"रामबाण"


रामबाण हा शब्द कधी ऐकलाय? कुठे? औषधवाल्याकडे पाटी लावलेली असते. "रामबाण उपाय". औषधवाले रामाच्या बाणाची उपमा देतात त्यांच्या औषधाला. औषधाला बाणाची उपमा ! मलाही नवल वाटते ह्या गोष्टीचे. म्हणुन थोडंसं सविस्तर जाणुन घेऊ. रामाचा बाण म्हणजे अचुक,अभेद्य, लक्ष्यापासुन कधीही विचलीत न होणारा. जे लक्ष धरुन तो सोडला जायचा त्याचा भेद केल्याशिवाय तो कधीही परत आला नाही. आपल्या मिसाईल टेक्नॉलॉजीला काय घेऊन बसलात. आपल्या मिसाईलचे co-ordinates मागे पुढे होतील पण रामाचा बाण कधीही मागे पुढे झाला नाही. असा हा रामबाण.. पुर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा सातवा अवतार म्हणजे प्रभु श्रीराम. ह्या अवतारात त्यांचे अस्त्र होते धनुष्यबाण आणि त्याच्या जोडीला विश्वामित्रांचा अक्षय भाता.त्यांच्या ह्या बाणाने असंख्य राक्षसांचे लिलया प्राण घेतले. अचुक वेध, लक्ष्य कोणतेही असो, कधीही वाया न जाणारा असा हा प्रभु श्रीरामांचा बाण "रामबाण" .

रामबाणाच्या शक्तीचा ख-या अर्थाने पहीला अनुभव घेतला तो मारीच राक्षसाने. यज्ञभंग करणे म्हणजे त्याचा हातचा मळ. कोणीही त्याला अडवण्याची हिंम्मत केलेली नव्हती. मारीच हा ख-या अर्थाने मायावी राक्षस होता. अफ़ाट शक्ती असलेला मारीच राक्षस त्याने कैक देव-देवतांना पराभुत केलेले होते. त्यामुळे देव-देवताही त्याच्याबरोबर पंगा घेत नसत. असाच एके दिवशी नित्यनियमित यज्ञभंग करण्याच्या उद्देशाने मारीच आला. पण यावेळेस स्वत: प्रभु श्रीराम यज्ञाचे रक्षण करीत होते. यज्ञभंग करायला आलेल्या मारीचने धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेल्या दोन युवकांना पाहुन छदमी हास्य केले. बिचा-याने स्वप्नातही कल्पना केली नसेल पुढे काय होणार आहे? ह्यावेळेस मारीचची गाठ प्रत्यक्ष भगवंतांशी होती. धनुष्यावर बाण चढवलेलाच होता फ़क्त मारीच पुढे यायचा अवकाश होता. वायु आणि बल प्रभुंचा बाण सुटण्याची वाट पहात होते, कधी एकदा धनुष्यातुन बाण सुटतोय आणि आम्ही तो मारीचच्या छाताडात नेऊन घुसवतोय असं त्यांना झाले होते. जसा मारीचने यज्ञामधे विघ्न आणण्याचा प्रयत्न करायला गेला तसा प्रभु श्रीरामांचा बाण धनुष्यातुन सुटला..सुssssसुsssssसु..... एवढी ताकद होती त्या बाणामधे.... केवळ तो मारीच होता म्हणुन त्याचे निभावले... त्याने तो बाण हाताने अडवला. पण बाणाचा वेग एवढा प्रचंढ होता की मारीच त्या बाणाबरोबर उत्तर भारतातुन अरबी समुद्रामधे येऊन पडला. ते सध्याचे मॉरीशस.

जेव्हा प्रभु श्रीराम दंडकारण्यामधे वनवासात होते. तेव्हा शुर्पनखाने सीतेचा द्वेष करुन सीताला मारायचा प्रयत्न केला होता. लक्ष्मणाने नाक कापल्यानंतर ती खर आणि दुषण ह्या दोन राक्षसांकडे गेली. रावणाच्या अधिपत्याखाली दंडकारण्याचे ईनचार्ज होते ते. त्यांनी १४००० राक्षसांसहीत प्रभु श्रीरामांवर आक्रमण केले. सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने बाणाने मोठ्या दगडामधे एक गुफ़ा तयार केली. केवळ सीताच त्या गुफ़ेमधे जाऊ शकेल एवढीच जागा आणि आतमधे आरामात झोपता येईल एवढ्याच आकाराची गुफ़ा लक्ष्मणाने तयार केली. आजही ती गुफ़ा पंचवटीमधे आहे. तिला "सीतागुफ़ा" म्हणतात कधी गेलात तर अवश्य पाहुन या.

१४००० राक्षसांचे सैन्य घेऊन आलेल्या खर आणि दुषण यांना प्रभु श्रीरामांनी अवघ्या १ तासामधे भुईसपाट केले. अचुक आणि अभेद्य बाणांनी १४००० राक्षसांना १ तासामधे म्हणजे सेकंदाला 3.8 राक्षस मारले त्यांनी. एकही बाण वाया गेला नाही. केवढी अचुकता होती त्या बाणांमधे......"रामबाण". जेव्हा रावणाने मारीचाला सीताहरण करण्यासाठी मदतीसाठी बोलावले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला होता.. त्याला रामाच्या बाणाचा पुन्हा अनुभव घ्यायचा नव्हता..पण रावणाने त्याला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याने प्रभु श्रीरामांच्या बाणाने मरण्याचा पर्याय निवडला.. जेव्हा तो सुवर्णमृग होऊन आला तेव्हा त्याला रामबाणाचीपुर्ण कल्पना होती.. "रामबाण" म्हणजे काय? ह्याची त्याला पुर्ण जाणिव होती. केवळ म्हणुनच तो प्रभु श्रीरामांना काही अंतरापर्यंत दुर घेऊन जाऊ शकला.तो मधेच अदुश्य होत असे आणि नागमोड्या चालीने पळत होता. पण तो प्रभु श्रीरामांच्या बाणापुढे काही काळच तग धरु शकला.. अखेर "रामबाण" त्याला लागलाच.प्रभु श्रीरामांनी त्याचा वेध घेतलाच. अशा ह्या धुर्त मायावीलासुद्धा अचुक लक्ष्य करणारा "रामबाण".

सर्वांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा !!

Comments

Popular posts from this blog

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन 53 km