचा चढ ओलांडल्याशिवाय सुखाचा उतार येत नाही. चांदणी चौकाच्या उतारावरून मी वाऱ्याच्या वेगाने वारजे पुलापर्यंत पोचलो. मुठेच्या बॉटलनेक पुलावर गती संथ करावी लागली पण वाहतूक कोंडीचा लवलेशही नसल्यामुळे मनाला दिलासा मिळाला. वडगाव पूल ओलांडून नवले ब्रीजवर सायकल चढवल्यावर मला हायसे वाटले. तोच “हाय” असा आवाज आला. एका रायडरने पाठीमागून येऊन मला “हाय” केले आणि तो पुढे निघुन गेला.

        आता खरंतर सुसाट जाण्याची वेळ पण नविन बोगद्याकडे जाणारा चढ सायकलची गती वाढवली की हृदयाची धडधडही सम प्रमाणात वाढवत होता. म्हणून हृदयाच्या गतीवर ताण येऊ न देता मी मध्यमगतीने नविन बोगदा ओलांडला. नविन बोगदा ते कापूरहोळ हा माझा सर्वात आवडता सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये जवळजवळ २० किमी अंतरापर्यंत नुसता उतारच उतार आहे. “नो पेन नो गेन" म्हणतात खरे पण या सेगमेंटमध्ये कसलीही पेन न होता आपण भरपूर गेन करतो.

        बीयू भंडारीपासून कुठेही न थांबता मी थेट कापूरहोळ चेकपॉइंटला थांबलो तेव्हा ९ वाजून ३७ मिनिटे झालेली होती. एक केळ खाल्ले, संपलेली पाण्याची बाटली भरून घेतली आणि दुसऱ्या बाटलीतील कार्बोरन्स घशाखाली उतरवले. माझ्यासाठी कार्बोरन्स हे अशा लांब पल्ल्याच्या राईड दरम्यान संजीवनीचे काम करते. यातून कार्ब्स तर मिळतातच शिवाय ते रक्तातील मिठाच्या पातळीचा समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे लांब पल्ल्यापर्यंत गळून गेल्यासारखे वाटत नाही. माझा STEADVIJAY हा कोड वापरल्यास या कार्बोरन्सवर ३५ टक्के डिस्काउंट मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. LINK TO BUY

        बोगद्याकडून कापूरहोळ कडे जाणे जेवढ सुखकर तेवढे परत येणे वेदनादायी आहे. अगोदरच चढ आणि त्यात आता उड्डाणपूलांची भर पडलेली आहे. त्यामुळे तिकडून सायकल चालवत येताना कधी एकदा कात्रज बोगदा येतोय असे झाले होते.

        आता पुढचा चेकपॉइंट होता जुना कात्रज बोगदा. तिथे कलिंगडाच्या फोडी माझी वाट पाहत होत्या. बीआरएममध्ये आमच्या काळात कलिंगडाच्या फोडी वगैरे आम्हाला कधी मिळाल्या नाहीत. त्यावेळेस तर पाण्याच्या बाटलीवर सुद्धा मर्यादा असायच्या. त्या चेकपॉइंटवर कलिंगडाच्या दोन फोडींचा आस्वाद घेतल्यानंतर प्रशांतकडून ब्रेवे कार्डवर शिक्का घेतला आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पुढे एवढा उतार होता की मुठा नदी कधी आली ते कळलेच नाही. चांदणी चौकाच्या चढाचा मान ठेवत मी सहजपणे जो वेग मिळेल तो घेऊन पुढे सरसावत होतो. चांदणी चौक ते देहूरोड हे अंतर सुद्धा जवळपास २० किमीच आहे. देहूरोडला पोचलो तेव्हा माझ्यापुढे ३ रायडर्स गेलेले आहेत असे कळले. मला कोण पुढे आणि कोण मागे याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते, मला फक्त माझे आठ तासांचे लक्ष्य मला गाठता येतंय की नाही हे पहावयाचे होते.

        चतुर्थीचा चंद्र चांगलाच वर आलेला होता. सायकल चालवताना चंद्राच्या उजेडाचा काहीही उपयोग होत नसला तरी रात्रीच्या वेळी त्याची सोबत मौल्यवान वाटत होती. आजुबाजुला अंधार असण्याचा एक उत्तम फायदा होतो तो म्हणजे इतर गोष्टींकडे नजर जाऊन आपले लक्ष विचलीत होत नाही. तसेच रात्रीची वेळ असल्याने स्थानीक लोकांच्या लुडबूडीचा अडथळा होत नाही, फेरीवाले, रस्ता ओलांडणारे तसेच उलटया बाजुने येणारे रस्त्यावर दिसत नाहीत. दुचाकी आणि तीन चाकी सुद्धा नगण्य होत्या. यामुळे विनाअडथळा सायकल सुसाट पळवता येत होती.

        मी बीआरएम करताना कधीही कोणाच्या सोबत सायकल चालवत नाही. मला एकटयाला सायकल चालवायला आवडते. सायकलच्या सर्व समस्या मला सोडवता येत असल्यामुळे मला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता वाटत नाही. बीआरएम मध्ये ड्राफ्टींग चालत असले तरी मला बीआरएममध्ये ड्राफ्टींग करायला सुद्धा आवडत नाही. मी देहुरोड चेकपॉइंटला १२:११ ला पोचलो. माझ्या योजनेप्रमाणे मी रात्री बाराच्या आत तिथे पोचणे अपेक्षित होते. पण मला ११ मिनिटे उशिर झाला होता. आता ही अकरा मिनिटे कशी कमी करता येतील याचे विचारचक्र माझ्या मेंदूत सुरू झाले. १०७ किमी ला ४ तास ११ मिनिटे, म्हणजे तसे पाहिले तर आवश्यक असणारा २५किमी/तास चा सरासरी वेग आलेला होता. पण माझे बॅड लकच खराब म्हणजे माझ्या दुर्दैवाने ब्रेवेचे अंतरच २०७किमी होते. ते २००किमी असते तर बरे झाले असते.

        मी जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतच्या राईडचा सराव केलेला होता. त्यामुळे देहूरोड चेकपॉइंटनंतर माझे काय होईल याबद्दल मला काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मी पण जास्त ताण येणार नाही अशा वेगाने लोणावळ्याच्या दिशेने निघालो. महामार्गावर जास्त करून अवजड ट्रकच धावताना दिसत होते. माझा रेडीयमने लख्ख चमकणारा सदरा त्यांना माझ्या महामार्गावरील अस्तित्वाची जाणीव करून देत होता. काळ्या डांबरावर पडणारा टॉर्चचा उजेड, अधूनमधून भूकंप आणणारे रम्बलर्स, क्रँकभोवती गोलगोल फिरणारे क्लिट्स आणि पेडलमध्ये अडकवलेले पाय, बाईक कॉम्प्युटर, अंतर आणि वेगाचा मेंदूत चाललेला ताळमेळ आणि मनात भरलेल्या खूप साऱ्या आशंका घेऊन मी सायकल चालवत होतो. महामार्गावरील रम्बलर्स वरून जाताना माझ्या अनेक सिपर बाटल्या रस्त्यावर पडून त्यांचा चुराडा झालेला आहे. त्यामुळे रम्बलर्स वरून जाताना मी खूप काळजीपूर्वक जात होतो. सिपर बाटली पडण्याची मला खूप भिती वाटत होती.

        सायकल चालवण्याचा ताण जसजसा वाढत जातो तसतसा आपला मेंदू नेहमीप्रमाणे काम करत नाही. म्हणून मी चेकपॉइंटला पोचल्यावर काय काय करायचे? याची अगोदरच मनात घोकंपट्टी करवून घेत होतो. एकूण ६ गोष्टी करायच्या हे लक्षात ठेवले की तिथे पोचल्यावर कोणत्या ६ गोष्टी त्या आपल्याला आठवता येतात. १. पाणी भरून घेणे २. केळ खाणे ३. मीठ घेणे ४. शिक्का घेणे ५. चिक्की/खजूर खाणे ६. खीर पिणे.

