Saturday 22 April 2023

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत


शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा

आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब
मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा
अंतर - 29 किमी
तारीख - 16 एप्रिल, 2023
रनिंगमध्ये मॅरेथॉनची वेळ सुधारण्याच्या नादात माझे सायकल चालवणे मागे पडले होते हे मला मान्य करावेच लागेल. गेली दोन वर्षे झाले पन्नास हजार किमी सायकलिंगचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक हजार पेक्षाही कमी अंतराची आवश्यकता असताना माझ्याकडुन तोही पार झालेला नाही. जुन महीन्यातील पुणे पंढरपुर सायकलवारी झाल्यानंतर सायकल स्वच्छ करुन मस्तपैकी टांगुन ठेवुन दिली होती. यावर्षीची टाटा अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर पायांना थोडी विश्रांती द्यावी असे मी ठरवले होते. याच दरम्यान अंजलीने मला "कुंभार्लीचा राजा" या सायकल शर्यतीविषयी माहीती दिली. सह्याद्रीच्या घाटात सायकल शर्यत आयोजित केली जात आहे हे ऐकुनच मला फार आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता मी या शर्यतीसाठी नाव नोंदवले. कोकणातुन वर यायचे असेल तर सह्याद्रीत अनेक घाटरस्ते आहेत. त्यापैकी बरेच मी सायकलवर चढवलेले आहेत. मराठा रमतो तो सह्याद्रीतच. भोरघाट, ताम्हीणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी (रडतोंडी) घाट आणि करूळ घाट (बावडा) हे सर्व माझे झालेले आहेत. आता त्या यादीत कुंभार्लीची भर पडणार होती. कुंभार्ली घाट सायकलवर चढवण्याची चालुन आलेली संधी मला सोडायची नव्हती म्हणुन काडीचाही सराव नसताना मी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. कुंभार्लीच्या ओढीने मी पुन्हा सायकलकडे ओढला गेलो.


शर्यतीच्या आदल्यादिवशी मी, अंजली आणि नितीन सोबत चिपळूणला पोचलो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांमार्फत चिपळूण येथील माधव सभागृह येथे करण्यात आलेली होती. तसेच हॉटेलमध्ये रहावयाचे असल्यास हॉटेल बुकींगमध्ये डिस्काउंट मिळण्याची व्यवस्था देखिल करण्यात आलेली होती. हॉटेल निवडण्यासाठी तीन ते चार पर्याय उपलब्ध होते. "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये क्रमाक्रमाने सर्व माहीती मिळत होती. स्पर्धकांना विवीध पर्याय उपलब्ध होते. माधव सभागृह हे या स्पर्धेचे प्रमुख केंद्र होते. बीआयबी घेण्याची वेळ संध्याकाळी 5 ते 8 आणि जेवणाची वेळ 8 ते 9 ठेवण्यात आलेली होती. सर्वांना बीआयबी सोबत जेवणाचे, नाष्टयाचे आणि चहाचे कूपन देण्यात आले होते. सायकलला लावण्याचा बीआयबी आधुनिक पद्धतीचा होता. तो पाहुन मला मलेशिया आयर्नमॅनमधील माझ्या सायकलच्या बीआयबीची आठवण झाली. अगदी तसाच होता. बीआयबी सोबत दोन इलेक्ट्रॉल आणि एक पीनट बटर चिक्की देण्यात आली होती. या दोन गोष्टी सायकल चालवणार्यांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यावरुन असे लक्षात येते की आयोजकांनी सखोल अभ्यास करुन छोटया छोटया गोष्टींचा देखिल खुप बारकाईने विचार केलेला होता. माधव सभागृहामध्ये माझी भेट डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. नेहा टिकम आणि तुषार भोईटे यांच्याशी झाली.

शर्यतीच्या आदल्या दिवशी "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये जी काही इत्यंभुत माहीती दिली जात होती ती वाचुन आमची ऊत्सुकता शिगेला पोचलेली होती. शर्यतीच्या आदल्या दिवशी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने रस्त्यावरील धोकादायक वाटणारे खड्डे त्वरीत बुजवण्यात आले होते. पुण्यात सायकल चालवणार्यांना विचाराल तर ते खड्डे नव्हतेच मुळी पण तरीही त्यांनी ते बुजवले. जिथे रस्त्याचे काम चालु होते तिथे पिवळ्या रंगाने रस्त्यावर सांकेतिक खाणाखुणा करण्यात आलेल्या होत्या. हायड्रेशन पॉइंट जवळ आला आहे हे कळावे म्हणुन काळ्या रस्त्यावर पिवळ्या रंगाने मोठ्या अक्षरात "H" काढलेला होता. अंतिम रेषा जवळ आली आहे हे कळावे म्हणुन 300मी वर अंतरावर मोठया अक्षरात 300meters असे लिहलेले होते. रस्त्यावरील सांकेतिक चिन्ह वाचत सायकल चालवली तर शर्यत पुर्ण करण्यास कसलीही अडचण येणे शक्य नव्हते. सर्वात आनंदाची बातमी शेवटी देण्यात आली ती म्हणजे शर्यती दरम्यान घाटामध्ये अवजड वाहने रोखुन धरण्यात येणार आहेत. यापेक्षा अजुन काय हवंय? माझी जी सर्वात मोठी धाकधुक होती तीच आयोजकांनी संपवली. त्यामुळे आता घाटातही बिनधास्तपणे सायकल चालवता येणार होती. एकंदरीत या शर्यतीत सायकलपटूंची बडदास्त ठेवली होती. माधव सभागृह येथे सर्वांना शुभरात्री आणि शर्यतीसाठी शुभेच्छांची देवाण-घेवाण केल्यानंतर आम्ही हॉटेलकडे निघालो. संध्याकाळच्या वेळी विवीध दुकानांनी सजलेले चिपळूण शहर अतिशय सुंदर दिसत होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम चालु असल्यामुळे (कधीपासुन चालु आहे काय माहीत?) चिपळूण ते हॉटेल रिम्जपर्यंतचे तीन किमी अंतर पार करण्यासाठी पाच वेळा मुख्य रस्त्यावरुन खाली उतरावे लागले. हॉटेल रीम्जमध्येही सोईसुविधांची बडदास्त होती. कुंभार्ली घाटात सायकल चालवण्याच्या धास्तीमुळे त्या सुविधांचा उपभोग घेण्याचे टाळले. सकाळी वेळ वाया जाऊ नये म्हणुन शर्यतीची सर्व तयारी आदल्या रात्रीच करुन ठेवली. पहाटे साडेचारचा अलार्म लावुन बेडवर आडवा झालो.


क्लिटस घालुन शर्यतीला आरंभ होण्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी खूप सर्कस करावी लागली कारण रस्त्याचे काम चालू आहे. स्पर्धा चालु होण्याचे ठिकाण म्हणजे बहादुर शेख नाका सायकलपटूंच्या गर्दीने ओसंडुन वाहत होता. प्रेक्षकही ऊत्सुकतेने पाहत होते. मला ऊशिर झाल्यामुळे माझ्या फोनवर आयोजकांचा कॉल येऊन गेलेला होता. मी त्या नंबरवर कॉल करुन माझी उपस्थिती नोंदवली. स्पर्धेतील स्वयंसेवक एकदम तत्पर दिसत होते. प्रथम एलिट गटाला झेंडा दाखवण्यात आला. एलिट गटाची शर्यत सुरु झाल्यानंतर वय वर्ष चाळीशी पार केलेल्या तरुणांची शर्यत सुरु झाली. शर्यत सुरु झाल्या झाल्या नव्वद अंशात वळण घेऊन न धडपडता क्लिट्स पेडलमध्ये अडकवले आणि मग सायकलला गती दिली. सुरुवातीचे दोन ते तीन किमी सर्वजण सुसाट होते. अनेक क्लबमधील नावाजलेले सायकलपटू या शर्यतीत सहभागी झालेले होते. काही अंतरानंतर प्रत्येकाच्या गती आणि क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार झाले. नंतर काहीजण एकेकटेच सायकल चालवताना दिसत होते. नंबर काढणारे सायकलस्वार केव्हाच पुढे निघुन गेले होते. त्यांच्याशी आपल्याला पंगा घ्यायचाच नव्हता. वाऱ्यापासून वाचण्यासाठी एक दोन रायडर्सच्या चाकामागे सायकल चालवण्याचा प्रयत्न केला परंतु ते फारच हळू चालवत होते. मग मी पुन्हा एकटाच चालवायला लागलो. फोटोग्राफर दुचाकीवरुन फोटो काढत काढत येत होते. फोटोग्राफर दिसल्यावर मी त्याच्यासमोर ऐटीत सायकल चालवली, काही भन्नाट पोझही दिल्या. एवढ्या लांब येऊन कमीत कमी फोटो तरी चांगले यावेत ही माफक अपेक्षा. परंतु त्या फोटोंमध्ये अजुन मला माझा एकही फोटो दिसलेला नाही. एवढी सुंदर जर्सी, मस्त गॉगल घातलेल्या स्मार्ट सायकलस्वाराचा एकही फोटो न यावा यासारखे दु:ख नाही. होता है होता है...