        या बीआरएमचे नावच कलिंगड आणि खीर बीआरएम आहे. बीआरएममध्ये खीर प्यायला मिळणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. आमच्या काळात बीआरएममध्ये एवढ्या सुविधा नसत. मी चांगली दोन कप खीर पिलो, शिक्का घेतला, पाणी भरले, केळी खाल्ली, एक चिक्की घेतली, मीठाची गोळी घशाखाली उतरवली आणि तिथून शेवटचा टप्पा पार करण्यासाठी निघालो. सायकल चालवताना मी चेकपॉइंट सोडून इतर कोणत्याही ठिकाणी थांबलो नाही. गारमिन घड्याळातील ऑटो पॉज बंद करून ठेवले होते. घड्याळात १४५ किमी अंतर २४.१किमी/तास च्या सरासरीने पार झालेले होते. आता २०७ किमी अंतर होईपर्यंत २५किमी/तास सरासरी गाठण्याचा प्रयत्न करावा लागणार होता. त्यासाठी मी परतीच्या प्रवासात वेगाने सायकल चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात फक्त सायकल चालवण्याकडे लक्ष जात असल्यामुळे अंतर झपाझप कमी होत होते. मी सायकल चालवण्यात मग्न असताना एक कार माझ्या शेजारून चालू लागली. तिची पुढची काच सरकन खाली आली आणि एका सुंदर महिलेने मला पाण्याची बाटली देऊ केली. “Do you need water?” माझ्यासाठी ही आश्चर्यकारक घटना होती. पण माझ्याकडे मला लागणारे पाणी होते म्हणून मी 'धन्यवाद, माझ्याकडे पाणी आहे' असे सांगितले. तरीपण मंदस्मित करत पाणी घेण्याविषयी विचारणा होतच राहीली. “ये मुस्कान की चमकान कहीं और” असे मी मनातले मनात म्हणत स्पष्ट नकार दिला.

        रात्री अपरात्री सावधगिरी बाळगलेली बरी. मी कामशेतचा चढ आरामात पार केला आणि चढानंतर आलेल्या उतारावरून सुसाट गेलो. कामशेत, वडगाव, तळेगाव, सोमाटणे फाटा, तोलनाका करत देहूरोड पर्यंत पोचलो. उजवीकडे वळून चर्चच्या पुढच्या उतारावर एवढे रम्बलर्स होते की रस्त्यावर रम्बलर्स आहेत की रम्बलर्समध्ये रस्ता बनवलाय हे कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर डावीकडे रावेतच्या दिशेने वळालो. ईथून पुढे मला कुत्र्यांच्या टोळ्या दिसू लागल्या. माझ्यावर आक्रमणाची चाहूल लागल्यावर मी ब्रेक दाबून एका जागेवर ऊभा राहत असे. एकदा सायकल जोरात पळवून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न केला परंतू पुढच्या गल्लीतील कुत्री धावण्याचा पवित्रा घेऊन माझ्या स्वागताला हजर होती. आईच्या गावात अन बाराच्या भावात. सायकल पळवणे हा पर्याय मी सोडून दिला. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती पाहवत नाही. कुत्र्यांसमोर मी गती सोडून दिली. त्यांनी हल्ल्याचा पवित्रा घेतला की मी ब्रेक दाबून एका जागेवर ऊभा राहायचो. त्यांचे समाधान झाले की मी गुपचूप तिथून निसटायचो. असे चार ते पाच वेळा घडले. यातही बराच वेळ गेला. संत तुकाराम महाराज पूल, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी फाटा, औंध हॉस्पीटल, औंध, ब्रेमेन चौक या पट्ट्यात सायकल पळवता आली नाही की सायकल पळत नव्हती माहीत नाही पण सायकलला अपेक्षित वेग मिळाला नाही. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ बरोबर २०० किमी अंतर पूर्ण झाले आणि मी घड्याळात पाहिले तर बीआरएमसाठी लागलेला वेळ ७ तास ५९ मिनिटे दिसत होता. पण बीआरएम अजून संपलेली नव्हती.

            सिम्बॉयसिसचा चढ पार केल्यानंतर सायकल चालवण्याच्या त्रासातून सुटलो या भावनेने मी खूप आनंदी झालो. हा शेवटचा उतार आणि आता पेडल न मारताही मी रुपालीला पोचू शकतो या विचाराने मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आठ तासात ही बीआरएम करता आली नसली तरी २५किमी/तासाचा सरासरी वेग राखता आल्याचे समाधान वाटत होते. बीएमसीसी जवळ वेळ, अंतर आणि वेग बघण्यासाठी मी बाईक कॉम्प्युटरमध्ये बघू लागलो. बाईक कॉम्प्युटरचे बटण दाबण्यासाठी जसा मी एक हात सोडला तसा माझा सायकलवरचा ताबा सुटला आणि मी धाडकन सिमेंटच्या रस्त्यावर आडवा झालो. धोबी पछाड डावाने पैलवानाला आडवा पाडतात तसा मी धाडकन जोरात पडलो. हेल्मेटसहीत डोके जोरात रस्त्यावर आपटल्याच्या झटक्याने माझी दृष्टी दुहेरी झाली. मला सर्व गोष्टी दोन दोन दिसू लागल्या. उजव्या पायाचा खुबा जोरात आपटून तिथे खोलवर जखम झाली. अनेक जागी खरचटले. उजव्या हाताच्या कोपराजवळ भली मोठी जखम झाली. इतर अनेक जागी सुद्धा खरचटलेले आहे हे मला दुसऱ्या दिवशी समजले. तिथून दोन युवक दुचाकीवर चालले होते. त्यांना माझी दया आली. त्यांनी मला ऊठवले, माझी सायकल उचलली, माझ्या इतस्ततः विखुरलेल्या वस्तू गोळा करून मला दिल्या, एवढेच नव्हे तर सायकलची चेनसुद्धा बसवून दिली. सायकलचा मागचा डीरेलर जोरात आपटल्याने त्याच्यामध्ये बिघाड झाला आहे (आता हा खर्च वाढला). यात माझी दहा-बारा मिनिटे वाया गेली. मी लंगडत असूनही ऊठलो आणि सायकलवर बसून रूपालीला पोचलो. प्रशांतकडून शेवटचा शिक्का घेतला तेव्हा ४ वाजून १८ मिनिटे झालेली होती. एकट्याने राईड करत मी २०७ किमी अंतर ८ तास १८ मिनिटात पार केले. माझे लक्ष्य जरी गाठता आले नसले तरी मी पूर्ण समाधानी आहे. आता रायडर नंबर ८७ पुढची बीआरएम ८ तासांच्या आत करण्याचा प्रयत्न करील. अपघात होऊनही मी सायकल चालवत घरी गेलो.

-आयर्नमॅन विजय वसवे.

८ मार्च २०२६

#brm #punerandonneurs #brm200 #brevet #IronmanVijay #nightbrm200

Tuesday, 25 March 2025

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२


आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२ 


पूढे चालू

टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढे आणि मागे चिकटवण्यासाठी बिबचे स्टीकर दिलेले होते. फोटो मिळवण्यासाठी हे बिबचे स्टिकर महत्वाचे असल्यामुळे ते व्यवस्थित लावले. मग सायकल म्हणजे मेरीडा (मेरी डार्लिंग) रेससाठी सज्ज केली. सोबत आणलेल्या मोठया पंपाने चाकात ११० पीएसआय हवा भरली. गेटॉरस्कीन टायर सहाव्या वर्षात पदार्पण करूनही अजून दणदणीतपणे सायकलचा वेग आणि भार पंक्चर न होता सांभाळत आहेत. पंक्चर रुपी विघ्न सध्या तरी दोन हात लांब आहे. ब्रेक लागतोय का आणि ब्रेकचे रबर रीमला घासत नाहीयेत ना याची खात्री करुन घेतली. शर्यत सुरू होताना गर्दीमध्ये धडपडण्याची शक्यता असल्यामुळे सायकल कमी गियरवर सेट केली. सायकलला लावलेल्या सिपर बाटलीमध्ये स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी आणि कार्बोरन्स भरुन घेतले आणि तशीच एक बाटली घशाखाली उतरवली. कार्बोरन्स घेतले की तहानभूकेची चिंता मिटते आणि रेसमध्ये आपली शारिरीक क्षमता पूर्ण ताकदीनिशी वापरता येते.

शर्यत बरोबर साडेपाच वाजता सुरु झाली. प्रारंभ रेषेपासुन मागे थांबलेलो असल्यामुळे हौशी सायकलस्वारांमधून रस्ता काढता काढता नाकी नऊ आले. गर्दीतून वेग घेणे अतिशय अवघड गेले. महामार्गाचा पूल येईपर्यंत मी आवश्यक असलेला वेग पकडला आणि सायकलस्वारांच्या गर्दीतून पटकन पुढे सटकलो. सरासरी ३० चा वेग यावा ही माफक अपेक्षा ठेवलेली होती. मला अल्पशा सरावावर ३० चा सरासरी वेग राखणे आव्हानात्मक वाटत होते. पण मी हे आव्हान स्विकारले. रोडबाईकवर ३० चा सरासरी वेग आला नाही तर ती वापरण्याला काहीएक अर्थ नाही. हेडटॉर्चच्या तुटपुंज्या उजेडामुळे मला रस्त्यावरच्या दिव्यांवर अवलंबून रहावे लागत होते. काही कार्बन फायबरवाले रायडर माझ्याशी स्पर्धा करु लागले. माझी साधीसुधी रोडबाईक असुनसुद्धा मी त्यांच्या वेगाशी बरोबरी करत होतो. धावण्याच्या शर्यतीत धावकांना ज्याप्रकारे पाण्याच्या बाटल्या देतात अगदी तशाच प्रकारे सायक्लोथॉनमध्ये सायकलस्वारांना देण्यात येत होत्या. पन्नास किमी साठी मला माझी एक सिपर बॉटल पुरेशी वाटत होती. 

औंधवरून रावेतकडे जाणारा बीआरटी मार्ग फक्त सायकलस्वारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता. त्या मार्गावर फक्त आणि फक्त सायकलस्वारच दिसत होते. शर्यत चालू असेपर्यंत ज्यांच्यासाठी बीआरटी मार्ग बनवला आहे त्या महानगरपालिकेच्या बसेसना सुद्धा त्यावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे इतर वाहनांची पर्वा न करता बिनधास्तपणे फक्त आणि फक्त सायकल पळवण्यावर लक्ष केंद्रित करता येत होते. ओबडधोबड गतिरोधकांवरुन सायकल गेल्यावर घोडयावर सवारी केल्याचा भास होत होता. सायकलस्वार अंधारात चाचपडू नयेत म्हणून आयोजकांनी काही ठिकाणी रस्त्यालगत मोठे दिवे लावून अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला होता. आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आलेली होती. पाणी देणारे कार्यकर्ते मोठया जोमाने त्यांचे कार्य करत होते. 

मुकाई चौकापर्यंत अंधारात चाचपडत चाललोय असे वाटत होते कारण माझ्या टॉर्चचा उजेड माझ्या वेगाला साजेसा नव्हता. सायकलचा वेग आणि टॉर्चची प्रखरता हे सम प्रमाणात असण्याऐवजी व्यस्त प्रमाणात होते. प्रखर उजेड देणारा डीप्पर वापरण्याऐवजी मी मेणबत्ती घेऊन सायकल चालवत होतो. "कहीं दिप जले कहीं दिल.." गाण्यातील वहिदा रेहमानसारखा. त्यामुळे एक-दोन वेळा अंधारात न दिसलेल्या भागावरून सायकल टणकन उडाली आणि तशीच एक-दोन वेळा धाडकन आपटली सुद्धा पण हातांची पकड मजबुत असल्यामुळे सायकल आणि मी धडपडलो नाही. मुकाई चौक जवळ येऊ लागला तसे झुंजुमुंजू होऊ लागले. "तमसो मा ज्योतिर्गमय..." मी अंधारातुन प्रकाशाकडे जाऊ लागलो पण नेमका त्याचवेळी मुकाई चौक ते भक्ती-शक्ती कडे जाणारा चढाचा रस्ता सुरु झाला. भरपूर उजेड येऊनही त्या चढावर मला सायकल पळवता आली नाही. आतापर्यंत ३०च्या वर राखलेला सरासरी वेग हळुहळू ३०च्या खाली सरकू लागला. ते पाहुन माझ्या मनाची तगमग होऊ लागली. मी "हे प्रभू...हे हरिराम" म्हणू लागलो. आता सरासरी वेग ३०च्या वर नेण्यासाठी परतीच्या प्रवासातील प्राधिकरणाचा उतार हाच मला एकमेव आशेचा किरण दिसत होता. मी त्या उतारावर स्वार होत संधीचे सोने केले आणि सरासरी वेग पुन्हा ३०च्या वर आणण्यात यशस्वी झालो. सरासरी वेग पुन्हा ३०च्या वर आल्यावर मला खूप समाधान वाटले. संत तुकाराम पुलावरून (बास्केट ब्रीज) डावीकडे वळाल्यावर रावेत ते औंध या बीआरटी मार्गावर आरामात पाहीजे तेवढा वेग घेता येईल असा माझा समज होता. सायकल चालवताना या मार्गावर उड्डाणपुलांच्या चढ-उतारांमुळे मस्त वेग मिळतो परंतू बीआरटी मार्गावर उड्डाणपुल नाहीत हे मला त्यादिवशी माहीत झाले. चढ-उतार नसल्यामुळे वेग मिळवण्यासाठी पायांतुन जोर लावावा लागत होता जे अतिशय कठीण जात होते. ३०चा सरासरी वेग राखण्यासाठी परिस्थिती पुन्हा गंभीर झाली. शेवटच्या ६ किमीमध्ये मी खूप जोरात सायकल चालवल्यामुळे ३०चा सरासरी वेग राखण्यात यश आले. सुरूवातीला भेटलेले दोन कार्बन-फायबर रोडबाईकवाले शेवट्च्या २ किमी पर्यंत माझ्याशी शर्यत लावण्यात व्यस्त होते. शेवटी मी म्हटले, "ईनको नहीं हराया तो फिर रेस करने का मजा ही क्या है?" त्यांना मागे टाकून मी झपकन पुढे गेलो आणि अंतिम रेषा पार करताना मस्त दोन्ही हात सोडून एसआरकेची पोझ देत कॅमेऱ्यासमोर सायकल चालवत गेलो. फोटोग्राफरने माझे खुप भारी फोटो काढले. अशा रितीने मी आपलं पुणे सायक्लोथॉनमध्ये ५०.३ किमी अंतर ३०.१ च्या सरासरी वेगाने १ तास ४० मिनिटे ९ सेकंदात पूर्ण केले.  

काही ठिकाणी ओबडधोबड रस्ता, अनपेक्षित खड्डे आणि आपल्याकडील उच्च दर्जाच्या डिझाईनचे गतिरोधक असल्यामुळे काही सायकलस्वारांचे भरपूर नुकसान झाले. एका रायडरची सायकल खड्डयात जोरात आपटल्यामुळे महागडी कार्बनची चाकेच निकामी झाली. काहींच्या पाण्याच्या बाटल्या उडून रस्त्यावर पडल्या, काहींचे टॉर्च पडले आणि काहींचे सायकलला लावलेले जीपीएस सुद्धा उडून पडले. काहींनी दुसऱ्याच्या बिबवर शर्यत पूर्ण केली. काहीजण रस्ता चूकल्यामुळे शर्यतीच्या मार्गावरून भरकटले. काही ट्रायथलॉन करणाऱ्यांनी मस्त एरोबार लावुन सायकल चालवली. १००किमी शर्यतीचे अंतर प्रत्यक्षात फक्त ९५ किमीच होते त्यामुळे स्पर्धकांमध्ये निराशेचे वातावरण होते. त्यामुळे बऱ्याच जणांनी तीन तासांच्या आत वेळ नोंदवलेली असली तरी त्याला सब-थ्री म्हणता येणार नाही. शर्यत संपल्यावर खायला प्यायला भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. विमानतळावर जशी खाण्यापिण्यासाठी विशेष लाँज असते तशी आपलं पुणे सायक्लोथॉनमध्ये विशेष व्यक्तींसाठी मोठ्या आकाराची एक लाँज बनवलेली होती. क्रेडिट कार्ड घरी राहिल्यामुळे मला तिकडे जाता आले नाही. खरं सांगायचं तर मला चहा पिण्याची खूप ईच्छा झाली होती पण शर्यतीनंतर चहाची व्यवस्था केलेली नव्हती. या सायक्लोथॉनमध्ये पेसर नसतात, फक्त रेस अँबेसिडर असतात. बक्षिस समारंभ आटोपल्यानंतर मी परतीच्या प्रवासाला लागलो. 

अवश्य सहभागी व्हावे अशी ही आपलं पुणे सायक्लोथॉन स्पर्धा आहे. 

-आयर्नमॅन वि. सु. वसवे.  
२५/०३/२०२५

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-१


स्पर्धेचे नाव - पुणे सायक्लोथॉन
ठिकाण - शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी
आयोजक - चॅंप एन्ड्युरन्स
तारीख - 16 मार्च, 2025
अंतर - 50 किमी
वयोगट - 35च्या पुढील पुरूष 
बंदुकीतून गोळीबार - पहाटे 05:30 वाजता (गनटाईम)

यावर्षीच्या सायक्लोथॉनमध्ये बऱ्याच जणांनी पनास टक्के सवलतीचा फायदा घेऊन नावनोंदणी करुन ठेवलेली होती पण मी मात्र नाव नोंदवलेले नव्हते. मी ठरवले होते की जेव्हा सहभाग घेण्याचे नक्की होईल तेव्हाच नावनोंदणी करु, भले सवलत मिळो अथवा न मिळो. कारण त्या तारखेला अचानक काही वेगळे करावेसे वाटले तर नावनोंदणीचे पैसे वाया जायला नकोत म्हणून हा खटाटोप. तसेही आता पगार वाढलेला असल्यामुळे प्रवेश फी भरताना सवलत वगैरे मिळाली नाही तरी फारसा फरक पडत नाही. आता प्रवेश फी भरताना पहिल्यासारखी चणचण जाणवत नाही. ते जुने दिवसच खुप भारी होते, ओढाताण आणि चणचण यांच्याशी छान गट्टी जमली होती. तेव्हा रोडबाईक घेण्याची दांडगी ईच्छा असूनही चणचणीमुळे घेऊ शकत नव्हतो आणि आता लगेच याक्षणी म्हटले तरी नविन रोडबाईक घेऊ शकतो पण रोडबाईक चालवण्याची ती दांडगी ईच्छा माझ्यात शिल्लक राहीलेली नाही. दिवस कसे बदलतील सांगता येत नाही. पण कधी कधी माझे ते सायकलवरचे जुने प्रेम पुन्हा उफाळून येते. सायकलिंग म्हणजे माझ्या फिटनेसच्या प्रवासातील माझे पहिले प्रेम. पहिले प्रेम काही केल्या विसरता येत नाही असे म्हणतात. हे माझे पहिले प्रेम जिवंत ठेवण्यासाठी मी अधूनमधुन सायकल चालवायला जातो. 