या सर्व धामधुमीत कुंभार्ली घाट सायकलवर पार करावयाचा आहे हे मी विसरलो नव्हतो. याचसाठी केला होता अट्टहास. आज सह्याद्रीतील अजुन एक घाट सायकलवर पार करायला मिळणार या विचाराने मी मनातल्या मनात आनंदी झालो होतो. यासाठी चिपळूण सायकल क्लबचे आभार आणि मैत्रिण अंजली भालिंगे हिचे सुद्धा आभार कारण तिच्यामुळेच मला "कुंभार्लीचा राजा" या शर्यतीबद्दल माहीती मिळाली. हा असा पहिलाच घाट जो शर्यत म्हणून मी सायकलवर चढणार होतो. माझे पेडलवर गरगर पाय फिरवणे चालुच होते. कुम्भार्लीकडे जाणारा रस्ता एकदम भन्नाट होता. माझा सरासरी वेग तीसच्या वर दिसत होता. आदल्या दिवशी व्हाटसअप ग्रुपमध्ये आलेल्या फोटोमध्ये पाहीलेला रस्ता आज मी प्रत्यक्ष पाहत होतो. रस्त्यावर सायकलस्वारांसाठी केलेल्या खुणा पाहुन एखादी व्हिडीओ गेम खेळत आहे असे वाटत होते. पस्तीसच्या वर गती नेणे शक्य वाटत होते परंतु खुप दिवस सायकलिंगचा सराव नसल्यामुळे मी हा धोका पत्करला नाही. क्रँप वगैरे आला किंवा आले तर चढावर सायकल चढवणे दुष्प्राप्य होण्यापेक्षा आरामात शर्यत पूर्ण केलेली केव्हाही उत्तम. घाट सुरु झाल्यानंतर काय वाढुन ठेवले असेल याची पुसटशी सुद्धा कल्पना नसल्यामुळे मी पायातील ऊर्जा वाचवत सायकल चालवत होतो. चढ कसा आहे? सिंहगडासारखा तीव्र असेल की पसरणीसारखा पसरलेला असेल? मध्ये उसंत घ्यायला सपाट रस्ता असेल का? वरंध्यासारखा भयानक तर नसेल ना? असे बरेच प्रश्न मनामध्ये थैमान घालत होते. कारण सह्याद्री कुठे रौद्र रूप धारण करेल सांगता येत नाही.


कुंभार्ली एवढा सौम्य होता की तो सुरु झालेला कळलाच नाही. गारमिन घड्याळामध्ये सतरा किमी अंतर दिसल्यावर कळले की आपण घाटात आहोत. अवजड वाहने घाटमाथ्यावरच थांबवल्यामुळे नागमोडी वळणांच्या घाटात सायकल चालवणे सुसह्य झाले होते. सर्व सायकलपटू अगदी थाटात सायकल चालवत होते. या घाटात कुठेही मांड्यांमध्ये जाळ काढणारा तीव्र चढ नाही किंवा मला तसे जाणवले नसावे. अंतर वाढत जाईल तसतसा हलकेच वाढत जाणारा. हळूहळू चढणाऱ्या व्हिस्कीसारखा. कुम्भार्लीचा चढ कुठेही वसकन अंगावर येत नाही. पसरणीपेक्षा सोपा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मरीआई आणि सिंहगड घाटासारखा चढ ईथे औषधालासुद्धा नाही. थोडक्यात सायकल चालवण्यासाठी कुंभार्ली घाट हा एकदम "गुडबॉय" आहे. ही झाली इतर घाटांशी तुलना पण शेवटी चढ तो चढच असतो. आणि चढावर सायकल चालवताना काय यातना होतात त्या सायकलस्वारांनाच माहीत. चढावर दोन ठिकाणी पाण्याच्या बाटल्या मिळाल्या. त्यामुळे घसा कोरडा पडला नाही. त्यापैकी एके ठिकाणी पाण्याची बाटली आणि केळ दोन्ही उपलब्ध होते. परंतू मला एका हाताने फक्त पाण्याची बाटलीच घेता आली. पुढच्या वेळी केळ आणि बाटली दोन्ही घेण्यात येईल.

शर्यतीतले शेवटचे पाच किमी बाकी असताना अंजली भालिंगेने मला मागे टाकले. ती अतिशय वेगात माझ्या पुढे निघुन गेली. महिलांची रेस पाच मिनिटे ऊशिरा सुरु होऊन सुद्धा तिने हे अंतर जलदगतीने पार केले होते. दुसऱ्या दिवशी महीलांनी पुरूषांना मागे टाकले अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकली ती काही उगाच नाही. मी माझ्या गतीने सायकल चालवता राहिलो. घाटात मी दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि दोघांनी मला मागे टाकले त्यामुळे क्रमवारीत कसलाही फरक पडला नाही. पीटर सगान स्टाईलने स्प्रिंट मारत मी अंतिम रेषा पार केली. सगानची फक्त स्टाईल गती नव्हे. अंतिम रेषा पार केल्यानंतरही मी ताजातवाना होतो. अंतिम रेषेपासून घाटाचा थोडा चढ शिल्लक होता. मी घाट जिथे संपतो तिथपर्यंत सायकल हातात धरुन चालत गेलो आणि मगच गारमिन बंद केले. सकाळी शर्यत सुरु होण्याच्या अगोदर तीस सेकंद गारमिन चालु करुन ठेवले होते आणि तिथे पोचल्यावर ऊशिरा बंद केले. त्यामुळे एक तास बत्तीस मिनिटे अशी जरी माझी वेळ दिसत असली तरी ती दिड तासाच्या आत आहे. शर्यतीसाठी लागलेली वेळ आयोजकांकडुन कळेल असे मला वाटले होते त्यामुळे मी गारमिनच्या वेळेला जास्त महत्व दिले नाही. परंतु आयोजकांनी फक्त विजेत्या स्पर्धकांच्या वेळा नोंदवल्या. माझ्या पाठोपाठ डॉ. नेहा टिकमने अंतिम रेषा पार केली. महीलांच्या खुल्या गटात अंजली भालिंगेने प्रथम तर नेहा टिकमने चतुर्थ क्रमांक पटकावला. पुण्यातील या दोन सायकल क्वीन्स सोबत फोटो काढण्याची संधी मी दवडली नाही. तसेच डॉ. आदित्य पोंक्षे यांची सुद्धा भेट झाली. त्यांनी उत्तम कामगिरी करत सातवा क्रमांक पटकावला. तिथे सर्वांसोबत चहा घेतला आणि मी पुन्हा चिपळूणकडे प्रस्थान केले. शर्यत संपल्यामुळे थांबवून ठेवलेले ट्रक आता रस्त्यावरून धावू लागले होते. त्यामुळे घाट चढताना जेवढे सुसह्य झाले तेवढे तो उतरताना असह्य झाले. अवाढव्य आणि अवजड वाहनांसोबत घाट उतरताना खूप खबरदारी घ्यावी लागली. घाट उतरल्यावर मी सायकलवर न केलेल्या घाटांची नावे आठवु लागलो. ते म्हणजे आंबा, फोंडा आणि आंबोली हे तीन घाट आहेत. आता यांच्यावर स्वारी करण्यासाठी योग्य मुहूर्त शोधावा लागणार आहे. बहादूर शेख नाक्याला मी सरासरी तीसच्या गतीने पोचलो.


बक्षिस समारंभ माधव सभागृह येथे होणार होता. त्यामुळे शर्यत संपल्यावर पुन्हा माधव सभागृह येथे यावे लागले. मुंबई, पुणे सोडुन चिपळूण सारख्या छोटया शहरात अशी भव्य सायकल स्पर्धा होणे ही काही साधी गोष्ट नाही. याचे सर्व श्रेय आयोजकांना आणि प्रायोजकांना द्यावे लागेल. आयोजकांमधील ऊत्साह वाखाणण्याजोगा होता. विजेत्यांसाठी भव्य चषक आणि रोख रकमेच्या बक्षिसांची अक्षरश: खैरात करण्यात आलेली होती. परंतु महिला आणि पुरुषांच्या बक्षिस रकमेमध्ये प्रचंड तफावत होती. यामध्ये साम्य असायला हवे होते असे मला वाटते. आजकाल भारतीय क्रिकेट मंडळ सुद्धा महीला आणि पुरुष खेळाडुंमध्ये भेदभाव करत नाही. विराट कोहली आणि स्मृती मनधाना या दोघांना एक सामना खेळण्यासाठी सामान पगार दिला जातो. आपल्या क्रिकेटवेडया देशातील लोकांनी ही गोष्ट चटकन शिकायला हवी. कारण महीला आणि पुरुष सर्वजण सारखेच कष्ट घेतात. असोत...

अवघ्या तीन वर्षापुर्वी स्थापन झालेल्या चिपळूण सायकल क्लबने या शर्यतीचे आयोजन करुन कमाल करुन दाखवलेली आहे. या शर्यतीचे हे दुसरे वर्ष होते हे विशेष. कोकणभूमीला साजेशी सायकल शर्यत त्यांनी आयोजित केली. परदेशी बीआरएम तर आता सर्रास सर्वच ठिकाणी आयोजित केल्या जातात. सायकल शर्यतीसाठी आपली भौगोलिक परीस्थिती उपयोगात आणण्याचे महत्वाचे काम चिपळूण सायकल क्लबने केलेले आहे. स्थानिक नेतृत्वाचा या शर्यतीला असलेला पाठींबा फार फार कौतुकास्पद आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय मोठे यश मिळत नाही. "केवळ अप्रतिम" एवढा एकच अभिप्राय या शर्यतीला देऊ शकतो. भविष्यात सर्वांनी या शर्यतीत सहभागी व्हावे.
येवा कोकण आपलाच असा!

-विजय सुरेश वसवे.
(आयर्नमॅन)
9850904526
with Queens of cycling
with Winner Anjali Bhalinge

with Dr. Neha Tikam

with Dr. Aditya Ponkshe

With Anjali Bhalinge
tea after race with Chiplun cyclst


Night before race



Hotel Reemj, Chiplun


Hotel Ekveera, Chiplun



Tuesday 24 January 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)




रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते. 


धावपटुंची त्यांच्या पळण्याच्या गतीनुसार A, B, C, D, E, F, अशा विवीध गटांमध्ये विभागणी केलेली असते. माझ्यासारखे सब-फोर वाले A विभागात होते. A वाल्यांना शर्यत सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. कमी वेगाने धावणार्यांचा वेगात पळणार्यांना अडथळा होऊ नये म्हणुन ही तजवीज केलेली असते. दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने सर्व विभागातील धावपटूंना आरंभ रेषेकडे सोडण्यात आले आणि प्रत्येकजण सुसाट निघाला. दहा ते पंधरा मिनिटांत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील रस्त्यावर 7205 मॅरेथॉनपटु (42.2 किमी धावणारे) धावु लागले. त्यामध्ये 668 महिलांचा समावेश होता. मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीला सुद्धा लाजवेल एवढी धावपटूंची गर्दी रस्त्यावर दिसु लागली. पहील्या पाच किमी मध्ये गर्दीच्या गतीने धावणे भाग पडत होते कारण गर्दीमुळे एखाद्याला ओलांडुन पुढे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते. म्हणुन आपापल्या डिव्हीजनची आरंभ वेळ कदापिही चुकवु नये. पहील्या पाच किमी मध्ये तुम्ही जर तुमच्यापेक्षा हळु धावणार्यांच्या गर्दीत अडकला तर नदीच्या प्रवाहातील भोवर्यात अडकल्यासारखी तुमची अवस्था होईल एवढे मात्र नक्की. त्यातुन लवकर बाहेर पडणे शक्य होत नाही. मरीन ड्राईव्हच्या ऐसपैस रस्त्यावर आल्यावर मोकळा श्वास घ्यावयास मिळाला. आम्ही अजुनही अंधारातच धावत होतो. मरीन ड्राईव्हचा परिसर बघ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला होता. समुद्राच्या कडेने ऐकु येणारे बॅंड, पंजाबी ढोल आणि मराठमोळा ढोल-ताशा धावपटूंचा ऊत्साह द्विगुणित करत होता. ढोल-ताशाचा आवाज ऐकल्यावर अंगात चैतन्याची लहर संचारली. 


सर्वकाही अपेक्षेनुसार होत होते. हृदयावर कोणाताही ताण न घेता विनासायास मिळणार्या गतीने माझी धावाधाव सुरु होती. अधुन मधुन स्टेडफास्टच्या पिनट बटरचा एकेक घास घशाखाली उतरवणे चालु होते. एकदम सर्व सॅचेट खाल्ले जात नाही म्हणुन मी एक घास खाऊन ते सॅचेट पुन्हा खिशामध्ये ठेवत होतो. ठराविक वेळाने मीठाच्या गोळ्या आणि पॉवर जेल घेणे सुरू होते. त्यामुळे संपुर्ण मॅरेथॉनमध्ये कुठेही रसद कमी पडल्याचे जाणवले नाही. पेडरचा चढ आल्यावर मी गपगुमानपणे चालत चालत अंतर कापले. चढावर कमी झालेल्या गतीची सरासरी उतारावर भरून काढली. वाटेत मिळणार्या पाण्याच्या बाटल्या आवर्जुन घेतल्या. जे काही प्यायला मिळत होते ते सर्व घशाखाली उतरवत होतो. आजुबाजुला काही ओळखीचे रनर्स दिसु लागले होते. त्यांना पाहुन धावण्याचा हुरूप वाढला. मुंबई मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण म्हणजे वरळी सिलिंक पुल. या पुलावर धावण्यास मिळणार ही कल्पनाच खुप आनंद देणारी असते. परंतु माझे दुर्भाग्य असे की मी अंधारात वरळी सीलिंकवर प्रवेश केला. सब-फोर साठी कुत्रे मागे लागल्यासारखे धावत होतो. सब-फोर करावयाची असेल तर सिलिंक विसरावा लागतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"


मुंबई मॅरेथॉनची खरी मजा 23 ते 24 किमी नंतर यायला सुरूवात झाली. रस्त्यावरील प्रेक्षक आता फक्त प्रेक्षक न राहता टाळ्या वाजवुन, आवाज देऊन प्रसंगी सोबत पळुन धावपटूंचा ऊत्साह वाढवु लागले होते. काहींनी स्वखर्चाने केळी, संत्री, बिस्कीटे, लेमनच्या गोळ्या, स्प्राईट, थम्सअप तसेच पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावलेले होते. मुंबईचे स्पिरीट म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. युरोपमधील काही स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आलेले लोक तिकडच्या प्रेक्षकांचे गोडवे गाताना मी ऐकलेले आहे. नशिब मला हा अनुभव घेण्यासाठी युरोपला जावे लागले नाही. मी तो अनुभव महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मुंबईतच घेतला. मुंबई मॅरेथॉनमध्ये पळणार्यांची आज खुप काळजी घेतली जात होती. सासरवाडीला आलेल्या जावईबापुंसारखा आमचा जागोजागी पाहुणचार होत होता. सर्वत्र एकच जल्लोष दिसत होता तो म्हणजे, "हर दिल मुंबई". प्रेक्षक आपापल्या परीने मॅरेथॉनचा आनंद घेत होते. परंतु सहभागी स्पर्धकांसाठी मॅरेथॉनमध्ये धावणे ही आनंदाची गोष्ट मूळीच नसते. प्रत्यक्ष धावणारे हे वेगळ्याच विश्वात गेलेले असतात. छातीच्या धडधडीचा वेग हा आगगाडीच्या धडधडीच्या वेगापेक्षाही जास्त झालेला असतो. त्या शोलेतील आगगाडीची धडधड आठवा आणि त्यात कोळसा टाकणारा वीरू म्हणजे धर्मेंद्र.  अगदी तशीच अवस्था शरीराची झालेली असते. एकदाची अंतिम रेषा येवोत आणि या धावण्याच्या कटकटीतुन मुक्त व्हावे असे मनापासुन वाटायला लागले होते. अरे ही मॅरेथॉन संपत का नाही आहे? हा प्रश्न "ये दिवार टुटती क्युं नहीं?" या जाहीरातीतील सुरासारखा केविलवाण्या स्वरात विचारावासा वाटत होता. मी फिनिश लाईनला सहीसलामत पोचेल ना आज? माझी सब-फोर होईल की नाही? मला क्रॅंप तर येणार नाही ना? असे नाना प्रश्न मला भेडसावत होते. कितीही त्रास होत असला तरी पायांची गती मंदावलेली नव्हती.


तिसाव्या किमी पर्यंत माझी गती 05:20 मिनिटे प्रती किमी होती. सर्वकाही सुरळीत चाललेले होते. पण मेजवानीच्या जेवणात जसा मीठाचा खडा यावा तसा सुरळीत चाललेल्या माझ्या मॅरेथॉनमध्ये पेड्डर रोड आडवा आला. त्यावेळेस पेड्डर रोडशी दोनहात करण्याएवढे त्राण माझ्या अंगात शिल्लक राहीलेले नव्हते. परीस्थिती बिकट असेल तर दोन पावले मागे आलेले केव्हाही उत्तम. मी पेड्डरच्या चढावर चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला. चढावरील अंतर चालत चालत पार करत असताना माझे जिवलग मित्र मला भेटले. पेड्डर रोडच्या हायड्रेशन पॉईंटवर ते अधिकृत वोलिंटियर्स म्हणुन काम पाहत होते. "भाऊ रन..." असा जोरात आवाज देऊन त्यांनी माझ्यात नवचैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. डाव्या मांडीच्या स्नायुने कुरबुर करायला सुरूवात केली होती त्यामुळे चढावर कमी झालेल्या गतीची कसर उतारावर भरून काढता आली नाही. डाव्या मांडीचा स्नायु गतीला प्रतिसाद देईनासा झाला होता. गती वाढवायला गेलो की वेदनेची कळही वाढत असे. मोडकळुन पडण्यापेक्षा जी गती मिळेल त्या गतीने धावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. ईथुन पुढे प्रत्येक किमीला आवश्यक असणारी गती राखणे मला कठीण जाऊ लागले होते.


आता चारच किमी राहीले आहे, आता तीनच, आता दोनच असे करत करत मरीन ड्राईववरून डावीकडे वळालो. तेव्हा अवघे चारशे मीटर शिल्लक होते. हाफ मॅरेथॉन पळुन झालेले स्पर्धक अम्बॅसॅडर हॉटेलजवळ ऊभे राहुन थकलेल्यांचा ऊत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पंक्चर झालेले चाक हवा भरून कसेबसे पंक्चरच्या दुकानापर्यंत पोचवतात तसे हे आमच्या सारख्या हवा गेलेल्या रनर्सना अंतिम रेषेपर्यंत पोचवण्यासाठी आमच्यामध्ये हवा भरत होते. त्यात बरेचसे पुण्यातील असल्यामुळे जरा धीर आला. पुणेवाल्यांनी ऊत्साह वाढवल्यावर मुंबई मॅरेथॉनच्या पताका लावलेल्या रस्त्यावर आलो. तेथुन अंतिम रेषा नजरेच्या टप्प्यात आली. आता थांबायचे नाही असे म्हणत जेवढी हवा शिल्लक होती तेवढी वापरून मी पळत राहीलो. शेवटी मी दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि मॅरेथॉन पळण्याच्या त्रासातुन मुक्त झालो. मी 3 तास 54 मिनिटे 11 सेकंद वेळ नोंदवली. ही माझी दुसरी मुंबई मॅरेथॉन. दोन्हीही सब-फोर आहेत आणि आजचा हा माझा वैयक्तिक विक्रम. अंतिम रेषेजवळ दोन मिनिटे शवासन केल्यानंतर आता मेडल घेण्यासाठी निघालो. तिथुन मेडल घेण्यासाठी एक-दिड किमी पायपीट करावी लागली. मेडल मिळाले त्यानंतर मस्त हिरवळीवर ऊन खात पडुन राहीलो. खुप हौस ना मॅरेथॉन पळण्याची, पळशील का आता मॅरेथॉन? तर त्यावेळेस माझे उत्तर "नाही" असे होते.    






Friday 20 January 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी) 


 ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो.