पुणे सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ. सायकल चालवताना झालेल्या माझ्या अपघातांचा मी एवढा धसका घेतलेला आहे की भर रस्त्यावर किंवा वाहनांच्या गर्दीत सायकल चालवायचे म्हटले की मला धडकीच भरते. अनेक भीषण अपघातातून पांडुरंगाने मला सहीसलामत वाचवलेले आहे. आता माझा शेवटचा अपघात होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि मला त्याचा विसर पडलेला आहे. जखम बरी झाल्यावर तिला कुरवाळताना एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते आणि ती बरी झालेली जखम आपण स्वत: होऊनच कौतुकाने इतरांना दाखवतो तसे मीही आता कौतुकाने माझ्या सायकलवर झालेल्या अपघातांची चर्चा करत असतो. तसेच खूप दिवस सायकल चालवली नाही तर मला सायकलचा विरह सुद्धा सहन होत नाही, शेवटी पहिले प्रेम. सायकल चालवण्यासाठी 16 मार्च हा दिवस सुयोग्य वाटत होता कारण तोपर्यंत मी सहभाग नोंदवलेल्या सर्व मॅरेथॉन संपणार होत्या. ऊशिरा नाव नोंदवूनही मला 25 टक्के सवलत मिळाली.

नाव नोंदवणे आणि प्रत्यक्ष सहभागी होणे यापेक्षा मला बिब आणायला जाणे महाकठीण वाटते. दैवयोगाने सायक्लोथॉनचे बिब घेताना कोणतीही समस्या आली नाही. मला एकतर शनिवारी सुट्टी नसते आणि सर्व स्पर्धांचे प्रदर्शन आणि बिब घेणे हे शनिवारीच ठेवलेले असते. बरेचजण माझ्याकडुन सल्ला किंवा संबंधीत माहीती वगैरे विचारत असतात एकदा अशाच एका सल्ला घेणाऱ्या व्यक्तीला माझे बिब घे म्हणालो तर म्हणतो, "आपले बिब आपली जबाबदारी". तो तिथे जाणार असूनसुद्धा माझे बिब घेतले नाही. मला वाटले की सल्ला वगैरे विचारतो तर घेईल माझे बिब पण नाही, एवढे कृतघ्न लोक या समाजात आहेत. कोणाला मदत करावी की नाही असा प्रश्न पडतो. मी पण म्हटले, "हा बाजीराव असेल तर त्याच्या घरी" आपल्याला त्याचे काय कौतुक? मी त्याला सर्व ठिकाणी डिलिट करून टाकले. पण काही मदत घेणारे खरंच चांगले असतात, अशापैकी काहींनी माझे बिब कैकवेळा घरपोच आणुन दिलेले आहे. "प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया" श्री भगवंतांनी गीतेत सांगितले आहे की कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अगोदर दंडवत करुन सेवा करावी आणि मगच प्रश्न विचारावा. पण आजकाल सेवा करण्याची मनोवृत्ती नाहीशी होत चाललेली आहे. असोत... माझ्यासारखे बिब घेण्याची समस्या असणारे बरेचजण असतात. "गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हणतात. यावरुन एखादा व्यक्ती नाममात्र शुल्क आकारुन बिब घेण्याचा व्यवसाय सुद्धा सुरू करु शकतो. बघा कसं जमतंय.
क्रमश:


Saturday, 22 April 2023

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत


शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा

आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब
मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा
अंतर - 29 किमी
तारीख - 16 एप्रिल, 2023
रनिंगमध्ये मॅरेथॉनची वेळ सुधारण्याच्या नादात माझे सायकल चालवणे मागे पडले होते हे मला मान्य करावेच लागेल. गेली दोन वर्षे झाले पन्नास हजार किमी सायकलिंगचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक हजार पेक्षाही कमी अंतराची आवश्यकता असताना माझ्याकडुन तोही पार झालेला नाही. जुन महीन्यातील पुणे पंढरपुर सायकलवारी झाल्यानंतर सायकल स्वच्छ करुन मस्तपैकी टांगुन ठेवुन दिली होती. यावर्षीची टाटा अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर पायांना थोडी विश्रांती द्यावी असे मी ठरवले होते. याच दरम्यान अंजलीने मला "कुंभार्लीचा राजा" या सायकल शर्यतीविषयी माहीती दिली. सह्याद्रीच्या घाटात सायकल शर्यत आयोजित केली जात आहे हे ऐकुनच मला फार आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता मी या शर्यतीसाठी नाव नोंदवले. कोकणातुन वर यायचे असेल तर सह्याद्रीत अनेक घाटरस्ते आहेत. त्यापैकी बरेच मी सायकलवर चढवलेले आहेत. मराठा रमतो तो सह्याद्रीतच. भोरघाट, ताम्हीणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी (रडतोंडी) घाट आणि करूळ घाट (बावडा) हे सर्व माझे झालेले आहेत. आता त्या यादीत कुंभार्लीची भर पडणार होती. कुंभार्ली घाट सायकलवर चढवण्याची चालुन आलेली संधी मला सोडायची नव्हती म्हणुन काडीचाही सराव नसताना मी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. कुंभार्लीच्या ओढीने मी पुन्हा सायकलकडे ओढला गेलो.


शर्यतीच्या आदल्यादिवशी मी, अंजली आणि नितीन सोबत चिपळूणला पोचलो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांमार्फत चिपळूण येथील माधव सभागृह येथे करण्यात आलेली होती. तसेच हॉटेलमध्ये रहावयाचे असल्यास हॉटेल बुकींगमध्ये डिस्काउंट मिळण्याची व्यवस्था देखिल करण्यात आलेली होती. हॉटेल निवडण्यासाठी तीन ते चार पर्याय उपलब्ध होते. "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये क्रमाक्रमाने सर्व माहीती मिळत होती. स्पर्धकांना विवीध पर्याय उपलब्ध होते. माधव सभागृह हे या स्पर्धेचे प्रमुख केंद्र होते. बीआयबी घेण्याची वेळ संध्याकाळी 5 ते 8 आणि जेवणाची वेळ 8 ते 9 ठेवण्यात आलेली होती. सर्वांना बीआयबी सोबत जेवणाचे, नाष्टयाचे आणि चहाचे कूपन देण्यात आले होते. सायकलला लावण्याचा बीआयबी आधुनिक पद्धतीचा होता. तो पाहुन मला मलेशिया आयर्नमॅनमधील माझ्या सायकलच्या बीआयबीची आठवण झाली. अगदी तसाच होता. बीआयबी सोबत दोन इलेक्ट्रॉल आणि एक पीनट बटर चिक्की देण्यात आली होती. या दोन गोष्टी सायकल चालवणार्यांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यावरुन असे लक्षात येते की आयोजकांनी सखोल अभ्यास करुन छोटया छोटया गोष्टींचा देखिल खुप बारकाईने विचार केलेला होता. माधव सभागृहामध्ये माझी भेट डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. नेहा टिकम आणि तुषार भोईटे यांच्याशी झाली.