17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उधाण आलेले होते. कोरोना महामारीमुळे 2021 आणि 2022 अशी दोन वर्षे मुंबई मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. मी 2020 साली मुंबई मॅरेथॉनमध्ये पहील्यांदा भाग घेतला होता आणि तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. "लव अ‍ॅट फर्स्ट साईट" म्हणतात ना अगदी तसेच. प्रेम झाले खरे पण प्रेम म्हटले कि ओघाने विरह आलाच. मॅरेथॉनच्या प्रेमात विरह सहन करावा लागेल असा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. दोन वर्षांचा असह्य विरह सहन करावा लागला. 2023 साली मुंबई मॅरेथॉन पुन्हा भेटीला येण्यासाठी तयार होत होती. तिच्या भेटीसाठी मीही आतुर झालेलो होतो. आता प्रेयसीला भेटायचे म्हटल्यावर जय्यत तयारी करणे भाग होते. कॉलेजच्या दिवसांपासुन मी या कामामध्ये आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आहे. मुंबई मॅरेथॉन भेटीच्या तीव्र ईच्छेनेच मला रनिंग सुरु करण्यास प्रवृत्त केले. 


माझे रनिंग जवळजवळ एक वर्षापासुन बंद होते. काहीच सराव न केल्यामुळे पायांना गंज चढलेला होता. हा गंज उतरवणे अपरीहार्य होते. फुफ्पुस आणि हृदय तर म्हणत होते कि "पुन्हा त्या रनिंगच्या फंदात नको" पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी रनिंगचा फिटनेस पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार केला. रनिंग हा असा व्यायाम आहे ज्यामध्ये घाई करून चालत नाही. कसलीही घाई न करता क्रमाक्रमाने धावण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणे क्रमप्राप्त होते. घाई केल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. पुनरागमन करताना आपल्या मनामध्ये जी धावण्याची गती असते ती शरीराला झेपत नाही. त्यामुळे शरीराच्या कलाकलाने घेतलेले केव्हाही उत्तम भले आपले मन परीकथेतील घोड्यासारखे धावत असले तरीही.


सुरूवात करण्यासाठी नवरात्री वॉक चॅलेंजच्या निमित्ताने एक चांगली संधी चालुन आली. नऊ वेगवेगळ्या रंगांचे टि-शर्ट आणि सलग नऊ दिवस मित्र-मैत्रिणींसोबत हत्ती डोंगरावर चालायला जात होतो. खुप मज्जा येत असे. हत्ती डोंगरावर चालण्याचा व्यायाम केल्यामुळे हृदय आणि पायाच्या स्नायुंना थोडी बळकटी मिळाली. तरीही पूर्वीच्या गतीने धावता येईल कि नाही याबद्दल शंका वाटत होती. मी दसर्याला शस्त्रपूजनासोबत नाईकी शूजचे पुजन केले आणि 8 ऑक्टोबरपासुन पळायला सुरूवात केली. मी रनिंगच्या प्रोसेसवर विश्वास ठेवुन स्वत:च स्वत:साठी वर्कआउट तयार करत गेलो आणि स्वत:च त्याचे मुल्यमापन करून स्वत:लाच सुचना देऊ लागलो होतो. न थांबता पाच किमी अंतर पळण्यापासुन मी सुरूवात केली. खुप दिवसांनी पाच किमी पळाल्यामुळे खुप दम लागला. न थांबता पाच किमी पळणे किती अवघड असु शकते याची मी प्रचिती घेतली. या पाच किमी मध्ये छातीचा भाता चांगलाच फुलला होता. अल्कोहोल आणि धूर सोबतच बाहेर पडत होते. अंतर पाच किमी, लागलेला वेळ 31 मिनिटे 32 सेकंद. एवढा त्रास झाला कि ती मुंबई मॅरेथॉनची झंझट नको असे वाटले होते. मॅरेथॉन पळणे माझ्या आवाक्याबाहेर गेलेले आहे हे मला स्पष्ट जाणवत होते. मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करून जीवनाचा आनंद घ्यायचा कि पळायला जाऊन स्वत:ला त्रास करून घ्यायचा असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी दुसरा पर्याय निवडला. "Love the pain" हे माझे आवडते ब्रीदवाक्य मला आठवले.


दर आठवडयाच्या शेवटी म्हणजे रविवारी 10 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 15 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 20 किमी तर त्याच्या पुढच्या रविवारी 25 किमी अंतर पळण्याचा वर्कआऊट मी तयार केला. या पद्धतीने गेल्यास धावण्याचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल यात मला काहीही शंका वाटत नव्हती. रनिंगला जाताना मी एकटाच असायचो, ना कोणाची सोबत ना कुठला ग्रुप. असे करत करत नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी न थांबता 30 किमी अंतर 6 पेक्षा कमी गतीने धावलो. ईथेच मला जाणवले कि माझे पुनरागमन यशस्वी झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महीन्यात 200+ किमी अंतर धावाधाव केली. नोव्हेंबर महीना खुप खडतर गेला. डिसेंबर महीन्यात सातत्य ठेवणे गरजेचे होते. जे मिळवलंय ते जोपासण्याची गरज होती. मी विनासायास सब-टू हाफ मॅरेथॉन करू लागलो. या सर्व कालावधीत स्टेडफास्ट नुट्रीशन माझ्या सोबतीला होते. प्रोटीनमुळे रिकवरी खुप छान होत असे त्यामुळे मला कसलीही चिंता नव्हती. अशा रीतीने दोन-अडीच महीने स्वत:च्याच तालमीत तावुन सुलाकुन निघाल्यानंतर मी नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो. 


जानेवारी उजाडल्यानंतर फक्त मुंबई मॅरेथॉनची आस लागलेली होती. "भेटीलागी जीवा" या तुकोबांच्या अभंगासारखी. आदल्या दिवशी आम्ही ट्रेनने मुंबईला निघालो. पुणे-मुंबई ट्रेनचा प्रवास नेहमीप्रमाणे ऊत्साहवर्धक होता. ट्रेनमधील पन्नास टक्के प्रवासी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावयास निघालेले होते. बीआयबी घ्यायला जाणे हे फार कटकटीचे काम असते. दादर ते कुर्ला हा लोकल ट्रेनचा प्रवास फार जीवावर येतो म्हणुन आम्ही यावेळेस ठाण्याला उतरून लोकलने कुर्ल्याला पोचलो. आपला बीआयबी दुसर्याला आणावयास सांगणे यासारखे सुख नाही. दुसर्याला बीआयबी आणायला सांगणारे लोक खरेच खुप हुषार म्हणायला हवेत. पुन्हा रूबाबात म्हणायला मोकळे की तुझे आणायला जाणारच होतास ना मग माझे आणले म्हणुन काय झाले? असोत. बीआयबी घेण्याच्या नादात जेवणाची वेळ निघुन गेली. पाठीवर वजनदार बॅग घेऊन मुंबई दर्शन केल्यामुळे थकवा सुद्धा आला. पुढच्या वर्षी हे टाळणे गरजेचे आहे असे मला जाणवले. त्यामुळे आता असे ठरवले आहे कि पुण्याहुन निघालो कि सर्वप्रथम हॉटेलवर जायचे, पाठीवरची सॅक हॉटेल रूमवर ठेवायची, मस्त जेवण करून घ्यायचे आणि मग निवांत एक्स्पोमधील गर्दी कमी झाल्यावर बीआयबी घ्यायला जायचे. अनावश्यकपणे उपासमार आणि दमछाक ओढवुन घेण्यात काहीही अर्थ नाही. ही माझ्या सुपीक डोक्यातुन आलेली कल्पना आहे. बीआयबी घेऊन हॉटेल शबानावर पोचलो आणि मॅरेथॉन पळण्याच्या तयारीला लागलो. आता उद्या मुंबई मॅरेथॉन पळणार या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहत होते.

क्रमश:

 


Tuesday 1 November 2022

वाजवा कि हॉर्न (मलेशिया)

"Horn Please"
मलेशियामध्ये बुधवारी सकाळी सायकलचा सराव करण्यासाठी बाहेर पडलो. नवखे रस्ते, नवखा परीसर आणि सारे लोकही नवखे होते. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आलेले या नजरेतुनच आमच्याकडे सर्वजण पाहत होते. प्रसाद, नंदकुमार, पुष्कराज आणि मी आयर्नमॅनच्या रूटवर सायकल चालवायला निघालो. वाहतुक फारशी नव्हती. लोकांची गर्दीही जाणवत नव्हती. गाड्या चालवणारे काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळत होते. दाबादाबी नाही की पुढे जाण्याची कोणाला घाई नाही. सर्व काही शिस्तीत चालु होते. प्रत्येकजण समोरच्याला अगोदर जाण्यास प्राधान्य देत होता. पहले आप.. पहले आप सारखे. पावसाचे थेंब यायला लागल्यामुळे मोबाईल हॉटेल रूमवरच ठेवुन दिला त्यामुळे सायकल रूटचे फोटो आणि व्हिडिओ काढता आले नाहीत.
रस्त्यावर गर्दी नाही, राँग साईडने येणारे कोणी नाही हे पाहुन मला खुप चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले होते.  साधा हॉर्न वाजवणारे सुद्धा कोणी नव्हते. हॉर्नचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर व्हायला लागले होते. काय करावे मला सुचत नव्हते. कम्बख्त कोई तो हॉर्न बजाओ रे... असं मी म्हटलं सुद्धा पण माझी भाषा काही त्यांना कळाली नाही.
शेवटी मी ठरवलं काहीही होवो आज हॉर्नचा आवाज ऐकुनच हॉटेल रूमवर जायचं. असे ठरवल्यानंतर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवायला लागलो. आतातरी नक्कीच हॉर्न ऐकायला मिळेल पण नाही.. एक बहाद्दर माझ्या मागे मागे माझ्याच वेगात कार चालवु लागला पण त्याने हॉर्न काही वाजवला नाही. शेवटी मीच कंटाळलो आणि एका बाजुला झालो मग तो त्याच्या वेगात निघुन गेला. आता मात्र मी आशा सोडुन दिल्या होत्या. मलेशियन लोक हॉर्न वाजवतील असे काही वाटत नव्हते. मी पुन्हा नेटाने सायकल चालवु लागलो. एक छोटासा चढ आला. त्या चढावर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवु लागलो. नंदकुमार आणि मी सोबत सायकल चालवत होतो. बराच वेळ तशी सायकल चालवल्यानंतर एका कारवाल्याचा संयम सुटला आणि त्याने फक्त एकदाच हॉर्न वाजवला... अहाहा... कानांना काय बरे वाटले म्हणुन सांगु. मी हॉर्न ऐकला.. मी हॉर्न ऐकला..
पुर्ण दिवसभर त्या हॉर्नच्या लहरी कानावर तरंगत राहील्या. माझ्या कानांना हॉर्नफोबिया झाल्याचे नुकतेच माझ्या निदर्शनास आले आहे. आता कधी एकदा सिंहगड रोड वर हॉर्न ऐकायला जातोय असे झाले आहे.
😆
23/10/2019

Friday 28 October 2022

केदारनाथ यात्रा


केदारनाथ यात्रा

    "हम भी एक दिन केदारनाथ आयेंगे महादेव, सुना है वहां स्वर्ग से हवा आती है" 2018 साली आलेल्या केदारनाथ या सिनेमातील या संवादाने मनाला खुप भुरळ घातलेली होती. त्यामुळे कधी एकदा केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायला जातोय असे झालेले होते. मी नेमका त्यावेळी आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीत व्यस्त होतो. व्यस्त म्हणजे असा व्यस्त कि ज्याचे नाव तेच, "नो हिलिंग नो डुलिंग". अशा परीस्थितीमुळे फिरण्यासाठी किंवा तिर्थयात्रेसाठी बाहेर पडण्याचा विचारच करू शकत नव्हतो. आयर्नमॅनचा किताब मिळवण्यात दोन-तीन वर्ष गेली आणि त्यानंतर लगेच कोविड-19 ची महामारी आली. या महामारीमुळे उत्तराखंड सरकारने सलग दोन वर्षे कोणालाच केदारबाबाच्या दर्शनासाठी सोडले नाही. माझ्या व्यस्तपणामुळे सौ.ला सोबत घेऊन शेवटचे कुठे फिरायला गेलो होतो ते आठवतही नव्हते. कूठेच फिरायला जाता आलेले नव्हते. त्यामूळे "नवरा फिरायला नेत नाही" या जागतिक समस्येने मला ग्रासले होते. आणि हि समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर तिचे विस्फोटात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. माझी बायको यशोदा टूर्सकडुन माझ्यापेक्षाही जास्त ठिकाणे फिरून आलेली आहे परंतु सोबत जाण्याची मजा काही औरच असते.  


    फिरायला कुठे जायचे? या विषयावर बराच उहापोह झाला. मनुष्यनिर्मित कृत्रिम सौंदर्य पहायला मला अजिबात आवडत नाही. निसर्गसौंदर्य आवडते पण गर्दी गोंगाट नसेल तरच. फिरायला न्या पण कुठे फिरायला न्यायचे? हे पण तुम्हीच ठरवा. मग असे ठरले कि आपण धार्मिक स्थळांना भेटी देणे योग्य ठरेल. भगवंतांच्या कृपेने आपण जे काही आहोत त्याचा सदुपयोग व्हावा. बाकीचे लोक परदेशात फिरायला जावोत नाहीतर कुठेही जावोत आपल्याला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मोर नाचला म्हणुन लांडोर नाचवायची नाही. एकेक करून आपण भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे पाहु असे ठरले. सर्वप्रथम उज्जैनला जाऊन महाकाल दर्शन घेऊन आलो. रेल्वेप्रवास करून अगदी सहजगत्या दर्शन करता येणारे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे महाकाल. तिथे भोलेबाबाची अशी कृपा झाली कि एक पैसाही न देता थेट लिंगावर माथा टेकवुन दर्शन घेता आले. जवळच असणारे ओंकारेश्वर आणि इंदोरही उरकुन घेतले. इंदोरच्या खाऊगल्लीचा आवर्जुन आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही थेट वैष्णोदेवी यात्रा करून आलो. आणि केदारनाथ दर्शनासाठी ऑगस्टमध्ये जाण्याचे ठरले. जागतिक समस्येवर मात करण्याचे हे प्रयत्न.


    ऑगस्ट महीना निवडल्यामुळे खुप लोकांनी खुप टिका केली आणि तुम्हाला खुप त्रास होईल अशी फुकटची भविष्यवाणी पण केली. मी आवश्यक अभ्यास करून म्हणजे पावसाचे प्रमाण, पावसाचे नक्षत्र, तापमान आलेख, भाविकांची गर्दी ई. गोष्टी आणि आपले सणसुद विचारात घेऊन 20 ऑगस्ट हि निघण्याची तारीख ठरवली. माझ्यासोबत माझे दोन मित्र यायला तयार झाले. गणेश परदेशी आणि दिनेश बोडके तेही सहकुटुंब (मुलांसहीत). केदारनाथ ट्रेक एकट्याने करणे हेच एक खुप मोठे आव्हान असते. सहकुटुंब मुलांना सोबत घेऊन करणे म्हणजे आव्हान महाकठीण करून घेणे. महाकठीण आव्हान म्हणजे गदाधारी भीमाला गदायुद्धाचे आव्हान दिल्यासारखे होते. साध्या सोप्या गोष्टी करायला आम्हाला आवडतच नाही अशा अविर्भावात आम्ही रेल्वे बुकींग केले. जे जाऊन आले आहेत त्यांच्याकडुन आम्ही माहीती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला भिती घालण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. लोकांनी घातलेल्या भितीला वैतागुन माझे दोन्ही मित्र दर्शनासाठी हेलिकॉप्टरनेच जायचे या मुद्द्यावर ठाम झाले आणि मी पायीच जाणार या मुद्द्यावर ठाम होतो. हेलिकॉप्टरने केदारनाथ दर्शन आरक्षित करण्याच्या संकेतस्थळाला दहा ते पंधरा वेळा भेट देऊन झालेले होते. हेलिकॉप्टरने जाण्यायेण्याच्या खर्चाचा विचार केला तर ते पांढर्या हत्तीला कुरवाळण्यासारखे असुन त्यामुळे सर्वांच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडणार हे स्पष्ट दिसत होते. हळुहळू मी दोघांचेही मनपरीवर्तन करून पायी चालत जाणे कसे शक्य आहे हे त्यांना समजावुन सांगितले. दोघांचे प्रत्येकी 20000 (वीस हजार) वाचणार असल्यामुळे दोघेही खुश झाले पण त्यांनी पैसे खर्च करण्याची तयारीसुद्धा ठेवलेली होती. आम्ही जोरदार तयारीला लागलो. ट्रेकसाठी उपयुक्त असणारे व्यायाम करायला सुरुवात केली आणि जेवणात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश केला. ट्रेकसाठी लागणारे आवश्यक साहीत्य ज्यांच्याकडे नव्हते त्यांना ते त्यांना खरेदी करायला लावले. पावासापासुन संरक्षण होण्यासाठी मित्र गणेशने पोंचोची सामुहीक खरेदी केली. एकुण दहा पोंचो लागणार होते. 


    पुणे ते दादर, दादर ते बांद्रा टर्मिनस (लोकल रेल्वे) आणि बांद्रा टर्मिनस ते हरीद्वार या रेल्वे प्रवासासाठी आम्हाला तब्बल 40 (चाळीस) तास लागले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता घर सोडले होते आणि आम्ही सोमवारी सकाळी नऊ वाजता हरीद्वारला पोचलो. मित्र दिनेशने इंटरनेटवरून आमच्यासाठी 14 (चौदा) आसनी बस आरक्षित करुन ठेवलेली होती. त्या बसचा ड्रायव्हर रेल्वेस्टेशनबाहेर आमची वाट पाहत थांबलेला होता. आम्ही रेल्वेतुन उतरलो आणि चहा पिऊन लगेच बसमध्ये बसुन सोनप्रयागकडे रवाना झालो. रस्त्यातील एटीममधुन प्रवासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम काढुन घेतली. शिवपुरी येथे दुपारी फुलके, राजमा आमटी आणि भात असे स्वस्तात अमर्यादित जेवण मिळाले. मजलदरमजल करत आम्ही संध्याकाळी सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुरमध्ये मुक्काम केला. ईथे पण एक स्वस्तात मस्त हॉटेल मिळाले. केदारनाथ दर्शनाला जाण्यासाठी पहाटे अडीचचा अलार्म लावुन आम्ही झोपी गेलो. 


    रात्री अडीच वाजता सर्वजण ऊठले. सर्व आवराआवरी करून आम्ही बसने सोनप्रयागला गेलो. तिथे चिटपाखरूही नव्हते. एका टपरीवजा हॉटेलमध्ये ताजा चहा मिळाला. थोडया अंतरावर बोलेरोमध्ये झोपलेल्या एका ड्रायव्हरला ऊठवले. त्या बोलेरोने आम्हाला सोनप्रयाग वाहनतळापासुन गौरीकुंडापर्यंत पोचवले. पहाटे तीन वाजुन पन्नास मिनिटांनी आम्ही केदारनाथच्या पहील्या पायरीवर पाय ठेवला. चालताना आधार मिळावा म्हणुन गौरीकुंड येथे सर्वांसाठी बांबुच्या काठ्या विकत घेतल्या. तिथे प्रवासासाठी लागणारे सर्व साहीत्य विकत मिळते. पहीले सहा किलोमीटर अंतर आम्ही अंधारातच पार केले. उजेड आल्यावर आम्हाला आजुबाजुचे धबधबे दिसायला लागले. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. पायातील बूट पाण्यापासुन वाचवण्याचा खुप प्रयत्न केला परंतु काहीही उपयोग झाला नाही. सर्वात लहान ट्रेकर आयुष सोडला तर प्रत्येकाकडे सॅक होती. सॅकचे ओझे घेऊन चढावर चढणे अवघड जात होते आणि तो चढ संपण्याचे नाव घेत नव्हता. नदी ओलांडुन उजवीकडे गेल्यावर तर चढाची तीव्रता आणखीणच वाढली. वाटेत चहा, मॅगी याचे असंख्य टपरीवजा हॉटेल्स आहेत. पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात. त्यामुळे या गोष्टींचे आनावश्यक ओझे वागवण्याची गरज नाही. रस्त्यावरील घोडयांची लीद साफ करण्यासाठी सफाई कामगार ठेवलेले आहेत. त्यामुळे रस्ता स्वच्छ राहण्यास मदत होते. वाटसरूंना मार्गावर चालताना घोडेस्वार आणि पालखी या दोहोंचाही अडथळा जाणवतो हे मात्र खरे. ठिकठिकाणी शौचालये उभारलेली आहेत. एकुण अठरा किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला दहा तास लागले. मंदिर येईपर्यंत शरीर पुर्णपणे थकुन गेले होते. माझ्या अनुभवाचा वापर करून मी सर्वांना सावकाश गतीने वर घेऊन आलो होतो. मंदिराचे अदभुत आणि स्वर्गिय सौंदर्य पाहुन थकवा क्षणार्धात नाहीसा झाला हेही तेवढेच खरे. स्वर्गाची हवा मिळवणे सोपे थोडीच असते. मंदिर परीसरात तुरळक गर्दी होती. त्यामुळे दर्शनासाठी आम्हाला थेट मंदिरात जाता आले. शून्य मिनिटात आम्ही केदारबाबाचे माथा टेकवुन दर्शन घेतले. एकदम निवांत दर्शन मिळाले. सर्वजण म्हटले कि असे दर्शन मिळण्यास भाग्य लागते. नंतर आम्ही फोटो आणि व्हिडीओचा तुफान वर्षाव सुरु केला.