शर्यतीच्या आदल्या दिवशी "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये जी काही इत्यंभुत माहीती दिली जात होती ती वाचुन आमची ऊत्सुकता शिगेला पोचलेली होती. शर्यतीच्या आदल्या दिवशी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने रस्त्यावरील धोकादायक वाटणारे खड्डे त्वरीत बुजवण्यात आले होते. पुण्यात सायकल चालवणार्यांना विचाराल तर ते खड्डे नव्हतेच मुळी पण तरीही त्यांनी ते बुजवले. जिथे रस्त्याचे काम चालु होते तिथे पिवळ्या रंगाने रस्त्यावर सांकेतिक खाणाखुणा करण्यात आलेल्या होत्या. हायड्रेशन पॉइंट जवळ आला आहे हे कळावे म्हणुन काळ्या रस्त्यावर पिवळ्या रंगाने मोठ्या अक्षरात "H" काढलेला होता. अंतिम रेषा जवळ आली आहे हे कळावे म्हणुन 300मी वर अंतरावर मोठया अक्षरात 300meters असे लिहलेले होते. रस्त्यावरील सांकेतिक चिन्ह वाचत सायकल चालवली तर शर्यत पुर्ण करण्यास कसलीही अडचण येणे शक्य नव्हते. सर्वात आनंदाची बातमी शेवटी देण्यात आली ती म्हणजे शर्यती दरम्यान घाटामध्ये अवजड वाहने रोखुन धरण्यात येणार आहेत. यापेक्षा अजुन काय हवंय? माझी जी सर्वात मोठी धाकधुक होती तीच आयोजकांनी संपवली. त्यामुळे आता घाटातही बिनधास्तपणे सायकल चालवता येणार होती. एकंदरीत या शर्यतीत सायकलपटूंची बडदास्त ठेवली होती. माधव सभागृह येथे सर्वांना शुभरात्री आणि शर्यतीसाठी शुभेच्छांची देवाण-घेवाण केल्यानंतर आम्ही हॉटेलकडे निघालो. संध्याकाळच्या वेळी विवीध दुकानांनी सजलेले चिपळूण शहर अतिशय सुंदर दिसत होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम चालु असल्यामुळे (कधीपासुन चालु आहे काय माहीत?) चिपळूण ते हॉटेल रिम्जपर्यंतचे तीन किमी अंतर पार करण्यासाठी पाच वेळा मुख्य रस्त्यावरुन खाली उतरावे लागले. हॉटेल रीम्जमध्येही सोईसुविधांची बडदास्त होती. कुंभार्ली घाटात सायकल चालवण्याच्या धास्तीमुळे त्या सुविधांचा उपभोग घेण्याचे टाळले. सकाळी वेळ वाया जाऊ नये म्हणुन शर्यतीची सर्व तयारी आदल्या रात्रीच करुन ठेवली. पहाटे साडेचारचा अलार्म लावुन बेडवर आडवा झालो.


क्लिटस घालुन शर्यतीला आरंभ होण्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी खूप सर्कस करावी लागली कारण रस्त्याचे काम चालू आहे. स्पर्धा चालु होण्याचे ठिकाण म्हणजे बहादुर शेख नाका सायकलपटूंच्या गर्दीने ओसंडुन वाहत होता. प्रेक्षकही ऊत्सुकतेने पाहत होते. मला ऊशिर झाल्यामुळे माझ्या फोनवर आयोजकांचा कॉल येऊन गेलेला होता. मी त्या नंबरवर कॉल करुन माझी उपस्थिती नोंदवली. स्पर्धेतील स्वयंसेवक एकदम तत्पर दिसत होते. प्रथम एलिट गटाला झेंडा दाखवण्यात आला. एलिट गटाची शर्यत सुरु झाल्यानंतर वय वर्ष चाळीशी पार केलेल्या तरुणांची शर्यत सुरु झाली. शर्यत सुरु झाल्या झाल्या नव्वद अंशात वळण घेऊन न धडपडता क्लिट्स पेडलमध्ये अडकवले आणि मग सायकलला गती दिली. सुरुवातीचे दोन ते तीन किमी सर्वजण सुसाट होते. अनेक क्लबमधील नावाजलेले सायकलपटू या शर्यतीत सहभागी झालेले होते. काही अंतरानंतर प्रत्येकाच्या गती आणि क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार झाले. नंतर काहीजण एकेकटेच सायकल चालवताना दिसत होते. नंबर काढणारे सायकलस्वार केव्हाच पुढे निघुन गेले होते. त्यांच्याशी आपल्याला पंगा घ्यायचाच नव्हता. वाऱ्यापासून वाचण्यासाठी एक दोन रायडर्सच्या चाकामागे सायकल चालवण्याचा प्रयत्न केला परंतु ते फारच हळू चालवत होते. मग मी पुन्हा एकटाच चालवायला लागलो. फोटोग्राफर दुचाकीवरुन फोटो काढत काढत येत होते. फोटोग्राफर दिसल्यावर मी त्याच्यासमोर ऐटीत सायकल चालवली, काही भन्नाट पोझही दिल्या. एवढ्या लांब येऊन कमीत कमी फोटो तरी चांगले यावेत ही माफक अपेक्षा. परंतु त्या फोटोंमध्ये अजुन मला माझा एकही फोटो दिसलेला नाही. एवढी सुंदर जर्सी, मस्त गॉगल घातलेल्या स्मार्ट सायकलस्वाराचा एकही फोटो न यावा यासारखे दु:ख नाही. होता है होता है...


या सर्व धामधुमीत कुंभार्ली घाट सायकलवर पार करावयाचा आहे हे मी विसरलो नव्हतो. याचसाठी केला होता अट्टहास. आज सह्याद्रीतील अजुन एक घाट सायकलवर पार करायला मिळणार या विचाराने मी मनातल्या मनात आनंदी झालो होतो. यासाठी चिपळूण सायकल क्लबचे आभार आणि मैत्रिण अंजली भालिंगे हिचे सुद्धा आभार कारण तिच्यामुळेच मला "कुंभार्लीचा राजा" या शर्यतीबद्दल माहीती मिळाली. हा असा पहिलाच घाट जो शर्यत म्हणून मी सायकलवर चढणार होतो. माझे पेडलवर गरगर पाय फिरवणे चालुच होते. कुम्भार्लीकडे जाणारा रस्ता एकदम भन्नाट होता. माझा सरासरी वेग तीसच्या वर दिसत होता. आदल्या दिवशी व्हाटसअप ग्रुपमध्ये आलेल्या फोटोमध्ये पाहीलेला रस्ता आज मी प्रत्यक्ष पाहत होतो. रस्त्यावर सायकलस्वारांसाठी केलेल्या खुणा पाहुन एखादी व्हिडीओ गेम खेळत आहे असे वाटत होते. पस्तीसच्या वर गती नेणे शक्य वाटत होते परंतु खुप दिवस सायकलिंगचा सराव नसल्यामुळे मी हा धोका पत्करला नाही. क्रँप वगैरे आला किंवा आले तर चढावर सायकल चढवणे दुष्प्राप्य होण्यापेक्षा आरामात शर्यत पूर्ण केलेली केव्हाही उत्तम. घाट सुरु झाल्यानंतर काय वाढुन ठेवले असेल याची पुसटशी सुद्धा कल्पना नसल्यामुळे मी पायातील ऊर्जा वाचवत सायकल चालवत होतो. चढ कसा आहे? सिंहगडासारखा तीव्र असेल की पसरणीसारखा पसरलेला असेल? मध्ये उसंत घ्यायला सपाट रस्ता असेल का? वरंध्यासारखा भयानक तर नसेल ना? असे बरेच प्रश्न मनामध्ये थैमान घालत होते. कारण सह्याद्री कुठे रौद्र रूप धारण करेल सांगता येत नाही.


कुंभार्ली एवढा सौम्य होता की तो सुरु झालेला कळलाच नाही. गारमिन घड्याळामध्ये सतरा किमी अंतर दिसल्यावर कळले की आपण घाटात आहोत. अवजड वाहने घाटमाथ्यावरच थांबवल्यामुळे नागमोडी वळणांच्या घाटात सायकल चालवणे सुसह्य झाले होते. सर्व सायकलपटू अगदी थाटात सायकल चालवत होते. या घाटात कुठेही मांड्यांमध्ये जाळ काढणारा तीव्र चढ नाही किंवा मला तसे जाणवले नसावे. अंतर वाढत जाईल तसतसा हलकेच वाढत जाणारा. हळूहळू चढणाऱ्या व्हिस्कीसारखा. कुम्भार्लीचा चढ कुठेही वसकन अंगावर येत नाही. पसरणीपेक्षा सोपा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मरीआई आणि सिंहगड घाटासारखा चढ ईथे औषधालासुद्धा नाही. थोडक्यात सायकल चालवण्यासाठी कुंभार्ली घाट हा एकदम "गुडबॉय" आहे. ही झाली इतर घाटांशी तुलना पण शेवटी चढ तो चढच असतो. आणि चढावर सायकल चालवताना काय यातना होतात त्या सायकलस्वारांनाच माहीत. चढावर दोन ठिकाणी पाण्याच्या बाटल्या मिळाल्या. त्यामुळे घसा कोरडा पडला नाही. त्यापैकी एके ठिकाणी पाण्याची बाटली आणि केळ दोन्ही उपलब्ध होते. परंतू मला एका हाताने फक्त पाण्याची बाटलीच घेता आली. पुढच्या वेळी केळ आणि बाटली दोन्ही घेण्यात येईल.