    आम्ही हीटरची (पाणी गरम करणारा) सुविधा असलेले हॉटेल शोधले. हे हॉटेल मंदिराच्या उजव्या बाजुला होते. आम्ही संध्याकाळी पुन्हा मंदिराकडे गेलो. संध्याआरतीच्या वेळी मंदिरावर विद्युत रोषणाई सोडलेली होती. त्या विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. मंदिराच्या मागे दिसणारे भव्य बर्फाचे डोंगर ते मंदिर स्वर्गिय असल्याची जाणीव करून देत होते. संध्याआरती नंतर सर्वजणांनी पोटोबा केला. माझी एकादशी होती. एका परमपुज्य स्वामीजींमुळे मला एकादशीचा फराळ मिळाला. संध्याकाळी गारठा चांगलाच जाणवत होता. दुसर्या दिवशी लवकर ऊठुन आम्ही गारठ्यात आंघोळ्या करून दर्शन रांगेत थांबलो अर्थात गरम पाण्याने. तेव्हा पाऊस सुरु झाला होता. तिथे पाऊस आला कि प्रचंड गारठा पसरतो. ओल्या फरशीवर अनवाणी चालल्याने पायाची बोटे सुन्न झाली होती. चाळीस मिनिटे रांगेत थांबल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा मनसोक्त दर्शन मिळाले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पावसातच खाली उतरायला सुरुवात केली. सर्वांनी पोंचो घातला आणि छ्त्रीही डोक्यावर धरली होती. एका ठिकाणी थांबुन सर्वांनी नाष्टा केला. उतरताना सुद्धा हे अंतर संपता संपत नाही. तीन ते चार किलोमीटर अंतर पार केल्यावर पाऊस थांबला. आम्ही मजल दरमजल करत सात तास पंधरा मिनिटांनी गौरीकुंडला पोचलो. आमची प्रचंड दमछाक झालेली होती. कोणालाही कसलाही त्रास न होता आम्ही दहाच्या दहा जण सहीसलामत केदारबाबाचे दर्शन घेऊन खाली उतरलो या विचारानेच आमचा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला होता. थोडेफार पाय दुखण्याव्यतिरीक्त कसलाही त्रास नाही. वाहनचालक प्रताप आमची वाट पाहत थांबलेला होता. भ्रमणध्वनीवरून त्याचा ठावठिकाणा घेऊन आम्ही बसमध्ये बसलो. अनावश्यक सामान आम्ही बसमध्ये तसेच बॅगांमध्ये ठेवलेले होते. गणेशने उरापोटावर उचलुन पुण्यापासुन पोतेभरून पाण्याच्या बाटल्या आणलेल्या होत्या आणि केदारनाथला जाताना ते पोते तसेच बसमध्ये ठेवले होते. आम्ही केदारनाथाचे दर्शन घेऊन येईपर्यंत दोन दिवसात आमचा वाहनचालक प्रताप याने त्या सर्व बाटल्या फस्त केलेल्या होत्या. त्याने त्याचा चांगलाच प्रताप दाखवला. हे पाहुन माझे टाळके सटकले होते पण मी खुप संयम ठेवला. वेलकम सिनेमातील नाना पाटेकर स्वत:ला "कंट्रोल उदय..." म्हणतो तसा मी स्वत:ला "कंट्रोल विजय" म्हणत होतो.


    उत्तराखंडमध्ये वाहतुकीचे काही नियम आहेत आणि ते सर्वांना पाळावेच लागतात कारण ते आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. संध्याकाळी आठ ते पहाटे चार या वेळेत रस्त्यावर वाहन चालवण्यास बंदी आहे. जिथे आठ वाजतील तिथे वाहन थांबवुन मुक्काम करावा लागतो. तेथील भौगोलिक परीस्थिती अशी आहे कि कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी दरड कोसळू शकते. रात्री अपरात्री बचाव कार्यास खुप अडथळे येतात. चार वाजता सर्वजण बसमध्ये बसलो. प्रवासासाठी आमच्याकडे चार तास शिल्लक होते. त्या वेळेत आम्ही हरीद्वारला पोचणे शक्य नव्हते. पण जिथपर्यंत जाता येईल तिथे जाऊन मुक्काम करू असे एकमताने ठरवुन आम्ही निघालो. संध्याकाळ होईपर्यंत शंभर किमीपेक्षा जास्त अंतर पार झालेले होते आणि अचानक तुफान पाऊस सुरु झाला. दरड कोसळायला सुरुवात झाली होती. आम्ही कसेबसे तिथुन निसटलो आणि एक छानसे हॉटेल शोधुन मुक्काम केला. ते ठिकाणही छान आणि एकदम किफायतशीर होते.


    सोनप्रयाग ते हरीद्वार प्रवासाचे निम्मे अंतर पार करून ठेवल्यामुळे दुसर्या दिवशी आम्हाला निवांत वेळ मिळाला. रस्त्यात देवप्रयाग लागल्यावर आम्ही घाट उतरून खाली गेलो. जिथे दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला प्रयाग म्हणतात. जसे पंचकेदार तसे पंचप्रयाग सुद्धा आहेत. देवप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम. येथुनच गंगेचा चित्तथरारक प्रवास सुरु होतो. दोन वेगवेगळ्या रंगाचे पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि या दोन नद्या एकत्र आल्यावरच ती गंगा बनते. देवप्रयाग या अतिशय पवित्र ठिकाणी स्नान करण्याचे भाग्य मिळाले. मी याठिकाणी आईसाठी तर्पण केले. देवप्रयाग याठिकाणी रघुनाथ मंदिर आहे. प्रभु श्रीरामचंद्रांनी येथे तपस्या केलेली आहे. ज्या दगडी आसनावर त्यांनी यपस्या केली ते तिथे अजुनही जसेच्या तसे आहे. त्याचे मनोभावे दर्शन घेतले. प्रभु श्रीरामचंद्रांनी ब्रम्हहत्या पापाचे प्रायश्चित म्हणुन येथे स्नान आणि तपस्या केलेली आहे. भक्तशिरोमणी हनुमान त्यांना याठिकाणी घेऊन आला होता. 


    त्यानंतर आम्ही नाष्ट्यासाठी थांबलो. ईकडे स्थानिक पदार्थच उपलब्ध आहेत, दाक्षिणात्य पदार्थ औषधालाही मिळत नाहीत. कोणताही पदार्थ बनवायचा असो ईकडे फोडणी देताना जिरा आणि धन्याचा मारा करतात. जिरा आणि धन्याची फोडणी दिलेली मसाला मॅगी मी फक्त एक घास खाऊन टाकुन दिली. खाऊच शकलो नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश करताच जिरा आणि धने नको असे निक्षुन सांगितलेले केव्हाही उत्तम. ईकडे राजमा थाळी खुप स्वस्त आहे. आम्ही नव्वद रुपयांमध्ये अमर्यादित जेवण केले. 


    हृषिकेशला आम्ही गाईड (शंभर रुपये) घेतला. लक्ष्मण झुलाचे नुतनीकरणाचे काम सुरु झालेले असुन त्याचा वापर सध्या बंद आहे. काचेचा पृष्ठभाग आणि दोन्ही बाजुला केदारनाथ मंदिराच्या आकाराची प्रवेशद्वारे हि नविन लक्ष्मण झुलाची वैशिष्ट्ये असणार आहेत. नुतन लक्ष्मण झुला जुलै 2023 पासुन वापरात येईल असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. हृषीकेशमध्ये भुतनाथ (महादेव) मंदिर आहे परंतु वेळेअभावी आम्हाला दर्शन घेता आले नाही. तिथे आम्ही गीता भवन, भगवान शंकराची गंगेच्या प्रवाहातील मुर्ती आणि गंगाकाठचे वेगवेगळे घाट पाहीले. गीताप्रेसच्या भव्य दुकानातुन अनेक महत्वपुर्ण ग्रंथ खरेदी केले. हृषीकेशमध्ये चोटीवाला हॉटेलच्या व्हरांड्यात मेकअप करून अलिशान खुर्चीवर एक माणुस बसलेला असतो. हा माणुस पर्यटकांचे आकर्षण ठरतो. आपल्याला असे वाटते कि ती मुर्ती आहे परंतु त्याने हालचाल केल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो. 


    हृषीकेश उरकुन आम्ही हरीद्वारच्या दिशेने निघालो. संध्यासमयी हर कि पौडी येथे होणार्या गंगा आरतीला आम्हाला हजेरी लावायची होती. हर कि पौडीच्या जवळ असणारे हॉटेल्स प्रचंड महाग होते. म्हणुन आम्ही तिथुन एक किमी लांब अंतरावर ओयोच्या सहाय्याने स्वस्तात हॉटेल बुक केले. हर कि पौडी येथे संध्यासमयी गंगास्नान आणि गंगापुजन केले. त्यानंतर सामुहिक गंगाआरती केली. त्यादिवशीच्या गंगाआरतीला गायिका अनुराधा पौडवाल स्वत: हजर होत्या. दररोज तिथे त्यांच्या आवाजातील आरती ध्वनीक्षेपकावर वाजवली जाते परंतु आज त्या स्वत: तिथे हजर होत्या हा एक विलक्षण योग अनुभवण्यास मिळाला. गंगाआरती झाल्यानंतर आमचा प्रवास पुर्ण झाला आणि मी टूर संपल्याची घोषणा केली. जे जे ठरवले होते ते ते सर्व व्यवस्थित पार पडले. त्यानंतर ज्याला जे जे वाटेल त्याने ते ते केले. दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी एक वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसुन मुंबईकडे रवाना झालो आणि रविवारी पहाटे चार वाजता पुणे येथे पोचलो. आमचे मुख्य आकर्षण केदारनाथ हेच होते. परंतु त्यासोबत आम्हाला देवप्रयाग, हृषीकेश आणि हरीद्वार देखिल करता आल्यामुळे आम्ही सर्वजण जाम खुश होतो. 


    अशी हि स्वनियोजित केदारनाथ ट्रिप आणि ट्रेक अतिशय कमी खर्चात भरघोस आनंद देऊन गेली. 




जय केदारनाथ!





Friday 16 September 2022

हरीमुखे म्हणा...

पुण्याची गणना कोण करी?


"हरी मुखे म्हणा हरी मुखे...पुण्याची गणना कोण करी" मुखात हरीचे नाव आल्यावर जे पुण्य लाभते त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. ऐकायला किती साधे वाटते. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. काया, वाचा, मन आणि इंद्रियांच्या संयोगाने आपण ईतर जीवांना जो त्रास किंवा पीडा देतो ते म्हणजे पाप. एका क्षुद्र जीवाला त्रास दिल्याने पाप लागण्याचे काय कारण असावे बरे? कारण "हृदयेषु सन्निविष्टो". तुम्ही त्या जीवाला नाही तर त्याच्या हृदयात वास करणार्या प्रत्यक्ष भगवंताला त्रास देत असता. तुम्ही म्हणाल "कोण भगवंत?" तेच भगवंत "अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते" हे अर्जुनाला सांगणारे. सर्व गोष्टींचा मालक मी आहे आणि माझ्यापासुनच सर्वकाही येते. जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ते ते सर्व (सर्वस्य). हि पृथ्वी माझी, हा चंद्र माझा, हा सुर्य माझा, हे समुद्र माझे, ग्रह तारे माझे, एवढेच काय तु जो श्वास घेत आहेस तो वाराही माझाच आहे. ढगांतुन बरसणारा पाऊसही माझाच आहे. सर्वकाही भगवंतांचेच आहे. म्हणुन तुम्ही जेव्हा एखाद्या जीवाला पीडा देता तेव्हा तो अपराध मानला जाऊन त्याचे पाप लागते. आता पुण्य काय आहे ते पाहु.

परोपकार म्हणजे पुण्य. एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न दिले, तहानलेल्याला पाणी दिले तर यापासुन मिळणारे पुण्य अपरीमित परंतु मोजता येण्याजोगे आहे. कारण प्रत्यक्षात तुम्ही त्या जीवाच्या हृदयात वास करणार्या भगवंतांची सेवा केलेली असते. तो जीव भले तुमच्याशी चांगले वागेल अथवा न वागेल पण तुम्हाला तुमच्या परोपकाराचे पुण्य हे मिळणारच. या कर्माचे एवढे पुण्य आणि त्या कर्माचे तेवढे पुण्य या सर्वांचे परीमाण ठरलेले आहे. मोजण्याची पद्धत ठरलेली असल्यामुळे ते मोजता येते. आणि हे मोजण्याचे काम करणारा सुद्धा नेमलेला आहे आणि तो म्हणजे यमराजाचा सचिव चित्रगुप्त. आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची तो नोंद करून ठेवतो. यात कोणतीही चूक होत नाही. 

आपण सध्या अत्याधुनिक मोजमापाची साधने वापरत आहोत. कालगणना, वेग, ऊंची, वजन, आकारमान, खोली, जाडी ई. अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण मोजु शकत नाही. सोन्याची घनता मोजणे आर्किमिडीजमुळे शक्य झाले. मानवाने प्रगतीचा आलेख उंचावत प्रकाशाचा वेग मोजणेसुद्धा शक्य करून दाखवले. हल्ली तर सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅपच्या लॉजीकमध्ये गरजेप्रमाणे मोजमापाचे एकक वापरून वाट्टेल ते मोजता येते. आजकाल मी दोरीच्या उडया सुद्धा मोजतो. व्यायामाचे अनेक प्रकार मोजणे शक्य झालेले आहे. प्रकाशाचा वेग, सुर्यापासुन प्रत्येक ग्रहाचे अंतर, पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग तसेच अवकाशातुन निखळलेल्या तार्याचा वेग मोजणेसुद्धा शक्य झालेले आहे. वाहनाची गती, हृदयाचे ठोके, एका मिनिटातील अमुक तमुक, हे एवढे ते तेवढे... काही काही म्हणुन शिल्लक ठेवलेले नाही. मोजण्यातील अचूकता मिळवण्यासाठी आपण सेकंदाचे मिलीसेकंद आणि मिलीमीटरचे मायक्रॉन करुन ठेवले आहेत. 

ईथे पृथ्वीवर आपण जे जे तंत्रज्ञान पाहतो ते कुठुन आलेले आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, "ऊर्ध्वमुलम अध:शाखं" (ईथे तुला जे जे दिसत आहे त्या सर्वांचे मूळ माझ्यापाशी आहे) ईथे जे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे त्या सर्व गोष्टींचे मुळ उच्चतर लोकांमध्ये स्थित आहे. ईथले तंत्रज्ञान हे खेळण्यातल्या वस्तुंसारखे प्रतिकात्मक आहे. सांगायचे झाले तर जसा एखादा आघाडीचा ड्रायव्हर आपल्या लाडक्या मुलाला खेळण्यातली छोटी कार घेऊन देतो आणि ती घेऊन तो छोटा मुलगा वडीलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते पाहुन त्याच्या वडीलांना हसु येते आणि एक आनंदही मिळतो अगदी तसेच आपले तंत्रज्ञान हे भगवंतापासुन आलेले आहे. हे तंत्रज्ञान जर प्रतिकात्मक असुनही एवढे प्रगत वाटत असेल तर देवाचे तंत्रज्ञान काय दर्जाचे असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

पापपुण्य मोजण्याचे काम चित्रगुप्त यांच्याकडे आहे. गरूड पुराणात दिलेल्या माहीतीनुसार जीवाच्या प्रत्येक कृतीचे बारा साक्षीदार असतात. पुण्याचे फळ घेताना जीव आनंदाने स्विकारतो परंतु पापाच्या वेळी "मी हे केलेले नाही" असे म्हणुन तो निरपराध असल्याचा आव आणतो. त्यावेळेस हे बारा साक्षीदार समोर येऊन ग्वाही देतात. आपल्या ईथे जसे "लाव रे तो व्हिडीओ" म्हणतात अगदी तसेच. "भुमीरापोनलो वायु खं" भुमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनलो अग्नि, वायु आणि खं म्हणजे आकाश हे पाच तसेच सूर्य, चंद्र, राशी, महीना, तिथी, वार आणि सर्वात शेवटी "हृदयेषु सन्निविष्टो" म्हणजे आपल्या हृदयात परमात्मा बनुन राहणारे परम पुरुषोत्तम भगवंत. आत्मा आणि परमात्मा ऐकले असेल त्यातले परमात्मा हेच ते. हृदयात आपल्या सोबत राहुन आपण केलेली कर्मे तर लक्षात ठेवतातच पण त्याचबरोबर आपल्या मनात आलेल्या विचारांची सुद्धा नोंद करुन ठेवतात. त्यांना केलेल्या प्रार्थनांविषयी तर काय बोलावे? भगवंत एखाद्या गुप्तहेराप्रमाणे आपल्यासोबत सतत आहेत आणि याचा आपल्याला मागमुसही नाही. त्यामुळे कधीही पंगा घेण्याचा प्रयत्न करू नका. पापपुण्य मोजण्यासाठी एवढे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपली कोणतीही कृती हि एकतर पाप असते किंवा पुण्य असते आणि त्याची अचूक नोंद ठेवली जाते आणि आपण जेव्हा या शरीरातुन बाहेर पडतो तेव्हा त्याचा हिशोब केला जातो. 

चित्रगुप्त या नोंदी ठेवत असताना जेव्हा सर्वप्रथम एका व्यक्तीने आपल्या मुखातुन हरी शब्द उच्चारला तेव्हा त्याला या कृतीचे वर्गीकरण करता आले नाही. याचे किती पुण्य द्यायचे याचे लॉजिक न सापडल्यामुळे तो आपल्या सिनियरकडे म्हणजे धर्मराज यमाकडे गेला. धर्मराज यमाला जे सॉफ्टवेअर दिलेले आहे त्यातसुद्धा हे लॉजीक टाकलेले नाही. आता काय करायचे? म्हणुन ते दोघे त्यांच्या बॉसकडे जातात. त्यांचे बॉस म्हणजे महाकाल भगवान शंकर. ते त्यांना सांगतात कि ते आपल्या विभागाचे काम नाही. अजामिळाने मृत्युसमयी जेव्हा "नारायण...नारायण" हे भगवंतांचे नाम उच्चारले होते तेव्हा त्या विभागाचे चार कर्मचारी (विष्णुदुत) यमदुतांना दिसले होते. ते यमदुतांपेक्षा महाबलशाली होते. भगवंतांची भक्ती आणि नामस्मरण याची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे जो आपल्याला अवगत नाही. म्हणुन येथे म्हटलेले आहे "पुण्याची गणना कोण करी?" मुखाने हरीचे नाव घेतले असता मिळणारे पुण्य चित्रगुप्ताला सुद्धा मोजता येत नाही. म्हणजे ते पुण्य किती असेल याची कल्पना केलेलीच बरी. 