शर्यतीतले शेवटचे पाच किमी बाकी असताना अंजली भालिंगेने मला मागे टाकले. ती अतिशय वेगात माझ्या पुढे निघुन गेली. महिलांची रेस पाच मिनिटे ऊशिरा सुरु होऊन सुद्धा तिने हे अंतर जलदगतीने पार केले होते. दुसऱ्या दिवशी महीलांनी पुरूषांना मागे टाकले अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकली ती काही उगाच नाही. मी माझ्या गतीने सायकल चालवता राहिलो. घाटात मी दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि दोघांनी मला मागे टाकले त्यामुळे क्रमवारीत कसलाही फरक पडला नाही. पीटर सगान स्टाईलने स्प्रिंट मारत मी अंतिम रेषा पार केली. सगानची फक्त स्टाईल गती नव्हे. अंतिम रेषा पार केल्यानंतरही मी ताजातवाना होतो. अंतिम रेषेपासून घाटाचा थोडा चढ शिल्लक होता. मी घाट जिथे संपतो तिथपर्यंत सायकल हातात धरुन चालत गेलो आणि मगच गारमिन बंद केले. सकाळी शर्यत सुरु होण्याच्या अगोदर तीस सेकंद गारमिन चालु करुन ठेवले होते आणि तिथे पोचल्यावर ऊशिरा बंद केले. त्यामुळे एक तास बत्तीस मिनिटे अशी जरी माझी वेळ दिसत असली तरी ती दिड तासाच्या आत आहे. शर्यतीसाठी लागलेली वेळ आयोजकांकडुन कळेल असे मला वाटले होते त्यामुळे मी गारमिनच्या वेळेला जास्त महत्व दिले नाही. परंतु आयोजकांनी फक्त विजेत्या स्पर्धकांच्या वेळा नोंदवल्या. माझ्या पाठोपाठ डॉ. नेहा टिकमने अंतिम रेषा पार केली. महीलांच्या खुल्या गटात अंजली भालिंगेने प्रथम तर नेहा टिकमने चतुर्थ क्रमांक पटकावला. पुण्यातील या दोन सायकल क्वीन्स सोबत फोटो काढण्याची संधी मी दवडली नाही. तसेच डॉ. आदित्य पोंक्षे यांची सुद्धा भेट झाली. त्यांनी उत्तम कामगिरी करत सातवा क्रमांक पटकावला. तिथे सर्वांसोबत चहा घेतला आणि मी पुन्हा चिपळूणकडे प्रस्थान केले. शर्यत संपल्यामुळे थांबवून ठेवलेले ट्रक आता रस्त्यावरून धावू लागले होते. त्यामुळे घाट चढताना जेवढे सुसह्य झाले तेवढे तो उतरताना असह्य झाले. अवाढव्य आणि अवजड वाहनांसोबत घाट उतरताना खूप खबरदारी घ्यावी लागली. घाट उतरल्यावर मी सायकलवर न केलेल्या घाटांची नावे आठवु लागलो. ते म्हणजे आंबा, फोंडा आणि आंबोली हे तीन घाट आहेत. आता यांच्यावर स्वारी करण्यासाठी योग्य मुहूर्त शोधावा लागणार आहे. बहादूर शेख नाक्याला मी सरासरी तीसच्या गतीने पोचलो.


बक्षिस समारंभ माधव सभागृह येथे होणार होता. त्यामुळे शर्यत संपल्यावर पुन्हा माधव सभागृह येथे यावे लागले. मुंबई, पुणे सोडुन चिपळूण सारख्या छोटया शहरात अशी भव्य सायकल स्पर्धा होणे ही काही साधी गोष्ट नाही. याचे सर्व श्रेय आयोजकांना आणि प्रायोजकांना द्यावे लागेल. आयोजकांमधील ऊत्साह वाखाणण्याजोगा होता. विजेत्यांसाठी भव्य चषक आणि रोख रकमेच्या बक्षिसांची अक्षरश: खैरात करण्यात आलेली होती. परंतु महिला आणि पुरुषांच्या बक्षिस रकमेमध्ये प्रचंड तफावत होती. यामध्ये साम्य असायला हवे होते असे मला वाटते. आजकाल भारतीय क्रिकेट मंडळ सुद्धा महीला आणि पुरुष खेळाडुंमध्ये भेदभाव करत नाही. विराट कोहली आणि स्मृती मनधाना या दोघांना एक सामना खेळण्यासाठी सामान पगार दिला जातो. आपल्या क्रिकेटवेडया देशातील लोकांनी ही गोष्ट चटकन शिकायला हवी. कारण महीला आणि पुरुष सर्वजण सारखेच कष्ट घेतात. असोत...

अवघ्या तीन वर्षापुर्वी स्थापन झालेल्या चिपळूण सायकल क्लबने या शर्यतीचे आयोजन करुन कमाल करुन दाखवलेली आहे. या शर्यतीचे हे दुसरे वर्ष होते हे विशेष. कोकणभूमीला साजेशी सायकल शर्यत त्यांनी आयोजित केली. परदेशी बीआरएम तर आता सर्रास सर्वच ठिकाणी आयोजित केल्या जातात. सायकल शर्यतीसाठी आपली भौगोलिक परीस्थिती उपयोगात आणण्याचे महत्वाचे काम चिपळूण सायकल क्लबने केलेले आहे. स्थानिक नेतृत्वाचा या शर्यतीला असलेला पाठींबा फार फार कौतुकास्पद आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय मोठे यश मिळत नाही. "केवळ अप्रतिम" एवढा एकच अभिप्राय या शर्यतीला देऊ शकतो. भविष्यात सर्वांनी या शर्यतीत सहभागी व्हावे.
येवा कोकण आपलाच असा!

-विजय सुरेश वसवे.
(आयर्नमॅन)
9850904526
with Queens of cycling
with Winner Anjali Bhalinge

with Dr. Neha Tikam

with Dr. Aditya Ponkshe

With Anjali Bhalinge
tea after race with Chiplun cyclst


Night before race



Hotel Reemj, Chiplun


Hotel Ekveera, Chiplun



Tuesday, 24 January 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)




रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते. 


धावपटुंची त्यांच्या पळण्याच्या गतीनुसार A, B, C, D, E, F, अशा विवीध गटांमध्ये विभागणी केलेली असते. माझ्यासारखे सब-फोर वाले A विभागात होते. A वाल्यांना शर्यत सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. कमी वेगाने धावणार्यांचा वेगात पळणार्यांना अडथळा होऊ नये म्हणुन ही तजवीज केलेली असते. दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने सर्व विभागातील धावपटूंना आरंभ रेषेकडे सोडण्यात आले आणि प्रत्येकजण सुसाट निघाला. दहा ते पंधरा मिनिटांत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील रस्त्यावर 7205 मॅरेथॉनपटु (42.2 किमी धावणारे) धावु लागले. त्यामध्ये 668 महिलांचा समावेश होता. मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीला सुद्धा लाजवेल एवढी धावपटूंची गर्दी रस्त्यावर दिसु लागली. पहील्या पाच किमी मध्ये गर्दीच्या गतीने धावणे भाग पडत होते कारण गर्दीमुळे एखाद्याला ओलांडुन पुढे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते. म्हणुन आपापल्या डिव्हीजनची आरंभ वेळ कदापिही चुकवु नये. पहील्या पाच किमी मध्ये तुम्ही जर तुमच्यापेक्षा हळु धावणार्यांच्या गर्दीत अडकला तर नदीच्या प्रवाहातील भोवर्यात अडकल्यासारखी तुमची अवस्था होईल एवढे मात्र नक्की. त्यातुन लवकर बाहेर पडणे शक्य होत नाही. मरीन ड्राईव्हच्या ऐसपैस रस्त्यावर आल्यावर मोकळा श्वास घ्यावयास मिळाला. आम्ही अजुनही अंधारातच धावत होतो. मरीन ड्राईव्हचा परिसर बघ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला होता. समुद्राच्या कडेने ऐकु येणारे बॅंड, पंजाबी ढोल आणि मराठमोळा ढोल-ताशा धावपटूंचा ऊत्साह द्विगुणित करत होता. ढोल-ताशाचा आवाज ऐकल्यावर अंगात चैतन्याची लहर संचारली. 


सर्वकाही अपेक्षेनुसार होत होते. हृदयावर कोणाताही ताण न घेता विनासायास मिळणार्या गतीने माझी धावाधाव सुरु होती. अधुन मधुन स्टेडफास्टच्या पिनट बटरचा एकेक घास घशाखाली उतरवणे चालु होते. एकदम सर्व सॅचेट खाल्ले जात नाही म्हणुन मी एक घास खाऊन ते सॅचेट पुन्हा खिशामध्ये ठेवत होतो. ठराविक वेळाने मीठाच्या गोळ्या आणि पॉवर जेल घेणे सुरू होते. त्यामुळे संपुर्ण मॅरेथॉनमध्ये कुठेही रसद कमी पडल्याचे जाणवले नाही. पेडरचा चढ आल्यावर मी गपगुमानपणे चालत चालत अंतर कापले. चढावर कमी झालेल्या गतीची सरासरी उतारावर भरून काढली. वाटेत मिळणार्या पाण्याच्या बाटल्या आवर्जुन घेतल्या. जे काही प्यायला मिळत होते ते सर्व घशाखाली उतरवत होतो. आजुबाजुला काही ओळखीचे रनर्स दिसु लागले होते. त्यांना पाहुन धावण्याचा हुरूप वाढला. मुंबई मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण म्हणजे वरळी सिलिंक पुल. या पुलावर धावण्यास मिळणार ही कल्पनाच खुप आनंद देणारी असते. परंतु माझे दुर्भाग्य असे की मी अंधारात वरळी सीलिंकवर प्रवेश केला. सब-फोर साठी कुत्रे मागे लागल्यासारखे धावत होतो. सब-फोर करावयाची असेल तर सिलिंक विसरावा लागतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"