म्हणुन देवाच्या द्वारी क्षणभर का होईना उभे रहा आणि मुखाने हरीनाम घ्या. यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही हयगय न करता मुखाने हरीचे नाम घेत रहा...
"रामकृष्णहरी"
- वि. सु. वसवे 


 

Monday 12 September 2022

आशिया कप अंतिम सामना २०२२

अशिया कप अंतिम सामना २०२२!
 अपेक्षित होते कि आपला भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळेल परंतु अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात हेही तेवढेच खरे आहे. क्रिकेटमुळे भारतीय बोर्डाकडे अमाप संपत्ती आली पण त्या श्रीमंतीला यशाने बर्याचदा हुलकावणीच दिलेली आहे. नाही म्हणायला आपला एक पंच अंतिम सामन्यात दिसत होता हेही नसे थोडके आणि रवि शास्त्रीचे समालोचन ऐकायला मिळणार होते. रविच्या समालोचनाविषयी काय बोलावे. खरं सांगायचे तर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकाची भुमिका निभावत असताना मला त्याच्या समालोचनाची खुप आठवण येत असे. रविवारच्या दिवशी व्हिस्की सोबत तंदुरी चिकन मिळाल्यावर जी मजा येते तीच मजा एखाद्या रंगतदार सामन्यात रवी शास्त्रीचे समालोचन ऐकताना येते. सध्या हिंदी समालोचन सुद्धा बहरत चाललेले आहे पण मला ते कमी कपडे घालुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करणार्या एखाद्या नुतन अभिनेत्रीसारखे वाटते म्हणुन मी त्याच्या वाटेला जात नाही. हिंदी समालोचन मला झेपत नाही. विशेष म्हणजे काल कोणतीही तिथी आडवी न आल्यामुळे व्हिस्कीचा एकेक थेंब घशाखाली उतरवत अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद घेता आला. अर्थातच मी श्रीलंकेच्या बाजुने होतो. "कमॉन लंका..." म्हणत मी सोफ्यावर विराजमान झालो.
 सामना सुरु होण्याअगोदरच निराशेचे सावट पसरले. आतापर्यंत "टॉस का बॉस" असणारी दुबई अंतिम सामन्यातही जो नाणेफेक जिंकेल त्यालाच विजयी करणार असे माझे ठाम मत झालेले होते. नाणेफेकीचा कौल लंकेच्या बाजुने लागावा अशी तीव्र ईच्छा मनात निर्माण झाली होती. परंतु नाणेफेकीचा कौल पाकडयांच्या बाजुने गेल्यामुळे मी लंका संपली असे गृहीत धरूनच सामना पाहत होतो. त्यात पहील्याच षटकात एका अप्रतिम आत येणार्या चेंडुने कुसल मेंडीसचा असा काही त्रिफळा उडवला कि ते पाहुन या पाकडयांच्या गोलंदाजीपुढे लंकेचा निभाव लागणे आता कठीण आहे असे वाटले. समालोचन करणार्या वासिम अक्रमला आनंदाच्या उकळ्या फुटून तो चेकाळु लागला. "What a cracker to start asia cup final" असे म्हणत रवीने सुरुवात केली. पाकडयांचे गोलंदाज लंकेच्या फलंदाजांना डोके वर काढु देत नव्हते. त्यांचा एकेक फलंदाज धारातीर्थी पडु लागला. रसेल अर्नॉल्ड स्वत:ला सावरत जपुन जपुन शब्दप्रयोग करत होता. सलामीवीर धनंजय डिसिल्वाची एकाकी झुंज चालु होती तो एका बाजुने अप्रतिम फटके मारत होता तेही कवर्समधुन. कवर्समध्ये मारलेले फटके पाहताना खुप मजा येते मग मारणारा कोणीही असो. पाकडयांच्या गोलंदाजांचे एवढे कौतुक सुरु होते कि एक फिरंगी समालोचक सोडला तर बिचार्या धनंजयसाठी स्तुतिसुमने वाहणारे कोणी नव्हते. तिसरा गडी बाद झाल्यावर भानुका राजपक्ष मैदानात उतरला. आता "आपला माणुस आला" असे म्हणत मी सोफ्यावर सावरून बसलो. तो अफाट गुणवत्ता असलेला फलंदाज आहे. तो जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तेव्हा मी त्याची फलंदाजी आवर्जुन पाहतो. लंकेचा एकेक मोहरा तंबुत परतत होता. त्यांची गळती थांबता थांबेना. कर्णधार दासुन शनाकाने आडवा खराटा मारण्याच्या प्रयत्नात आत्महत्या केली आणि लंकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. नवव्या षटकात पाच बाद अठ्ठावन्न वरून आता डोंबल्याची लंका जिंकणार असे मी पुटपुटत होतो. 
 वानिंदु हसरंगा आणि भानुका राजपक्ष हि डावी उजवी जोडी मैदानावर एकत्र आली. भानुका एकदम शांत डोक्याने कसलाही धोका न पत्करता दुहेरी, एकेरी आणि प्रसंगी चौकाराच्या रुपाने धावा जमवत होता आणि दुसरीकडे हसरंगा "मारेल नाहीतर मरेल" या वृत्तीने पाकडयांवर तुटुन पडला होता. असेही हारणार आणि तसेही हारणारच आहोत तर मग लढुन हारू असे म्हणत त्यांनी जिद्दीने खेळायला सुरुवात केली. हसरंगा कसलेल्या फलंदाजासारखा कवर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून लिलया फटके मारत होता. त्याच्या फटकेबाजीमुळे धावगती सरस होत चालली होती. दरम्यान क्षेत्ररक्षण करताना पाकडयांनी जाम करमणुक केली. आतापर्यंत आपण फुटबॉल खेळताना डोक्याने चेंडु मारतात हे पाहीलेले आहे परंतु शादाबखानने क्रिकेटच्या चेंडुला "हेडर" मारला. ते पाहुन माझी हसता हसता पुरेवाट झाली. पाकडयांच्या लौकीकास साजेसे म्हणजे त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण सुरु होते. प्रत्येकजण एक दुसर्याला सुचना देण्याचा प्रयत्न करत होता पण कोणीच कोणाचे ऐकत नव्हते. सामना आपण जिंकलेला आहे या धुंदीतच ते खेळत होते. कर्णधाराने बळी मिळवण्याच्या नादात मुख्य गोलंदाजांची षटके जवळजवळ संपवलेली होती. याचा पुरेपुर फायदा हसरंगाने उचलला. भानुकाने फ्लिकवर एक नेत्रदिपक षटकार मारला जो मला एकदम युवराजने २००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या षटकारासारखा वाटला. या दोघांनी अभेद्य वाटणार्या पाक गोलंदाजीला भगदाड पाडले. हि जोडी फोडण्यासाठी पंधराव्या षटकात कर्णधार बाबर आझमने हरीसला गोलंदाजीला आणले आणि त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत एकवीस चेंडुत छत्तीस धावा करणार्या हसरंगाला तंबुचा रस्ता दाखवला. आता पुढची पाच षटके भानुका अवश्य काहीतरी कमाल करणार असे मला वाटत होते. 
 आज भानुकाचे दैव फळफळलेले होते. तो फलंदाजीला येताना कर्णाची कवचकुंडले घालुन आलाय असे वाटत होते. लंकेला त्याने सरणावरून जीवदान दिले होते. शेवटच्या षटकातील घमासान पहायला मजा येत होती. हे सर्व रवी शास्त्री भन्नाटपणे वर्णन करत होता. रसेल अर्नॉल्डला आता वाचा फुटली होती. संजय मांजरेकर स्वयंघोषित तज्ञ असल्यासारखा तोंडाचा पट्टा चालवत होता आणि वासिम अक्रम तर पाकीस्तानने आशिया कप जिंकल्याच्या अविर्भावातच बोलत होता. दरम्यान पाकडे करमणुक करण्यात कुठेही कमी पडत नव्हते. भानुकाचा उडालेला झेल घेण्यासाठी दोन खेळाडु एकाचवेळी धावले आणि एकमेकांना धडकले, तो झेल घेण्याऐवजी त्यांनी तो चेंडु सीमारेषेबाहेर उडवुन लावला. अशी चमत्कारीक गोष्ट घडली कि ती एखाद्याने ठरवुन करावयाची म्हटली तरी होणे शक्य नाही. हे पाकडेच करो जाणे. जीवदानासहीत आयतामायता षटकार मिळालेल्या भानुकाने नंतर मागे वळुन पाहीलेच नाही. पाक गोलंदाजीची त्याने लक्तरे लोंबवली. पाकडयांचा धुव्वा उडवत लंकेने तब्बल १७० धावा उभ्या केल्या. एवढी समाधानकारक धावसंख्या उभी केल्यामुळे लंकेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. पण या स्पर्धेत हि धावसंख्या कैक वेळा लिलया पार झालेली असल्यामुळे ती विजय मिळवुन देईल असे वाटत नव्हते. पाकडे या धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग करणार याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. नंतर मला सामना बघता बघता केव्हा झोप लागुन गेली हे कळलेच नाही.
 मी सकाळी झोपेतुन ऊठल्यावर औत्सुक्य म्हणुन निकाल पाहीला. तो पाहुन मी टणकन उडालो. झोपेतुन उठल्या उठल्या एवढी गोड बातमी दिल्याबद्दल लंकेचे खुप खुप धन्यवाद आणि आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन!
- वि. सु. वसवे
#cricket #AsiaCup2022Final #AsiaCup #marathi #blogger

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...