मुंबई मॅरेथॉनची खरी मजा 23 ते 24 किमी नंतर यायला सुरूवात झाली. रस्त्यावरील प्रेक्षक आता फक्त प्रेक्षक न राहता टाळ्या वाजवुन, आवाज देऊन प्रसंगी सोबत पळुन धावपटूंचा ऊत्साह वाढवु लागले होते. काहींनी स्वखर्चाने केळी, संत्री, बिस्कीटे, लेमनच्या गोळ्या, स्प्राईट, थम्सअप तसेच पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावलेले होते. मुंबईचे स्पिरीट म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. युरोपमधील काही स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आलेले लोक तिकडच्या प्रेक्षकांचे गोडवे गाताना मी ऐकलेले आहे. नशिब मला हा अनुभव घेण्यासाठी युरोपला जावे लागले नाही. मी तो अनुभव महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मुंबईतच घेतला. मुंबई मॅरेथॉनमध्ये पळणार्यांची आज खुप काळजी घेतली जात होती. सासरवाडीला आलेल्या जावईबापुंसारखा आमचा जागोजागी पाहुणचार होत होता. सर्वत्र एकच जल्लोष दिसत होता तो म्हणजे, "हर दिल मुंबई". प्रेक्षक आपापल्या परीने मॅरेथॉनचा आनंद घेत होते. परंतु सहभागी स्पर्धकांसाठी मॅरेथॉनमध्ये धावणे ही आनंदाची गोष्ट मूळीच नसते. प्रत्यक्ष धावणारे हे वेगळ्याच विश्वात गेलेले असतात. छातीच्या धडधडीचा वेग हा आगगाडीच्या धडधडीच्या वेगापेक्षाही जास्त झालेला असतो. त्या शोलेतील आगगाडीची धडधड आठवा आणि त्यात कोळसा टाकणारा वीरू म्हणजे धर्मेंद्र.  अगदी तशीच अवस्था शरीराची झालेली असते. एकदाची अंतिम रेषा येवोत आणि या धावण्याच्या कटकटीतुन मुक्त व्हावे असे मनापासुन वाटायला लागले होते. अरे ही मॅरेथॉन संपत का नाही आहे? हा प्रश्न "ये दिवार टुटती क्युं नहीं?" या जाहीरातीतील सुरासारखा केविलवाण्या स्वरात विचारावासा वाटत होता. मी फिनिश लाईनला सहीसलामत पोचेल ना आज? माझी सब-फोर होईल की नाही? मला क्रॅंप तर येणार नाही ना? असे नाना प्रश्न मला भेडसावत होते. कितीही त्रास होत असला तरी पायांची गती मंदावलेली नव्हती.


तिसाव्या किमी पर्यंत माझी गती 05:20 मिनिटे प्रती किमी होती. सर्वकाही सुरळीत चाललेले होते. पण मेजवानीच्या जेवणात जसा मीठाचा खडा यावा तसा सुरळीत चाललेल्या माझ्या मॅरेथॉनमध्ये पेड्डर रोड आडवा आला. त्यावेळेस पेड्डर रोडशी दोनहात करण्याएवढे त्राण माझ्या अंगात शिल्लक राहीलेले नव्हते. परीस्थिती बिकट असेल तर दोन पावले मागे आलेले केव्हाही उत्तम. मी पेड्डरच्या चढावर चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला. चढावरील अंतर चालत चालत पार करत असताना माझे जिवलग मित्र मला भेटले. पेड्डर रोडच्या हायड्रेशन पॉईंटवर ते अधिकृत वोलिंटियर्स म्हणुन काम पाहत होते. "भाऊ रन..." असा जोरात आवाज देऊन त्यांनी माझ्यात नवचैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. डाव्या मांडीच्या स्नायुने कुरबुर करायला सुरूवात केली होती त्यामुळे चढावर कमी झालेल्या गतीची कसर उतारावर भरून काढता आली नाही. डाव्या मांडीचा स्नायु गतीला प्रतिसाद देईनासा झाला होता. गती वाढवायला गेलो की वेदनेची कळही वाढत असे. मोडकळुन पडण्यापेक्षा जी गती मिळेल त्या गतीने धावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. ईथुन पुढे प्रत्येक किमीला आवश्यक असणारी गती राखणे मला कठीण जाऊ लागले होते.


आता चारच किमी राहीले आहे, आता तीनच, आता दोनच असे करत करत मरीन ड्राईववरून डावीकडे वळालो. तेव्हा अवघे चारशे मीटर शिल्लक होते. हाफ मॅरेथॉन पळुन झालेले स्पर्धक अम्बॅसॅडर हॉटेलजवळ ऊभे राहुन थकलेल्यांचा ऊत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पंक्चर झालेले चाक हवा भरून कसेबसे पंक्चरच्या दुकानापर्यंत पोचवतात तसे हे आमच्या सारख्या हवा गेलेल्या रनर्सना अंतिम रेषेपर्यंत पोचवण्यासाठी आमच्यामध्ये हवा भरत होते. त्यात बरेचसे पुण्यातील असल्यामुळे जरा धीर आला. पुणेवाल्यांनी ऊत्साह वाढवल्यावर मुंबई मॅरेथॉनच्या पताका लावलेल्या रस्त्यावर आलो. तेथुन अंतिम रेषा नजरेच्या टप्प्यात आली. आता थांबायचे नाही असे म्हणत जेवढी हवा शिल्लक होती तेवढी वापरून मी पळत राहीलो. शेवटी मी दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि मॅरेथॉन पळण्याच्या त्रासातुन मुक्त झालो. मी 3 तास 54 मिनिटे 11 सेकंद वेळ नोंदवली. ही माझी दुसरी मुंबई मॅरेथॉन. दोन्हीही सब-फोर आहेत आणि आजचा हा माझा वैयक्तिक विक्रम. अंतिम रेषेजवळ दोन मिनिटे शवासन केल्यानंतर आता मेडल घेण्यासाठी निघालो. तिथुन मेडल घेण्यासाठी एक-दिड किमी पायपीट करावी लागली. मेडल मिळाले त्यानंतर मस्त हिरवळीवर ऊन खात पडुन राहीलो. खुप हौस ना मॅरेथॉन पळण्याची, पळशील का आता मॅरेथॉन? तर त्यावेळेस माझे उत्तर "नाही" असे होते.    






Friday, 20 January 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी) 


 ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो.


17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उधाण आलेले होते. कोरोना महामारीमुळे 2021 आणि 2022 अशी दोन वर्षे मुंबई मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. मी 2020 साली मुंबई मॅरेथॉनमध्ये पहील्यांदा भाग घेतला होता आणि तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. "लव अ‍ॅट फर्स्ट साईट" म्हणतात ना अगदी तसेच. प्रेम झाले खरे पण प्रेम म्हटले कि ओघाने विरह आलाच. मॅरेथॉनच्या प्रेमात विरह सहन करावा लागेल असा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. दोन वर्षांचा असह्य विरह सहन करावा लागला. 2023 साली मुंबई मॅरेथॉन पुन्हा भेटीला येण्यासाठी तयार होत होती. तिच्या भेटीसाठी मीही आतुर झालेलो होतो. आता प्रेयसीला भेटायचे म्हटल्यावर जय्यत तयारी करणे भाग होते. कॉलेजच्या दिवसांपासुन मी या कामामध्ये आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आहे. मुंबई मॅरेथॉन भेटीच्या तीव्र ईच्छेनेच मला रनिंग सुरु करण्यास प्रवृत्त केले. 


माझे रनिंग जवळजवळ एक वर्षापासुन बंद होते. काहीच सराव न केल्यामुळे पायांना गंज चढलेला होता. हा गंज उतरवणे अपरीहार्य होते. फुफ्पुस आणि हृदय तर म्हणत होते कि "पुन्हा त्या रनिंगच्या फंदात नको" पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी रनिंगचा फिटनेस पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार केला. रनिंग हा असा व्यायाम आहे ज्यामध्ये घाई करून चालत नाही. कसलीही घाई न करता क्रमाक्रमाने धावण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणे क्रमप्राप्त होते. घाई केल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. पुनरागमन करताना आपल्या मनामध्ये जी धावण्याची गती असते ती शरीराला झेपत नाही. त्यामुळे शरीराच्या कलाकलाने घेतलेले केव्हाही उत्तम भले आपले मन परीकथेतील घोड्यासारखे धावत असले तरीही.


सुरूवात करण्यासाठी नवरात्री वॉक चॅलेंजच्या निमित्ताने एक चांगली संधी चालुन आली. नऊ वेगवेगळ्या रंगांचे टि-शर्ट आणि सलग नऊ दिवस मित्र-मैत्रिणींसोबत हत्ती डोंगरावर चालायला जात होतो. खुप मज्जा येत असे. हत्ती डोंगरावर चालण्याचा व्यायाम केल्यामुळे हृदय आणि पायाच्या स्नायुंना थोडी बळकटी मिळाली. तरीही पूर्वीच्या गतीने धावता येईल कि नाही याबद्दल शंका वाटत होती. मी दसर्याला शस्त्रपूजनासोबत नाईकी शूजचे पुजन केले आणि 8 ऑक्टोबरपासुन पळायला सुरूवात केली. मी रनिंगच्या प्रोसेसवर विश्वास ठेवुन स्वत:च स्वत:साठी वर्कआउट तयार करत गेलो आणि स्वत:च त्याचे मुल्यमापन करून स्वत:लाच सुचना देऊ लागलो होतो. न थांबता पाच किमी अंतर पळण्यापासुन मी सुरूवात केली. खुप दिवसांनी पाच किमी पळाल्यामुळे खुप दम लागला. न थांबता पाच किमी पळणे किती अवघड असु शकते याची मी प्रचिती घेतली. या पाच किमी मध्ये छातीचा भाता चांगलाच फुलला होता. अल्कोहोल आणि धूर सोबतच बाहेर पडत होते. अंतर पाच किमी, लागलेला वेळ 31 मिनिटे 32 सेकंद. एवढा त्रास झाला कि ती मुंबई मॅरेथॉनची झंझट नको असे वाटले होते. मॅरेथॉन पळणे माझ्या आवाक्याबाहेर गेलेले आहे हे मला स्पष्ट जाणवत होते. मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करून जीवनाचा आनंद घ्यायचा कि पळायला जाऊन स्वत:ला त्रास करून घ्यायचा असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी दुसरा पर्याय निवडला. "Love the pain" हे माझे आवडते ब्रीदवाक्य मला आठवले.


दर आठवडयाच्या शेवटी म्हणजे रविवारी 10 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 15 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 20 किमी तर त्याच्या पुढच्या रविवारी 25 किमी अंतर पळण्याचा वर्कआऊट मी तयार केला. या पद्धतीने गेल्यास धावण्याचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल यात मला काहीही शंका वाटत नव्हती. रनिंगला जाताना मी एकटाच असायचो, ना कोणाची सोबत ना कुठला ग्रुप. असे करत करत नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी न थांबता 30 किमी अंतर 6 पेक्षा कमी गतीने धावलो. ईथेच मला जाणवले कि माझे पुनरागमन यशस्वी झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महीन्यात 200+ किमी अंतर धावाधाव केली. नोव्हेंबर महीना खुप खडतर गेला. डिसेंबर महीन्यात सातत्य ठेवणे गरजेचे होते. जे मिळवलंय ते जोपासण्याची गरज होती. मी विनासायास सब-टू हाफ मॅरेथॉन करू लागलो. या सर्व कालावधीत स्टेडफास्ट नुट्रीशन माझ्या सोबतीला होते. प्रोटीनमुळे रिकवरी खुप छान होत असे त्यामुळे मला कसलीही चिंता नव्हती. अशा रीतीने दोन-अडीच महीने स्वत:च्याच तालमीत तावुन सुलाकुन निघाल्यानंतर मी नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो. 


जानेवारी उजाडल्यानंतर फक्त मुंबई मॅरेथॉनची आस लागलेली होती. "भेटीलागी जीवा" या तुकोबांच्या अभंगासारखी. आदल्या दिवशी आम्ही ट्रेनने मुंबईला निघालो. पुणे-मुंबई ट्रेनचा प्रवास नेहमीप्रमाणे ऊत्साहवर्धक होता. ट्रेनमधील पन्नास टक्के प्रवासी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावयास निघालेले होते. बीआयबी घ्यायला जाणे हे फार कटकटीचे काम असते. दादर ते कुर्ला हा लोकल ट्रेनचा प्रवास फार जीवावर येतो म्हणुन आम्ही यावेळेस ठाण्याला उतरून लोकलने कुर्ल्याला पोचलो. आपला बीआयबी दुसर्याला आणावयास सांगणे यासारखे सुख नाही. दुसर्याला बीआयबी आणायला सांगणारे लोक खरेच खुप हुषार म्हणायला हवेत. पुन्हा रूबाबात म्हणायला मोकळे की तुझे आणायला जाणारच होतास ना मग माझे आणले म्हणुन काय झाले? असोत. बीआयबी घेण्याच्या नादात जेवणाची वेळ निघुन गेली. पाठीवर वजनदार बॅग घेऊन मुंबई दर्शन केल्यामुळे थकवा सुद्धा आला. पुढच्या वर्षी हे टाळणे गरजेचे आहे असे मला जाणवले. त्यामुळे आता असे ठरवले आहे कि पुण्याहुन निघालो कि सर्वप्रथम हॉटेलवर जायचे, पाठीवरची सॅक हॉटेल रूमवर ठेवायची, मस्त जेवण करून घ्यायचे आणि मग निवांत एक्स्पोमधील गर्दी कमी झाल्यावर बीआयबी घ्यायला जायचे. अनावश्यकपणे उपासमार आणि दमछाक ओढवुन घेण्यात काहीही अर्थ नाही. ही माझ्या सुपीक डोक्यातुन आलेली कल्पना आहे. बीआयबी घेऊन हॉटेल शबानावर पोचलो आणि मॅरेथॉन पळण्याच्या तयारीला लागलो. आता उद्या मुंबई मॅरेथॉन पळणार या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहत होते.

क्रमश:

 


Tuesday, 1 November 2022

वाजवा कि हॉर्न (मलेशिया)

"Horn Please"
मलेशियामध्ये बुधवारी सकाळी सायकलचा सराव करण्यासाठी बाहेर पडलो. नवखे रस्ते, नवखा परीसर आणि सारे लोकही नवखे होते. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आलेले या नजरेतुनच आमच्याकडे सर्वजण पाहत होते. प्रसाद, नंदकुमार, पुष्कराज आणि मी आयर्नमॅनच्या रूटवर सायकल चालवायला निघालो. वाहतुक फारशी नव्हती. लोकांची गर्दीही जाणवत नव्हती. गाड्या चालवणारे काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळत होते. दाबादाबी नाही की पुढे जाण्याची कोणाला घाई नाही. सर्व काही शिस्तीत चालु होते. प्रत्येकजण समोरच्याला अगोदर जाण्यास प्राधान्य देत होता. पहले आप.. पहले आप सारखे. पावसाचे थेंब यायला लागल्यामुळे मोबाईल हॉटेल रूमवरच ठेवुन दिला त्यामुळे सायकल रूटचे फोटो आणि व्हिडिओ काढता आले नाहीत.
रस्त्यावर गर्दी नाही, राँग साईडने येणारे कोणी नाही हे पाहुन मला खुप चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले होते.  साधा हॉर्न वाजवणारे सुद्धा कोणी नव्हते. हॉर्नचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर व्हायला लागले होते. काय करावे मला सुचत नव्हते. कम्बख्त कोई तो हॉर्न बजाओ रे... असं मी म्हटलं सुद्धा पण माझी भाषा काही त्यांना कळाली नाही.
शेवटी मी ठरवलं काहीही होवो आज हॉर्नचा आवाज ऐकुनच हॉटेल रूमवर जायचं. असे ठरवल्यानंतर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवायला लागलो. आतातरी नक्कीच हॉर्न ऐकायला मिळेल पण नाही.. एक बहाद्दर माझ्या मागे मागे माझ्याच वेगात कार चालवु लागला पण त्याने हॉर्न काही वाजवला नाही. शेवटी मीच कंटाळलो आणि एका बाजुला झालो मग तो त्याच्या वेगात निघुन गेला. आता मात्र मी आशा सोडुन दिल्या होत्या. मलेशियन लोक हॉर्न वाजवतील असे काही वाटत नव्हते. मी पुन्हा नेटाने सायकल चालवु लागलो. एक छोटासा चढ आला. त्या चढावर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवु लागलो. नंदकुमार आणि मी सोबत सायकल चालवत होतो. बराच वेळ तशी सायकल चालवल्यानंतर एका कारवाल्याचा संयम सुटला आणि त्याने फक्त एकदाच हॉर्न वाजवला... अहाहा... कानांना काय बरे वाटले म्हणुन सांगु. मी हॉर्न ऐकला.. मी हॉर्न ऐकला..
पुर्ण दिवसभर त्या हॉर्नच्या लहरी कानावर तरंगत राहील्या. माझ्या कानांना हॉर्नफोबिया झाल्याचे नुकतेच माझ्या निदर्शनास आले आहे. आता कधी एकदा सिंहगड रोड वर हॉर्न ऐकायला जातोय असे झाले आहे.
😆
23/10/2019

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

नाईट बीआरएम २०० किमी कलिंगड आणि खीर बीआरएम रायडर नं ८७ (८ तास १८ मिनिटे) रायडर नंबर ८७ सक्रीय झाला...!           यापुर्वी मी पुणे रँदोनियर्...